Thursday, July 30, 2015

रक्ताची तहान कुणाला?

याकूब मेमनला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी कायदेबाजीचे शेवटचे टोक गाठणा-या वकिलवर्गांपैकी एक ज्येष्ट वकील आनंद ग्रोव्हर ह्याचे बहुतेक डोके फिरले असावे. याकूब मेनन फाशी प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोर्टातच ग्रोहरमहाशय उद्गारले, रक्ताची तहान लागलेले हे सगळे उद्या याकूबला फाशी देणार आहेत!’ त्याआधी कोर्ट रूम नंबर 4 मध्ये बसायला जागा नाही हे पाहून दुसरे एक वकील उद्गारले, यहाँ मछली बजार लगा है क्या?’ याकूबची मनःस्थिती ठीक नाही हे समजण्यासारखे आहे. पण त्यांची फाशी पुढे ढकलण्याचा निर्णय कोर्टाकडून मिळवावा म्हणून सगळे वकीली कसब पणाला लावणा-यांचे मन था-यावर राहिले नाही हे उघड आहे. राष्ट्रपतींनी याकूबचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देशातील शेदोनशे विचारवंतांच्या ह्रदयात एकाएकी माणूसकीचा पाझर फुटला. रिकामटेकड्या पत्रकारांना हाताशी धरून त्यांनी सरकारविरूद्ध रान उठवले. सर्वोच्च न्यायपीठासमोर ह्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ह्यांनी अकलेचे तारे तोडत स्वतःचे न्यायदान सुरू ठेवले. ज्या वेळी ठोस मुद्दा नसतो त्यावेळी अशा क्लृप्ती योजण्याचा त्यांचा एकच हेतू असतो. याकूबला येनकेन प्रकारेण वाचवण्याची खटपट करणा-यात राम जेठमलानी हे अग्रणी होते. चित्रपटसृष्टीपलीकडील जगाची नीट ओळख नसलेल्या नसरद्दीन शहा, महेश भट, सलमान ह्यांच्यासारखे चित्रपटदिग्दर्शक, कलावंत वगैरे मंडळी याकूब बचाव मोहिमेत सामील झाली. न्यायालयीन कामकाजाचा त्यांचा काडीइतकाच संबंध असल्याने त्यांची दखल घेण्याचे कारण नाही. परमेश्वर त्यांना क्षमा करो. कारण त्यांचा संबंध आला तो हवे तसे कोर्टसीन लिहून देणार-या सुमार कुवतीच्या पटकथा लिहून देणा-या लेखकांशी!
याकूब मेमनचा गुन्हा साधासुधा नाही. गनिमी काव्याच्या तंत्राने भारतभर ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवून आणून जेवढी जीवित आणि वित्तहानी घडवून आणता येईल तेवढी घडवून आणण्याची योजना पाकिस्तानी हेरसंस्थेने आखली. ह्या योजनेनुसार दाऊदसारख्या फरारी गुन्हेगाराला हाताशी धरून सर्वप्रथम मुंबई शहर उद्धवस्त करण्याचा कट रचण्यात आला. रचलेल्या कटानुसार मुंबई शहरात तासातासाच्या अंतराने अनेक ठिकाणी बाँबस्फोट सुरू झाले. ह्या बाँबस्फोटांमुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी पडझड झाली. पडझडीत असंख्य माणसे जखमी झाली. शहरातली 250 माणसे ठार झाली. जखमी माणसे अजूनही विव्हळत असतील. बाँबमध्ये आरडीएक्ससारखे तीव्र स्फोटक वापरण्यात आले होते. शहरात त्या कटाची काटेकोर अमलबजावणी करण्याचे काम याकूब मेमनच्या कुटुंबियांनी केले हे न्यायालयात पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे सरकारी वकील उज्ज्वल निकमनी परिश्रमपूर्वक सिद्ध केले. असे असतानाही टाडा कोर्टाच्या न्यायदानात त्रुटी असल्याचे कारण देत क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली. ती फेटाळली गेल्यानंतर फाशी स्थगित ठेवण्याची पुन्हा याचिक दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टालाही मध्यरात्री सुनावणी घेण्यास भाग पाडण्यात आले. पुन्हा रात्री राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यात आला!
एखाद्या शहरात बाँबस्फोटाची मालिका सुरू करून मुंबई शहराचा बहुसंख्य भाग जमीनदोस्त करण्याचा आणि निरपराध नागरिकांचे प्राण घेण्यासाठी करण्यात आलेल्या ह्या गुन्ह्याला तोड नाही. खरे तर, दुस-या महायुद्धानंतर जगाच्या इतिहासात घडलेला अशा प्रकारचा पहिलाच गंभीर गुन्हा! ह्या गुन्ह्याचे गांभीर्य आपल्या विचारवंतांना कळू नये हे आश्चर्यकारक आहे!  कायद्याच्या बाबींवर भाष्य करण्याची आणि कनिष्ठ कोर्टांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध अपील  करण्याची संधी सर्वांना दिली जाते. तशी ती याकूबलाही दिली गेली. परंतु तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही.
याकूबचे अपील लढवण्याच्या कामी साह्य करणारे वकीलमहाशय ग्रोहर म्हणतात, त्यांना रक्ताची तहान लागलीय्. म्हणून ते उद्या याकूबला फाशी देणार!  ग्रोव्हरसाहेब, रक्ताची तहान तर पाकिस्तानी हेर संस्थेला लागली होती. हेर संस्थेचे हस्तक म्हणून काम करणा-या सगळ्या देशद्रोह्यांना लागली होती. देशद्रोही दाऊदला रक्ताची तहान लागली नव्हती  काय? टागर मेमनला लागली नव्हती? बाँबस्फोटाच्या कटात सहभागी झालेल्या मेमन कुटुंबियासही लागली नव्हती काय? तरीही न्यायालयाने सारासार विचार केला. मेमन कुटुंबियांतील 3 जणांना दोषमुक्त केले तर अन्य तीन जणांची तुरूंगात रवानगी केली. दोन जण फरार आहेत. याकूब ह्या एकालाच फाशीची शिक्षा देण्यात आली. प्रत्येक आरोपीचा वेगवेगळा विचार करून त्यांच्या गुन्ह्यानुसार त्यांना शिक्षा देण्यात आली हे उघड आहे. अलीकडच्या काळातले न्यायबुद्धीचे हे सर्वात मोठे उदाहरण!  पण मतिभ्रष्ट विचारवंतांना हे कसे लक्षात येणार?
रमेश झवर
www.rameshzawar.com



No comments: