Monday, January 28, 2013

राहूल गांधींचे पदग्रहण!

इंदिरा गांधींकडे ज्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व आले तेव्हा त्यांची संभावना खासदार मधु लिमये ह्यांनी ‘गुंगी गुडिया’अशी केली. राजीव गांधी आणि त्यांचे नवे सहकारी ह्यांची ‘डून बॉईज’ अशी हेटाळणी करण्यात आली. अनेक बड्या पत्रकारांनी म्हणजे संपादक वगैरे असलेल्या वर्मानपत्रातल्या श्रेष्ठींनी त्यांच्यावर नेहमीच्या घराणेशाहीचा आरोप केलाच; त्याखेरीज हा वैमानिक काय देशाचे नेतृत्व करणार, असा सवाल उपस्थित केला. लालबहादूर शास्त्री ह्यांनाही पाशश्र्च्यात्य प्रेसने ‘feeble man’ असेच संबोधले. नरसिंह रावांबद्दल लिहीताना त्यांच्या चेह-याबद्दल ‘मेलेल्या माशासारखा चेहरा’ असलेली व्यक्ती असे हीन पातळीवरील जाणारे विशेषण ‘इकॉनॉमिस्ट’ नियतकालिकाने लावले. इकॉनॉमिस्ट हे जगातले अत्यंत भारदस्त नियतकालिक समजले जाते.

इंदिरा गांधींनी पंतप्रधान झाल्यानंतर संस्थानिकांचे तनखे रद्द करणारा निर्णय घेतला. त्यांच्या ह्या निर्णयाविरूद्ध संस्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर कोर्टबाजी केली. विशेष म्हणजे ह्या तनख्या प्रकरणी अखेर इंदिरा गांधी सरकारचाच विजय झाला. बँक राष्ट्रीयीकरणाचा धडाका लावून प्रस्थापित हितसंबंधियांना जोरदार धक्का दिला. वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून त्यांनी ‘गरीब हटाव’चा नारा दिला. काँग्रेस पक्ष गरिबांसोबत आहे हे दाखवून त्यांनी अफाट लोकप्रियतेचे शिखर गाठले.

आणीबाणीमुळे त्यांचे कर्तृत्व निश्चितपणे कलंकित झाले. पण नंतर त्यांनी तो कलंक पुसू टाकला. बांगला देशास मुक्त करण्याच्या बाबतीत त्यांनी जो जोर लावला तो देशाच्या इतिहासास सदैव स्मरणात राहील. त्यांना देशातल्या विचारवंतांशी मोठा संघर्ष करावा लागला. देशाला अतिरेकी डाव्या आणि अतिरेकी उजव्यांपासून खरा धोका असल्याचे त्यांचे राजकीय निदान होते. त्याच्याशी असहमत होणे कठीण आहे हे आज नक्षलवाद्यांच्या अतिरेकी कारवायांशी सरकारला झुंजावे लागत आहे ह्यावरून स्पष्ट होते. शीख अतिरेक्यांशी लढताना त्यांना प्राण द्यावे लागले. त्यांचे हे सगळे कर्तृत्व पाहता त्यांना ‘गुंगी गुडिया’ संबोधण्याची मधु लिमये ह्यांची वाणी आणि विचारसरणी किती पूर्वग्रहदूषित होती हे कोणाच्याही लक्षात येईल.

एखाद्या नेत्याबद्दल लिहीताना, बोलताना पक्षातीत होऊन त्याचा गुणदोषांचा मनापासून वेध घेणे हा एक मोठा सद्गुण आहे! अनेक लेखक, पत्रकार, समाजधुरीण, राजकारणी ह्यांच्याकडे हा गुण दिसून येत नाही. त्यामुळे लोकांची किंवा त्यांच्या अनुयायांची मात्र मुळीच फसगत होत नाही. त्यांची स्वत:ची काय ती फसगत होते. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर लिहीताना असेच बिनबुडाचे लेखन अनेक मोठ्या म्हणवणा-या पक्षकारांनी केले. वास्तविक एवढ्या प्रमाणावर मराठी माणसांना एका झेंड्याखाली एकत्र आणणे अलीकडे तीसचाळीस वर्षांत कोणत्याच नेत्याला जमलेले नव्हते ही वस्तुस्थिती नजरेआड कशी करता येणार?

राजीव गांधी हे साधे वैमानिक होते. पण नंतर नोकरी सोडून काँग्रेसच्या राजकारणात त्यांनी जनरल सेक्रेटरी आणि नंतर सेक्रेटरी जनरल ह्या पदावर काम करून राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यापूर्वी भारतातल्या राजकारणाबद्द्ल त्यांना आईकडून जे त्यांना ऐकून कळले असेल तेव्हा ते त्यांना किती समजले असेल हा प्रश्नच आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अचानक पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. कदाचित इंदिरा गांधींची हत्त्या झाली नसती तर त्यांना पंतप्रधानपदावर जाता आले की नसते ह्याबद्दल शंकाच आहे! संजय गांधींनाही अशीच संधी मिळाली होती. त्या संधीचे त्यांना सोने करता आले नाही हे लगेच स्पष्ट झाले. योगयोगाने त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि अपात्र नेतृत्वापासून देशाची सुटका झाली.

समाजवादी आणि इतर विरोधी पक्षांना एकच साक्षात्कार वारंवार होत राहिला—नेहरू-गांधी ह्या नावाचे वलय त्यांना आहे. भारतात घराणेशाही सुरू आहे असा सिद्धान्त मांडून बपुतेक निव़णूक प्रचार सभात काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवण्याकडेच त्यांचा कल होता. वास्तविक वडिल सत्तेवर असताना मुलाने वडिलांच्या राजकारणात लक्ष घालण्याचे उद्योग सर्व राज्यातल्या सर्व पक्षांत सुरू होते इकडे अनेकजण सोयिस्कर दुर्लक्ष करतात! बिजू पटनायकांचा मुलगा, ज्यांना उडिया भाषाही बोलता येत नाही ते ओडिशाचे मुख्यमंत्री! देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामी हेही कर्नाटकच्या राजकारणात मंत्री-मुख्यमंत्रीपदावर चढले. करूणानिधी ह्यांचे पुत्र स्ट्रलिन हे तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय आहे. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या पुतण्यास वाजपेयी पंतप्रधान असताना भाजापने मध्यप्रदेशात तिकीट देऊन आमदार म्हणून बसवले. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व नेत्यांची मुले, सूना, पुतणे, मुली ह्या आमदार-खासदार झाल्या असून अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत यशस्वी झालेले दिसतात.

लोकशाही राजकारणात हे कितपत योग्य ठरते असाही एक मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. परंतु हा मुद्दा ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ अशा प्रकारचा आहे! ज्यांना राजकारणात प्रथमदर्शनी ‘सिलेक्ट’ होण्याइतपतही यश मिळत नाही त्यांच्याकडून बहुधा अशा प्रकारची टीका होत असते. अनेक सर्वसामान्य माणसे पदवीशिक्षण किंवा उच्च शिक्षण घेऊनही राजकारणात उडी घ्यायला कचरतात! अनेक पत्रकार, आय ए एस अधिकारी, शिक्षक वगैरेंना राजकारणी राजकारणात येण्याची ‘ऑफर’ देतात; पण ती स्वीकारण्याचे धैर्य त्यांना होत नाही. ह्याउलट अनेक संपादकांना आपल्याला आमदारकी-खासदारकी मिळावी असे वाटत असते. परंतु त्यांना ती अजिबात मिळत नाही. कारण, राजकारण्यांना शहाणपण शिकवून अनेकदा त्यांनी अकलेचे तारे तोडलेले असतात. अशा पत्रकारांना जवळ करणे म्हणजे अस्तनीत निखारा घेऊन फिरणे! अशी चूक कोणत्याही पक्षाचे श्रेष्ठी सहसा करणार नाहीत. राजकारणात नेहमी विश्वासू माणसांनाच जवळ केले जाते. ह्या दृष्टीने पत्रकारांना तिकीट देण्याचा मूर्खपणा करायला कोणीही तयार होणार नाही.

राहूल गांधी ह्यांना केंद्रीय प्रवेश देण्याचे अनेकांनी जाहीरपणे सुचवले. त्याऐवजी खासदारकी, युवा काँग्रेसचे अध्यक्षपद अशी उमेदवारी करणेच त्यांनी पसंत केले. अजूनही पंतप्रधानपदावर जाण्यापूर्वी त्यांना काँग्रेसमध्ये कार्याध्यक्षपदावर उमेदवारी करणे भाग आहे इकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. वास्तविक, ज्या माणासाचे वडिल, आजी ह्यांना राजकारणात प्राण गमवावे लागले त्या माणसाला राजकारणात वरच्या पदावर जाताना भीती वाटायला हवी. पण तसे घडताना दिसले नाही. राहूल गांधींनी देशात अनेक ठिकाणी भटकंती केली. लोकजीवन जवळून न्याहाळून पाहिले. शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना आपण अजून लग्न का केले नाही ह्या प्रश्नाचे त्यांनी हसत हसत उत्तर दिले. विशीपंचविशीत त्यांनी अंजिठ्या लेण्याचीही सहल केली पण ह्या कानाचे त्या कानाला कळले नाही. दिल्लीला परत गेल्यावर लोकांना कळले की ते महाराष्ट्रात अजिंठ्याला येऊन गेले. मुंबई दौ-यात चक्क लोकलने प्रवास करून निदर्शकांना चकमा दिला. निदर्शकांवर लाठीमार करावा लागला नाही म्हणून पोलिसांनाही दिलासा मिळाला. परंतु वर्तमानपत्रांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही ‘बाजू’ कधी दिसली नाही. (सोनिया गांधी ह्यांनीदेखील आपल्या पहिल्यावहिल्या निवडणूक दौ-यात ज्या तेव्हा मध्यप्रदेशात गेल्या तेव्हा भाषण करताना नर्मदास्ववनाने भाषणास सुरूवात केली होती. तरीही त्यांचा उद्धार इटालियन असाच सुरू होता.)

अलीकडे उत्तरप्रदेश निवडणुकीत त्यांना काँग्रेसला यश मिळवून देता आले नाही ह्यावरून पत्रकारांनी त्यांची लायकी जोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ‘नापास’ केले. भ्रष्टाचार प्रकरणी अण्णा हजारेंच्या आंदोलनावरून संसदेत भाजपाने काँग्रेसला जवळजवळ घेरले. त्या काळात त्यांनी शेवटच्या क्षणी संसदेत एक भाषण वाचून लोकपालपदाची नेमणूक, कार्यपद्धत, सदस्य वगैरे बाबतीत घटनात्मक बदल करण्याचा पवित्रा घेतला आणि लोकशीही आघाडी सरकाची बाजू बळकट केली. हे मुद्दे शेषन् ह्यांनी त्यांना सुचवले असले तरी शेषन ह्यांच्यापर्यंत पोहचण्याचे त्यांना सुचले किंवा ज्या कोणी त्यांना सुचवले असेल ते त्यांनी मान्य करणे ह्यात त्यांचे राजकीय चातुर्य दिसले हे कसे नाकारता येईल? परंतु वर्तमानपत्रातून जे लिखाण प्रसिद्ध झाले त्या लिखाणातून 'युवराज', 'राज्याभिषेक' असल्या बखरवजा भाषेचा वापर झाला. पत्रकारिता अजून निरर्थक भाषेत अडकून पडली आहे ह्याच्यासारखे दुसरे उदाहरण नाही.

राहूल गांधी ह्यांची माझी ओळखही नाही. परंतु वर्तमानपत्रांत बातम्या-लेख वाचताना मला जे जाणवत गेले तेच मी लेखात लिहीले आहे.

रमेश झवर

(सेवानिवृत्त सहसंपादक, लोकसत्ता)