Thursday, September 25, 2014

नमस्ते, भौमः!

असंख्य मुलामुलींच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात रोखून धरण्याचा, भौमा, तुझ्यावर कोणी कितीही आरोप केले असले तरी तू ते मनावर घेऊ नकोसराग  तर अजिबात धरू नकोस. पृथ्वीवरच्या माणसांना खोड आहे आपल्या स्वभावाचं खापर दुस-यावर फोडण्याची पृथ्वीवरच्या असंख्य मानवांना येणारा राग येतो तो केवळ तुझ्यामुळेचपण खरं सांगू का?  अलीकडे वाटायला लागलं राग आलाच पाहिजे. जिकडेतिकडे भ्रष्टाचाराचं साम्राज्य पसरलं असताना ज्याला राग येत नसेल त्याला काय म्हणावंज्याची विवेकबुद्धी शाबूत आहे त्यांना राग येत नाही हाच तर मोठा चिंतेचा विषय आहे.
पण तथाकथित विचारी माणसं तुलाच दोष देतात! कुडमुड्या ज्योतिषांनी  तुला व्हीलन ठरवून टाकलं आहे. त्याला लोक तरी काय करणार? तुझ्याबद्दल लोक वाटेल ते बकत सुटतात!  पण लोकांच्या जिभेला हाड नसतं हे लक्षात ठेवआणि हाड असलं तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता.  म्हणूनच जगभरातल्या शास्त्रज्ञांनी लोकांच्या नादी न लागता सरळ सरळ तुझी भेट घेण्याचा विचार केला. नुसतीच भेट नाही तर तुला अंजारून गोंजारून बघावं, तुझ्या मऊसूत अंगावरून हात फिरवावा, जमलं तर तुझी प्रकृती तपासून पाहावी ह्यासाठी एकच धडपड सुरू केली.
अक्षरशः 51 वेळा तुझ्या दिशेने शोध यान पाठवले. यश मिळाले ते फक्त 21 वेळा. पृथ्वीवरील अमेरिका आणि युरोप खंडातल्या देशांनी तुझा सतत ध्यास घेतला.. एकविसाव्या वेळी मिळालेले यश मात्र अफाट आहे. ते मिळवण्याचा मानही तू भारताला दिला. तुझा स्वभाव पडताळून पाहण्याचा, तुझ्या परिसरातलं वातावरण ढुंढाळण्याचे नाना प्रयत्न आतापर्यंत पृथ्वीवासियांनी केले. युरोपमध्ये तर सतरा देश एकत्र आले होते. पण तू कुणाला फारशी दाद दिली नाही. आता भारतातून तुझ्याकडे पाठवलेल्या मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) ह्या दूताला मात्र तू पहिल्या फटक्यात यश मिळवून दिलेस!  तुझ्या अदृश्य कक्षेपर्यंत पोहोचायला त्याला 322 दिवस लागले  तेथे पोचताच आम्हाला हायसं वाटलं. मात्र सकाळी त्याच्या गतीकडे डोळे लावून बसलेल्यांना तुझा निरोप बरोबर 6-56 वाजता  मिळला. तू तिथपर्यंत पोहोचला लगोलग तुझ्या कक्षेत शिरण्याच्या दृष्टीने  त्याने आपली गती कमी केली. निरोप होता. त्याप्रमाणे गती कमी करण्याची त्वरीत हालचाल सुरू झाल्याचाही सूचना श्रीहरीकोटा येथे जमलेल्या सर्व शास्त्रज्ञांना मिळाली. त्यांना किती आनंद झाला म्हणून सांगू!  पुढे सगळं अपेक्षेप्रमाणे घडत गेलं. मागचं इंजिन 25 मिनीटं धडाडत राह्यलं त्यानंतर स्वतःला परिभ्रमणासाठी त्यानं सज्ज केलं. 7.42 तो थोडा मागे आला. आणि पुन्हा मंद वेगाने तुझ्या कक्षेत तो शिरला. हे सगळं त्याने स्वतःच्या मनानं केलं. तिथपर्यंत पोहोचताना वेग कमीजास्त करणं, उंची खालीवर करणं, मागेपुढं सरकणं तेथे पोहोचताच वेग कमीजास्त करणं ह्या सा-या क्रिया त्याच्या त्यानेच केल्या. त्या यशस्वी होण्यावर सारं काही अवलंबून होतं. सुदैवाने तो यशस्वी झाला. पृथ्वीवर त्याचं नियंत्रण करण्याची मुळी व्यवस्थाच नव्हती. फक्त सगळं काही सुरळित चाललं की नाही ते पाहण्याचे काम मात्र डोळ्यात तेल घालून करत होते सगळे जण.
तुला गंमत वाटेल! पण तुझ्याकडे सुमारे 68 कोटी किलोमीटरपर्यंत दौडत येणारा हा दूत निर्जीव आहे. मात्र दूतवैष्णवाप्रमाणे हा बुद्धिमान आहे. आतापर्यंत जे जे कोणी तुझ्यापर्यंत पोहोचले त्या सगळ्यांपेक्षा हा म्हणे स्मार्ट आहे. त्याला कामाला लावण्यासाठी सूचना द्याव्या लागत नाही. कोणाला काही बाहेरून काही करावंच लागत नाही. त्याचं काम तो स्वप्रेरणेनेच करतो.. हां, त्याला काम मात्र नेमून दिलं आहे. ते म्हणजे तुझ्या अंगप्रत्यंगात कोणता वायू दडला आहे. माणसाच्या शरीरात पाच प्रकारचे वायू असतात असं म्हणतात. प्राण-अपान व्यान-उदान आणि समान ह्या पाच वायूंच्या वेगवेगळ्या कार्यामुळे देह चालतो. पृथ्वीच्या पोटात तर अनेक वायू आहेत. त्या त्या वायूमुळे पृथ्वीचा कारभार अजून आटोपला नाही. खेरीज पृथ्वीवर 21 टक्के प्राणवायु आहे. म्हणून सगळं काही चालंल आहे. तुझ्या अंगप्रत्यंगात मिथेन नामक वायू दडला असावा असा पृथ्वीवासियांचा कयास आहे. तुझा स्वभाव भडक असल्याचे लोक सांगतात!  तुझी कांती तांबूस वर्णाची आहे असं म्हणतात. नव्हे नुसत्या नजरेने पाहणा-यांनाही ते जाणवतं. परंतु आता तुझी छायाचित्रं पाहून तर खात्रीच पटली. त्या तांबूस अंगकांतिचं रहस्यही आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
तुझं रहस्य जाणून घेण्याचा कुणी कुणी प्रयत्न केला नाही?  जपानने 1998 साली केला. त्यानंतर चीनने 2011 साली केला. परंतु ते दोन्ही तोंडघशी पडले. तुझ्याकडे येण्याचा युरोपमधल्या 17 देशांनी मिळून प्रयत्न केला. हे सगळे जण तुझ्याच मागे का बरे लागले? मिथेनचा पत्ता लागला तर तुझ्याविषयी ते अनेक निष्कर्ष काढू शकतात. खरं तर त्यांचा हेतू वेगळाच आहे. तू पृथ्वीचा सहोदर आहेस. त्यामुळे पृथ्वीसारखं वातावरण तुझ्याकडे असण्याचा संभव आहे. थोडक्यात तुझ्या ध्यानात आलाच असेल आमचा हेतू! पृथ्वीसारखं हवापाणी जर तिथे निर्माण करणं शक्य असेल तर लागलीच एफएसआय मंजूर करून तेथे वसाहत करण्याच्या दृष्टीने टीम पाठवण्यात येईल. त्यामुळे तुझी काय नासाडी होईल हे सांगता येत नाही. मात्र, पृथ्वीपुत्रांनी पृथ्वीची बरीच नासाडी करून ठेवली आहे. आमच्या देशातील महाराष्ट्र नामक प्रांतात सध्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने वांधेखोरीला जोर आला आहे. तुला म्हणून सांगतो, सगळ्या वांधेखोरीच्या मुळाशी एफएसआय प्रकरणच असतं. एफएसआय देण्यावरून मंत्रिमंडळात भांडणं सुरू असतात. तो देण्याचा अधिकार मला पाहिजे, त्याला नको, हाच खरा मुद्दा आहे. किती पैसा करता येईल ह्याचा हिशेब करून मगच जागांची मागणी, मुख्यमंत्रीपदाची मागणी असले मुद्दे उपस्थित केले जात आहे. असो. त्यामुळे मॉमला तुझ्याकडे पाठवलं, नेमून दिलेल्या कामात मॉम यशस्वी झाला. पण कोणाला तुझ्याकडे पाठवलेल्या दूताशी घेणं देणं नाही
मंगळावर वस्ती? कशाला फिकीर करू? माझ्या हयातीत ते होणार नाही. माझ्या मुलाबाळांच्या हयातीतही तेथे वस्ती करण्याचा विचार सुरू होणं शक्य नाही. आम्ही रोकडा विचार करणारी माणसंशेपन्नास वर्षांनंतरचा सौदा आताच कशाला करू?  टिकट मिला तो सबकुछ मिला. एक सधा सब सधै! प्रॉमिस, तुझ्याकडे येण्यासाठी बुकिंग सुरू झालं तर पहिलं बुकिंग मुंबईतनं!  दिल्ली, श्रीहरीकोटाचे प्रवासी तुला मिळतील. पण ते सगळे एकजात फुकटे! वाटलं तर मंगल जर्नीची एजन्सीदेखील आम्ही घेऊ. त्याच्या  उद्घाटनालाही येऊ. कारण शास्त्रज्ञांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय. पृथ्वीवासियांचा भूतकाळच नव्हे; तर  भविष्यकाळ  जाणून घेण्याची उत्सुकता हेच मॉमचे ध्य़ेय आहे. आमचा शास्त्रज्ञांवर पूर्ण भरवसा आहे. ते  त्यांची कामगिरी अगदी माफक खर्चात बजावतीलपहिल्या अधिवेशनात शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊ!
भौमा, तू पृथ्वीचा धाकटा भाऊ आहेस की नाही हे आम्हाला अजून माहीत नाही. पण जरा सबुरीने घे. तुला जाता जाता विनंती. धसमुसळेपणा नकोस. हां, आणखी एक, बाबारे मदत करात आली नाही तरी चालेल, पण कुणाचंही लग्न मोडू देऊ नकोस! जमलं तर न्य़ायालयात पेंडिंग असलेली घटस्फोटांची प्रकरणं कमी कर.

रमेश झवर


भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

Thursday, September 18, 2014

आत्मविश्वासाचा अभाव!

सेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी ह्या दोन आघाड्यांत जागावाटपाबाबत एकमत झाल्याची घोषणा झाली तरी त्या घोषणेला फारसा अर्थ नाही. एखाद्या उमेदवाराला टांग मारून कसे पाडावे ह्याचे विधिनिषेधशून्य गुप्त समझौते करण्याबद्दल महाराष्ट्र आणि हरयाणा ही दोन्ही राज्ये कुप्रसिध्द आहेत.  किंबहुना पाय खेचून पाडण्याच्या कोणी उद्या पीएचडी करायचे ठरवले तर त्याला ती सहज मिळू शकेल; मात्र ह्या विषयावर पीएचडी करण्याची एखाद्या विद्यापीठाची मंजुरी मिळायला हवी!
एकमेकांबरोबर जागावाटपावर वाटाघाटी सुरू असताना स्वबळावर निवडणूक लढवण्याची एक डरकाळीही फोडायची असते. डरकाळी फोडण्याच्या बाबतीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या चारी पक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत उद्धव ठाकरे ह्यांनी स्वबळाची भाषा सुरू करताच भाजपा नेत्यांनीही स्वबळाची भाषा सुरू केली. आपल्याकडे स्वबळ आहे तर मग वाटाघाटींचा खटाटोप करत बसण्याची गरज काय, असा प्रश्न शहा, फडणविस, ठाकरे ह्यांना अजून तरी कोणी विचारलेला  नाही.
जी स्थिती युतीची तीच स्थिती काँग्रेस आण राष्ट्रवादी आघाडीची आहे. सेना-भाजपा नेत्यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या देदीप्यमान यशाची पार्श्वभूमी आहे तर काँग्रेसला ग्रामीण भागातल्या निडणुकीच्या राजकारणातली समीकरणे सोडवण्याचा दांडगा अनुभव तर आहेच; खेरीज वाटाघाटींच्या सहाआसनी गाडीत सातआठ माणसे कोंबून चालवण्याचेही कौशल्यही आहे.
एकदोन दिवसात जागांबाबत एकमत झाल्याच्या घोषणा जरी झाल्या तर त्या निव्वळ घोषणाच राहतील. सांधलेल्या यंत्राचे पार्ट मधेच निखळून पडावेत तसे युती-आघाडीतील आमदार केव्हाही निखळून पडतील असे चित्र आहे. युतीतल्या वाटाघाटीत माथूर-फडणविस आणि ठाकरे-संजय राऊत ह्यांचा समावेश असला तरी माथूर-फडणीस ह्यांच्यावर शहा-मोदींचा जसा अंकुश आहे तसा ठाकरे-राऊत ह्यांच्यावर नाही. दुसरे म्हणजे संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्तेही असल्यामुळे ते रोज नवा नवा मुद्दा उपस्थित करून भाजपाच्या सौद्यात नित्य नवा वांधा टाकू शकतात! अर्थात अमित शहा ह्यांची योग्यता ह्या सगळ्यांचे गुरु ठरावेत अशी आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत तर अजून राष्ट्रवादीला वाटाघाटींचे आवतनही गेले नाही. ते खरे असावे. कारण स्वबळावर निवडणुकीची घोषणा कधी नव्हे ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी स्वतःच केली आहे. तुम्ही जास्त जागा मागणे कसे चुकीचे आहे हे राष्ट्रवादीला पटवून सांगण्याचे कामही काही मंडळींवर सोपवण्यात आले असावे.  तेही सुरूच आहे. जास्त जागा मागितल्या की आपल्याला हव्या असलेल्या जागा मिळतील असा राष्ट्रवादींच्या नेत्यांचा समज जुना आहे तो चुकीचाही नाही. काँग्रेसवाल्यांना तो माहीत नाही असे मुळीच नाही. म्हणूनच पृथ्वीराजजींनी स्वळाची घोषणा करून सगऴ्याच जागांची मागणी केली असावी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा तो एक मार्ग असतो. पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेलेल्या आहेत. त्या परत येईपर्यंत काँग्रेसमध्ये काही घडणार नाही हे उघड आहे. परंतु थिएटरमध्ये कार्यक्रम सुरू होईपर्यंतच्या वेळेत ध्वनीक्षेपकावरून सतत काही तरी बोलत राहावे लागते. आघाडीचा तो कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान भय्याजींसारखी  सरकारी संतमंडळीही कामाला लागली आहेत. ह्या मंडळींचे एक बरे असते. त्यांना मध्यस्थी करायला या असे निमंत्रण द्यावे लागत नाही. ते सु मोटो ह्या कामाला लागतात. बरे, नाही जुळले तर केव्हाही हात झटकून मोकळे होता येते. आजीमाजी मंत्री त्यांना मदतही करत असतात.
दोन्ही तंबूतल्या वाटाघाटींत एक मात्र चांगले आहे. कोणी कोणाची फिरकी घेत नाही. एक्स्ट्रा पोलाईटनेसची इंजेक्शनं मस्ट असावीत. दरम्यानच्या काळात आमदारांचा ह्या पक्षातून त्या पक्षात प्रवास सुरू आहे. तो मुद्दाम घडवूनही आणला जात असावा. हे उघड आहे. त्या गुप्त वाटा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना माहीत आहेत. अधिकृत वाटाघाटीं सुरू ठेवताना मध्यंतरीत जो काही थोडाफार अवसर मिळतो  तो ह्या गुप्त वाटांवरील प्रवाशांचे अपडेट्स मिळवण्यासाठी उपयोगात आणला जातो हे आता ओपन सिक्रेट आहे.
ज्यांच्यासाठी रात्रंदिन वाटाघाटी सुरू आहेत ते आमदार कसे आहेत? सध्याच्या 288 पैकी 148 आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यापैकी 94 जणांवर खून, अपहरण आणि दरोडेखोरी ह्यासारखे गंभीर गुन्हे  नोंदवलेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बाबतीत कोणत्याही पक्षाचा अपवाद नाही. काँग्रेसच्या 81पैकी 24 आमदारांविरद्ध गुन्हे नोदण्यात आले आहे तर राष्ट्रवादीच्या 61 पैकी 25 आमदारांविरूद्ध गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाच्या 46 पैकी 28 आमदारांविरूद्ध खटले असून शिवसेनेच्या 45 पैकी 35 आमदारांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 198 आमदार करोडपती असून बहुतेकांची संपत्ती सरासरी चारसाडेचार कोटींच्या घरात आहे. हे सगळे आमदार तिकीटेच्छू असून यंदा तिकीट नको असे म्हणायला कोणी तयार नाही. सगळ्यांना ह्या ना त्या कारणासाठी तिकीटे द्यावीच लागतील!  इतकेच नव्हे तर, वेळ आली तर त्यांच्या मुलांनाही तिकीट द्यावे लागेल.
हे सगळे आमदार लोकप्रिय असून त्यांच्याकडे काँग्रेसस्थापित निवडणूक मेरिटच्या निकषावर सगळे जण खणखणीत वाजणारे नाणे आहेत. परंतु वैधानिक कामकाजात त्यांची कामगिरी कशी होती हा प्रश्न विचारण्यात हशील नाही. प्रशासन यंत्रणेला वाकवून कामे करवून घेण्याच्या बाबतीत ह्या सगळ्यांचा हातखंडा आहे. त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्याची तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात नाही. परंतु त्यांच्या पक्षाचे नेतेही त्यांना तिकीटापासून वंचित ठेवू शकत नाहीत. यदा कदाचित त्यांना तिकीट नाकारलेच तर बहुमताचा आकडा गाठण्याच्या मार्गावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरेल. म्हणून तर वाटाघाटीतल्या दोन्ही बाजूंचे मुद्दे सकृतदर्शर्नी बिनतोड वाटत असले तरी दोन्ही बाजूंत असलेला आत्मविश्वासाचा अभावही प्रकर्षाने जाणवत राहतो.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

 

Friday, September 12, 2014

शांतता, गुर्‍हाळ चालू आहे!

सेना-भाजपा युती असो की काँग्रेस राष्ट्रवादी असो, वाटाघाटींचे गु-हाळ चालू असल्यामुळे एकमेकांसाठी किती जागा सोडायला दोन्ही बाजूंचे नेते तयार आहेत हे जाहीर झाले नाही. त्यामुळे निव़डणूक जाहीर झाली तरी जागावाटपाची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. विधानसभा निव़डणूक एकत्रितरीत्या लढवायाची एवढे सामंजस्य मात्र टिकून आहे हे नशीब म्हणायला हवे! भाजपाला लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पूर्ण बहुमत मिळवता आले तसे बहुमत विधानसभा निवडणुकीतही मिळवता येईल का, असा भाजपापुढे प्रश्न निर्माण झालेला असू शकतो. कदाचित् थोडी तडजोड मान्य केल्याखेरीज जागावाटपाचे गु-हाळ पुढे सरकणार नाही अशीही अवस्था  असू शकते. अन्यथा एव्हाना निवडणुकीची घोषणा झाली असती. जागावाटपाच्या वाटाघाटींचे अडकलेले  गु-हाळदेखील जागच्या जागी थांबले नसते. म्हणूनच सध्या पितृपक्षाचा अशुभ काळ सुरू असल्याचे कारण पुढे करण्याची वेळ युतीवर आली आहे. सगऴे श्राद्धादि कर्मात अडकले असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात पेरण्याची देखील त्यांच्यावर पाळी आली. जागावाटपात शिवसेनेला 143 तर भाजपाला 145 जागा देण्याचे ठरले असून दोन्ही पक्षांनी आपल्या वाटणीच्या समसमान जागा युतीतल्या अन्य पक्षांसाठी सोडाव्यात असे ठरले असल्याचीही बातमी एका वर्तमानपत्रातील्या युतीशी घरोब्याच्या संबंध असलेल्या पत्रकाराने दिली आहे.
सेना-भाजपा युतीत अलीकडे लहान भाऊ मोठा भाऊ असा शब्दप्रयोग करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख करण्यात येत होता. आता बाळासाहेबही नाहीत. परिस्थितीही बदललेली! मुळात देशभर अस्तित्वात असलेले भाऊबंदकी कल्चरला युतीदेखील अपवाद नाही.  आतापर्यंत वडिलकीचा मान शिवसेनेकडे होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला संसदेत पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे वडिलकीचा मान आमचाच अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे देऊ तितक्या जागा मुकाट्याने घ्या असे वाक्य न उच्चारता भाजापने जागावाटपाचे गु-हाळ अडवून ठेवले आहे हे एव्हाना शिवसेनेच्या लक्षात येऊन चुकले आहे. परंतु तसे मोकळेपणाने कबूल केले तर शिवसेनेच्या वडिलकीला बट्टा लागतो. दुसरे म्हणजे प्रेशर बिल्ड अप करण्याची कामगिरी ज्यांच्यावर सोपवली आहे त्यांचीसुद्धा सन्माननीय सुटका होणेदेखील गरजेचे असते. म्हणून काही वेगळ्याच सबबी सांगण्याचा प्रकार सुरू आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतला तिढाही युतीपेक्षा फारसा वेगळा नाही. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा शड्डू ठोकण्याचे काम अजितदादांवर सोपवले गेले होते. शरदरावजी मात्र समंजस वक्तव्य करत काँग्रेसबरोबरचे संबंध बिनसणार नाही अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. परंतु काँग्रेस आघाडीत जागावाटपाचे गु-हाळा मात्र अद्यापही सुरू करता आलेले नाही. जागावाटप म्हणजे तरी काय? निश्चित विजयी होणा-या उमेदावाला तिकीट देण्याचा आग्रह धरणे. काँग्रेस कल्चरमधला हा प्रश्न तसा जुनाच, त्याचे उत्तरही जुनेच! त्यामुळे अपक्षांना आधी पक्षात सामील करून घेण्याचे काम सुरू झाले असून एकूण गांभीर्य लक्षात घेऊन अनेकांनी काँग्रेसचा रस्ता धरला आहे. राष्ट्रवादीलाही आपली दारे उघडी ठेवणे भाग आहे. परंतु विधानसभेत बहुमत प्राप्त करून सत्ता आणणे बदलत्या परिस्थितीत कठीण होऊन बसले आहे ह्याची जाणीव सगळ्यांना झाली आहे.  त्यातून काहींनी ह्यापूर्वीच भाजपाचा रस्ता धरला आहे तर काही शिवसेनेकडे झुकण्याच्या विचारात आहेत. वाटाघाटींचे गु-हाळ सुरू असताना घुंघरूच्या आवाजाकडे लक्ष ठेवून असणा-यांची संख्याही कमी नाही.
एक मात्र खरे! स्वबळावर तर सोडाच आपली आघाडी टिकवूनदेखील बहुमत आणता येईल की नाही ह्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पक्षांतील नेत्यांना शंका आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी स्वतःच स्वतःची लाट निर्माण केली तशी लाट आपणही निर्माण करावी असे राज्यातल्या अनेकांना सुरूवातीला वाटले. मोदींनी पहिल्यांदा भाजपातल्या त्यांच्या विरोधकांना मोडून काढले. नंतर व्टिटर, फेसबुकसारख्या सोशल मिडियावर भर दिला. स्वतःचा प्रचार आणि काँग्रेसवर प्रहार असे दुहेरी तंत्र त्यांनी अत्यंत प्रभावीरीत्या राबवले. स्वतः देशभर झंझावाती दौरे करून जाहीर सभा घेतल्या. त्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपणही करवले. काँग्रेसविरूद्ध अवघा रणकल्लोळ माजवला. आपणही तसे काही केले तर मोदी लाटेने जी किमया केली तशी किमया आपल्यालाही घडवून आणता येईल हा सुरूवातीचा भ्रम हळुहळू निवळला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, नारायण राणे वगैरे मंडळींचा तो आविर्भाव अल्पावकाशात संपला. सगळ्यांनी पुन्हा एकदा जागावाटपाच्या हातखंडा तंत्रावर लक्ष केंद्रित केले. म्हणजेच निवडणुकीचे राजकारण पुन्हा एकदा आत्मविश्वासाच्या अभावाच्या गर्तेत सापडले!
विधानसभा निवडणूक लोकसभेपेक्षा कठीण ह्या निष्कर्षावर सगळे बुद्धिबळपटू आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव पुढे करण्यात आले होते. तसे मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव पुढे करायचे हादेखील प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस? विनोद तावडे? की पंकजा मुंढे? शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे तर ते कोणाला द्यायचे? मनोहर जोशींचे नाव कधीच बाद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे नाव सोडले तर कोणाचे नाव पुढे करायचे? ज्याचे नाव पुढे करता येईल असा नेता कोण आहे? काँग्रेसमध्ये नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यांच्याखेरीज पतंगराव कदम, अशोक चव्हाण ह्यांचीही नावेही आहेत. राष्ट्रवादीत अजितदादा ह्यांचा क्लेम निर्विवाद आहे हे खरे; परंतु आरआऱआबा. छगन भुजबळ ह्यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपद भूषवले असल्याने तेही क्लेमपात्र आहेतच. परंतु राज्यभर दौरे करून बहुमत मिळवण्याची धमक दोन्ही पक्षातल्या कोणत्या नेत्यात आहे? परंतु राज्याच्या राजकारणात वावरणा-या नेत्यांच्या नेतेपदाच्या महत्त्वाकांक्षा पाहता ह्या सगळ्यांची स्थिती पानीमां म्हस बाम्हन बाम्हनीले मारस अशी आहे! त्यामुळे युतीआघाडी असली तरी निखळ बहुमत आमचेच हे अजून तरी स्वप्नरंजनच आहे.

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

वाचा  गेस्ट एडिटर विश्वास रानडे ह्यांचा लेख 'कोळसाः न उगाळलेला!'..www.rameshzawar.com

Friday, September 5, 2014

खुबीदार नारा

विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली तरीही निवडणुकीची घोषणा झालेली नाही. दिवाळी-दस-याच्या सणाचा निवडणूक प्रचारात अडथळा नको अशी सर्व संबंधितांची इच्छा असल्याने निवडणुकीच्या तारखा ठरवण्याच्या बाबतीत निर्वाचन आयोगात घोळ सुरू आहे. परंतु प्रचारात येणा-या अडथळ्याचे हे कारण खरे वाटत नाही. तारखांचा घोळ हे एक कारण आहे. पण ते एकमेव नाही. खरे कारण वेगळेच असले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या धुंदीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे ठरेल, असे भाजपा नेत्यांना वाटत असावे. निवडणुकीला सामोरे जाताना निदान जागा वाटपावरून तरी धुसफूस नको. हा बखेडा वेळीच मिटवला नाही तर युतीच्या ताकदीसह स्वतःचे बहुमत ह्या भाजपाच्या धोरणावर पाणी पडू शकते! अमित शहांना विदारक वास्तवाची जाणीव असावी. म्हणूनच आधी शिवसेनेबरोबर शतप्रतिशत सलोखा आणि नंतर भजपाची शतप्रतिशत यशाची व्यूहरचना ह्या मूळच्या धोरणाला नवा पॅच जोडण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबई भेटीचे सगळे सोपस्कारही त्यांनी यथास्थित पार पाडले. विमानतळावर उतरताच अब सब महाराष्ट्र हा नारा त्यांना ऐकवण्याची तजविज फ़डणवीस-तावडे ह्या जोडगोळीने चोख बजावली.
अब सब महाराष्ट्र हा नाराही खुबीदार आहे! त्यात महाराष्ट्रात युतीच्या सत्तेबरोबर भाजपाचे बहुमतही समाविष्ट आहे. राहता राहिला शिवसेनेच्या भावना कुरवाळण्याचा प्रश्न. तोही अमित शहांनी कसलेल्या बनियाप्रमाणे अलगद सोडवला. मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटण्याची संजय राऊतनी केलेली विनंती तर शहांनी मान्य केलीच; खेरीज आधी बाळासाहेबांच्या स्मारकास भेट देऊन श्रद्धांजलीदेखील वाहिली. शिवसेनेला एकूण जागांच्या 50 टक्केच जागा शिवसेनेला हव्या आहेत असे नव्हे, तर अन्य सहकारी पक्षांना ज्या जागा द्यायच्या त्या देऊन झाल्यावर उर्वरित जागांच्या 50 टक्के जागा शिवसेनेला हव्या आहेत. शिवसेनेची ही मागणी मान्य करायची की युतीला मिळणा-या संभाव्य यशाला निवडणुकीपूर्वीच गालबोट लावून घ्यायचे असा हा तिढा आहे.
उत्तर प्रदेशची सगळी जबाबदारी नरेंद्र मोदींनी अमित शहांवर टाकली होती. त्या वेळी अमित शहांनी जे कौशल्य दाखवले तेच कौशल्य महाराष्ट्राच्या विधानसभा निव़णुकीच्या वेळी दाखवावे अशी खुद्द नरेंद्र मोदींची अपेक्षा आहे. ही अपेक्षा बरोबरच आहे. कारण भाजपाला राज्यासभेत बहुमत नाही. जोपर्यंत दोन्ही सभागृहात बहुमत नाही तोपर्यंत उतू नका मातू नका असाचा आदेश भाजपातील देशभरातल्या आमदार-खासदारांना, नेत्यांना, उपनेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. सर्वांना बरोबर घेऊन सरकारला देश पुढे नेण्याचे काम करायचे आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांनी दूरदर्शनला मुलाखत देताना, स्पष्ट सांगितले. सरकार चालवण्यासाठी जे आवश्यक तेच विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीदेखील आवश्यक आहे. अमित शहांनी हे भान बाळगलेले दिसते. म्हणून उद्धव ठाकरे म्हणतील त्याप्रमाणे उठाबस करण्यास अमित शहा तयार झाले. मुंबई भेट हे त्याचे प्रात्यक्षिकच म्हणायला हरकत नाही. अमित शहा हे कोल्हापूरचे पाहुणे आहेत. महाराष्ट्राचा मान राखायला पाहुणे चुकले नाहीत. आता पाहुण्याचा मान राखायला शिवसेना चुकणार नाही! एकूण निवडणूक होऊन जाईपर्यंत तरी दोन्ही पक्षात सुरू असलेला आणि काँग्रेस आघाडीला हवी असलेली कुरबूर संपुष्टात येणार असाच संदेश मोदीदूत अमित शहांनी दिला आहे.
काँग्रेसमधली परिस्थिती मात्र सेना-भआजपा युतीतल्या परिस्थितीच्या बरोबर उलट आहे! एकमेकांवर गुरगुरण्याचा मक्ता काही एकट्या अजितदादांनी घेतलेला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनीदेखील राष्ट्रवादीवर अधुनमधून गुरगुरण्याचे  टेंडर भरलेले आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी असा पेटंट युक्तिवाद दोन्ही काँग्रेस स्वतःशी करत आहेत. मोदी लाट थोपवण्यासाठी ह्याच सूत्राचा आधार काँग्रेसवाले घेणार हे भाजपाने आधीच हेरून ठेवले आहे. म्हणून अमित शहांनी मुंबई दौ-यात पहिली तोफ डागली ती काँग्रेसविरूद्ध! मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांची मुळात नियत साफ नाही म्हणून तर दुष्काळ, गारपीट, अशा अस्मानी संकटांना महाराष्ट्राला वारंवार तोंड द्यावे लागते, ह्या अमित शहांच्या विधानाने भाजपाच्या प्रचाराची दिशा स्पष्ट झाली. दुष्काळपीडितांना, संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी काँग्रेस सरकार नेहमीच पुढे सरसावले आहे ह्या काँग्रेसकडून होणा-या पेटंट मुद्द्यातले फोलपण दाखवून देताना नियत वगैरेचा अमित शहांनी उपस्थित केलेला मुद्दा बुद्धिवाद्यांना झोंबणारा आहे ह्यात शंका नाही. परंतु बाजारपेठा गल्ली, चव्हाटे येथे हिरिरीने चालणा-या चर्चांना ह्या मुद्द्यामुळे खचितच खाद्य पुरवले जाईल. भाजपाविरूद्ध सेक्युलरवादी काँग्रेसकडे मुद्दे शिल्लक उरलेले नाहीत. गांधींजींच्या खुन्यांना निवडून देऊ नका, हिटलरी प्रवृत्ती असलेल्यांना पाडा वगैरे मुद्दे कधीच संपलेले आहेत. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्यांच्यातली संदोपसुंदी गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्याचाच फायदा सेना-भाजपा युतीला मिळू शकतो.
रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता