Wednesday, January 10, 2024

                                 द्रष्टा पंचागकर्ता

पंचांगांचा  खप हा वर्तमानपत्रांच्या खपाची बरोबरी करू शकणारा असू शकेल असा माझा तर्क आहे.  खपाचा मुद्दा ठेवला तरी अलीकडे पंचांगही वर्तमानपत्रांइतके लोकप्रिय ठरले आहे. पंचांगकर्त्यांच्या संघटनेने का कोणास ठाऊक वर्तमानपत्राच्या खपाशी स्पर्धा करण्याचा दावा कधी केला नाही. अर्थात त्याचेही कारण आहे. त्यांना खपाचा दावा करून जाहिराती मिळवायची इच्छा नाही हे एक आणि बहुतेक पंचांगकर्ते हे टायनी सेक्टरमध्ये आहेत. त्यांना संघटित सेक्टरमध्ये प्रवेश करून गडगंज नफा कमावण्याची इच्छा नाही.

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण ह्यांची पंचांगे तर प्रसिध्द आहेत. त्याखेरीज ते आघाडीवरील खगोल अभ्यासक आहेत. आकाशदर्शनावर त्यांनी असंख्य व्याख्याने दिली  आहेत. अगदी इस्पितळात दाखल झालेले असूनही त्यांनी व्याख्यानाचे आमंत्रण स्वीकारले आणि डॉ. भानुशाली ह्यांच्या परवानगीने ते रुग्णाचा युनिफॉर्म काढून ठेवला. नेहमीच्या पोषाखात भाषण देऊन आले पुन्हा रुग्णशय्येवर आडवे झाले. एखाद्या विषयावर निष्ठा असली की कसा चमत्कार घडतो ह्याचे उदाहरण अलीकडे प्रसिध्द झालेल्या त्यांच्या  आठवणींची आकाशगंगा ह्या पुस्तकात दिले आहे. नेहमीच्या पंचांगांत तिथी, वार नक्षत्र, करण, सुर्योदय- चंद्रोदय इत्यादि तपशील तर सोमण देतातच; परंतु आधुनिक वाचकांच्या सोयीसाठी नेहमीच्या आकारातली पुस्तकेही प्रसिध्द करतात. अर्थात बहुतेक पंचांगकरत्यांनी अशा प्रकारचे बदल केले आहेत. भिंतीवर लावायचे कॅलेंडरही अलीकडे लोकप्रिय होऊ लागली आहेत.

पंचांगकर्त्यांची संमेलने, बैठका अलीकडे वर्षांतून एकदा का होईना भरू लागल्या आहेत. त्या बैठकीच लोकमान्य टिळकांनी प्रतिपादन केलेल्या दृक पंचांगाच्या थियरीनुसार पंचांग तयार करण्याचे सर्वमान्य निर्णय घेण्यात आला. दृक थीयरी म्हणजे आकाशातल्या भ्रमणानुसारच पंचागातही ग्रहपालटाच्या तारखा, वेळा इत्यादी दिल्या जातात. पंचागात एक आणि प्रत्यक्ष आकाशात वेगळेच असा प्रकार आता कायमचा बंद झाला आहे. हा बद्ल घडवून आणण्यासाठी दा. कृ. सोमण आणि दाते पंचांगकर्ते धंडीराजशास्त्री दाते ह्या दोघांनी राष्ट्रीय बैठकात हा मुद्दा हिरीरीने मांडला आणि सर्वांनी तो मान्य केला. त्यामुळे पंचांगांच्या विषयातले सारेच घोळ संपुष्टात आले.

विशेष म्हणजे दा. कृंचे वडिल हे जुन्या पिढीचे होते. स्वत: दाकृंनी मात्र स्वत:च्या आयुष्यात कर्मठपणाला कधी थारा दिला नाही. लोकांच्या माहितीत भर पडावी ह्या हेतूने महाराष्ट्रभर व्याख्यानसत्र सुरू ठेवले.मुळात वस्त्रोद्योगाचे शिक्षण घेऊन त्यांनी मफतलाल मिलमध्ये नोकरी केली. वयाची ५० वर्षे पुरी झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला. तरीही मफतलाल मिलचे मालक अरविंद मफतलाल ह्यांच्या विनंतीखातर त्यांनी कामगारांना ट्रेनिंग देण्याचे काम त्यांनी पत्करले. त्यांच्या कीर्तीमुळे अनेक गिरण्यांकडून त्यांना ट्रेनिंगव्याख्यानासाठी निमंत्रणे येतात. वेळ काढून ती निमंत्रणे ते स्वीकारतात.

चांद्रयान मोहिमांच्या काळात अनेक संघटनांनी त्यांना विश्लेषणासाठी पाचारण केले. आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रावर त्यांचे कार्यक्रम अजूनही सुरूच असतात. विशेष म्हणजे पंचागांचा उपयोग फलज्योतिषासाठी वारंवार करावा लागतो. गुरू पालट आणि शनिपालट हे भविष्यकथनात महत्त्वाचे निकष ठरतात तर  मुंज, विवाह इत्यादि मंगल कार्यासाठी पंचांगाचा वापर सोयिस्कर  ठरतो, अलीकडे पंचांगात शुभमुहूर्ताचे दिवस काढून दिलेले असतात. ज्यांना ग्रहपालटाविषयी अधिक बारकाईने अभ्यास करण्याची गरज वाटते त्यांच्यासाठी रोजचे अंशात्मक बदल दिलेले असते. ते वाचण्याचे तंत्र एकदाचे आत्मसात केले की पंचांगाची आवश्यकता वारंवार पडते. दाकृंनी ह्याचा विचार केला. त्यांनी एक छोटी पुस्तिकाही प्रसिध्द केली आहे. ह्या पुस्तिकेत आगामी ५ वर्षांतील सण, महत्त्वाचे दिवस वगैरे माहिती उपलब्ध करून दिली आहे. ह्या पुस्तिकेमुळे पंचांगाचा खप कमी होईल असे त्या वाटत नाही. उलट, पंचांग लोकप्रिय होण्यासही त्यामुळे मदत होईल असे मला वाटते. त्यांच्या पुस्तकाचा संच आवर्जून खरेदी करावा असा आहे.

रमेश झवर