Thursday, January 23, 2020

लढाई जिंका, तहात हरू नका!


एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी न्यायालयाचा मार्ग अवलंबावा की आंदोलनाचा? संसदेतले विवेकशून्य बहुमत आणि विरोधकांबद्दल अनादराची आणि वैमन्यस्याची भावना ह्यामुळे गेल्या काही वर्षात संसदीय चर्चेचा मार्ग प्रभावशून्य ठरला आहे. आंदोलनाचा मार्ग अवलंबणेही प्राप्त परिथितीत योग्य ठरत नाही. कारण, आंदोलने पाहता पाहता समाजकंटकांच्या हातात जाण्याचा धोका समोर दिसत आहे. ह्या परिस्थितीत न्यायालयाच्या मार्ग त्यातल्या त्यात योग्य ठरतो. नागरिकत्व देण्याचा आणि नागरिकत्व नोंदणीपुस्तकाचा कायदा तसेच ह्या कायद्याशी जनगणना नोंदणी पुस्तकचा कायदा संलग्न करण्याच्या सरकारच्या प्रयत्नावरून देशात मोठे राजकीय वादळ उसळले. ह्या पार्श्वभूमीवर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या अमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला हे योग्यच झाले. ह्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या १४४ याचिकांची सुनावण करण्यासाठी ५ न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करण्याचा आणि सरकारला आपली बाजू मांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश स्वागतार्ह आहे.
ह्या प्रकरणी मह्त्त्त्वाची गोष्ट अशी की ह्या प्रकरणांत गुंतलेल्या घटनात्मक मुद्द्याचा विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुरेसा अवधी हवा आहे. सर्वोच्च न्यायालय जनभावनेच्या लाटेवर आरूढ व्हायला तयार नाही. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या घटनात्मकतेबद्दल न्यायालयीन युक्तिवादांमुळे निकाल लांबणीवर पडेल ही भीती निरर्थक आहे. ह्याचे कारण कुठल्याही परिस्थितीत सप्टेंबरमध्ये सुरू होणारी जनगणना थांबवण्याचा निकाल न्यायालयाकडून दिला जाण्याचा संभव दिसत नाही. राजकारणातल्या सा-या व्यक्तींनी न्यायालयान किमान विश्वास ठेवला पाहिजे. नागरिकत्व कायद्यात मुस्लिम वगळता अन्य धर्मांचा उल्लेख करण्यात आल्यामुळे कायद्याच्या घटनात्मकतेबद्दल संशय निर्माण झाला आहे. तो संशय निर्माण होण्याची कारणे आहेत. आधार कायद्यासह अनेक कायदे सरकारने वित्तीय विधेयक कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला होता. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट जारी केलेली असताना काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. हे करत असताना काश्मिरी नेत्यांना स्थानबध्द करण्यात आले. इंटरनेट आणि मोबाइल सेवा खंडित करण्यात आल्या. हे सगळे सरळपणे करण्याऐवजी सरकारला आडमार्गाने का जावे लागले हा प्रश्न आहे!
निवडणुकीच्या विरोधकांना प्रचंड बहुमत मिळाले तरी देशाचे भवितव्य बदलून जाईल अशा प्रकारच्या बदल कायद्यात करताना विरोधकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सरकारने केला नाही. तसा प्रयत्न करावा असेही सरकारला वाटले नाही. इंदिरा गांधी पंतप्रधन असताना त्यांच्यावर एकतंत्री कारभाराचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप करण्यात भाजपानेही पुढाकार घेतला होता. इंदिरा गांधींची निदान कोटरी तरी होती. सरकारी निर्णय प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या दोघांखेरीज कोणाला महत्त्व दिले जात नाही हे अनेक वेळा दिसून आले. अर्थ खात्याचा कारभार निर्मला सीतारामने पाहतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहतात? संसदीय लोकशाहीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असते. अलीकडे निर्मला सीतारामन् ह्यांनी नागरिकत्व कायद्यासंबंधी वक्तव्य केले तर अर्थखात्याशी संबंधित वक्तव्य प्रकाश जावडेकरांनी केले!  हे सगळे विचित्र आहे. भाजपाच्या पक्षाध्यक्षपदी जे. पी. नड्डा ह्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रेसला महत्त्व देण्याची गरज नाही; तुम्ही थेट जनतेशी संपर्क ठेवा असा उपदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपातील दुय्यम पुढा-यांना केला. सत्ताप्राप्तीनंतर सहा वषे होत आली तरी त्यांना प्रेसबद्दल विश्वास वाटत नसेल तर तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला उणेपणा आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकशाही राजकारणाला अनुकूल नाही असेच म्हणणए भाग आहे.  
न्यायालयीन प्रक्रियेबद्दल सर्वसाधारण जनतेचे काहीही मत असले तरी विरोधकांनी मात्र न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आदर बाळगणे आवश्यक आहे. नागरिकत्व कायदा आणि लोकसंख्या नोंदणी कायदा ह्यांची अमलबजावणी करण्यास नकार देण्याचा पवित्रा केरळ आणि पंजाब ह्या दोन राज्यांनी घेतला. इतकेच नव्हे तर तसा त्यांच्या विधानसभांनी ठराव संमत केला आहे. आणखीही काही राज्यात असा ठराव संमत होण्याचा शक्यता आहे. राज्यांचा हा पवित्रा बेकायदेशीर ठरेल असा इशारा कपिल सिब्बल ह्यांनी दिला. नागरिकत्वाचा कायदा करण्याचा अधिकार केंद्राचा असून त्या कायद्याला विरोध करण्यास मर्यादा आहेत. म्हणूनच न्यायालयीन लढाईचाच मार्ग तूर्त तरी योग्य ठरतो असाच कपिल सिब्ब्ल ह्यांच्या इशा-याचा गर्भित अर्थ आहे. विरोधी पक्षाला लढाई  तर  जिंकायची आहे आणि तहात हरायचे मात्र नाही!
रमेश झवर   

Tuesday, January 14, 2020

महागाईचा राक्षस

गेल्या डिसेंबरात महागाईचा दर ७.३५ टक्क्यांवर गेल्याचा आकडा नुकताच जाहीर झाला. खुद्द केंद्रीय सांख्यिकी केंद्राकडूनच हा आकडा जाहीर करण्यात आल्याने सरकारचे डोळे उघडावेत अशी अपेक्षा आहे. तूर्त तरी जीडीपीत घट, महसुलाला लागलेली गळती आणि सरकारी खर्चात होणारी वाढ ह्या विषयांखेरीज सरकारला कशाचीही चिंता नाही. सरकारचे निर्देशांक काहीही सांगोत, २०१४ पासूनच महागाई वाढू लागली होती. तरीही वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करून उद्योजकांना ‘मूंह मांगे’ दराने कर्ज उपलब्ध करून देण्यावर दिवंगत अर्थमंत्री अरूण जेटली ह्यांनी भर दिला. उद्योजकांना स्वस्त दराने कर्ज मिळाले पाहिजे हे ठीक आहे; परंतु मिळालेल्या प्रचंड कर्जाचा वापर कसा केला जातो ह्यावर सरकारचे किंवा बँकांचे काहीच नियंत्रण उरले नाही. त्याचाच फायदा घेत अनेक उद्योजकांनी तो पैसा हस्ते परहस्ते वेगवेगळ्याच धंद्यात गुंतवला. बहुतेक बडे उद्योगपती होलसेल रिटेलमध्ये घुसले. त्याचा परिणाम सुरूवातीला दिसला नाही. मात्र, हळुहळू तो समोर येऊ लागला आहे. पुरवठादार व्यापा-यांकडून माल खरेदी करताना त्यांना तीन महिन्यांनंतर पेमेंट देण्याची अट घातली जाते. मॉलवाल्यांचे पैसे वेळेवर मिळणार नाही म्हणून व्यापारीही त्यांना चढ्या दराने माल विकतात. महागाईच्या अनेक छुप्या कारणांपैकी उधारी हे एक कारण आहे. हे कारण सामान्य नागरिकांच्या लक्षात येण्यासारखे नाही.
महागाई एका दिवसात वा महिन्यात वाढत नाही. महागाई वाढण्याची प्रक्रिया तशी अखंड सुरू असते. उदाहरणार्थ डाळींचे भाव दर वर्षी १२ टक्क्यांनी वाढतात. जीवनावश्यक मालाच्या महागाईची सुरूवात डाळींपासून झाली. ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारी डाळ १५० रूपये किलोवर गेली. एका बड्या उद्योगाने डाळ खरेदी करण्याचा सपाटा लावला होता त्यावेळी अनेक मोठे व्यापारी चक्रावून गेले. परंतु डाळींचा भाव का वाढतो हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत डाळींचा भाव १००-१२५ रुपयांवर स्थिर झाला. हेच भाजीपाल्याच्या बाबतीतही सुरू झाले आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाला आणि कांद्याचे नुकसान झाले. ते भरून काढण्याचा स्वस्त दराने खरेदी आणि महाग दराने विक्री हाच राजमार्ग अवलंबला जातो. हाच पारंपरिक मार्ग दरवर्षांप्रमाणे ह्याही वर्षी अवलंबण्यात आला असावा! आता कांद्याचे नवे पीक आले तरी तो शंभर-ऐंशीच्या घरात स्थिर होईल असा रागरंग दिसतो. बटाटे आणि टोमॅटो वगळता अन्य भाज्या ५० ते ६० रुपये किलोच्या घरात ह्यपूर्वीच गेल्या आहेत.
शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण मोदी सरकारने जाहीर केले होते. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट झाले की नाही हे माहित नाही. पण महागाई मात्र दुप्पट झाली. एके काळी महागाई रोखण्यासाठी पावले टाकण्याच्या दृष्टीने विचार करणे हे प्रश्न नागरी पुरवठा खात्याचे काम होते. बदलत्या वातावरणात नागरी पुरवठा खात्यात हे काम राहिले असेल असे वाटत नाही. कारण, व्यापारी मंडळी हे भाजपाचे समाजबांधव आहेत. शिवाय गेल्या काही वर्षांत आपल्याकडे राजकारणात ‘शेतकरी कमॉडिटी’ अति संवेदनशील झाली आहे. देशात राजकीय वर्चस्व टिकवायचे असेल तर शेतकरी आणि स्वकीय व्यापारी ह्या दोन्ही वर्गास दुखावणे हे कोणालाच परवडणारे नाही, भाजपा सरकारला तर ते मुळीच परवडणारे नाही.
कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे एक पेटंट कारण सरकारी अर्थतज्ज्ञ नेहमीच देतात. डिसेंबर महिन्यात वाढलेल्या महगाईचे खापरदेखील पेट्रोलियम पदार्थावर फोडले जाणार. पेट्रोलियम का महाग होत चालले ह्याचे कारण मात्र सरकार सांगत नाही. तेल शुध्दिकरणानंतर पेट्रोलियमचा जो दर निष्पन्न होईल त्या दरावर तितक्याच दराने कर आकारला जातो हे मात्र सरकारने कधीच सांगितले नाही.
जीएसटीमधील कराचे अनेक टप्पे हेदेखील महागाईचे आणखी एक कारण आहे. मालवाहतूक, मोबाईल रिचार्जिंग, रेल्वे प्रवास, मेडिक्लेम, वाहनांचा वाढीव विमा, बँकिंग व्यवहार, बाजारात शेवचिवड्यासकट पॅकेज स्वरूपात मिळणारे खाद्यपदार्थ अशा एक ना दोन गोष्टी सरकारने जीएसटीच्या कक्षेत आणल्या! जीएसटी कायद्यातील भरमसाठ दरांचे अनेक टप्पे ठेवण्याच्या आततायीपणांमुळेही महागाईत भर पडली हे नाकारता येणार नाही. ह्या संदर्भात सुप्रसिध्द अर्थतज्ज्ञ विजय केळकर ह्यांनी पुण्यात एका कार्यक्रमात काढलेले उद्गार मार्मिक आहेत. जीएसटीत कराचा एकच एक टप्पा असला पाहिजे असे मत विजय केळकर ह्यांनी व्यक्त केले. परंतु आता महागाईची कारणे समजून उपयोग नाही. कारण महागाईच्या राक्षसाने अर्थ आणि पुरवठा ह्या सरकारच्या दोन खात्याचे हातपाय पुरते बांधून टाकले आहेत.
तीन महिन्यंपूर्वी मंदीच्या प्रश्नावर अर्थसंत्री निर्मला सीतारामन ह्यांनी सरकारतर्फे कोणताही खुलासा केला नाही. नंतर करकपात वगैरेसारख्या योजना त्यांनी जाहीर केल्या. महागाईच्या नव्या वास्तवावरही अर्थमंत्री निर्मला सीतारामन् कदाचित खुलासा करणार नाही. आता तर त्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत गुंतलेल्या आहेत. घरी स्वयंपाक आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्पाच्या प्रस्ताव ह्यात त्या इतक्या गुंतल्या आहेत की त्याची अज्ञ जनतेला कल्पनाही करता येणार नाही! फारतर, व्यापारीवर्गाच्या प्रतिनिधींशी त्या चर्चा करतील. पतधोरणाच्या बाबतीत जरी आस्तेकदम चालण्याचा सल्लाही रिझर्व्ह बँकेला देतील! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि लोकसंख्या रजिस्टरवरून उसळलेला वाद झेलण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे महागाईच्या प्रश्नावर बोलून उगाच मधमाशांचे मोहोळ उठवण्याच्या भानगडीत ते दोघेही पडणार नाहीत.
शिवाय काही प्रश्न आपोआप सुटतात ह्यावर त्यांचा विश्वास असावा. फक्त ते प्रश्न सुटेपर्यंत कळ काढावी लागते एवढेच! दरम्यानच्या काळात महागाईच्या राक्षसाला अडवण्याचे काम कुणी करील असे वाटत नाही, त्याचे हातपाय पसरण्याचे काम सुरूच राहील! 

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

Friday, January 10, 2020

बेडर फादर, निर्भीड कवी


मराठी साहित्यिक-कवी कणाहीन, लेचेपेचे नाहीत हे उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३ व्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो आणि कवी ना. धों महानोर ह्या दोघांनी केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले. गेल्या ६ वर्षांत धर्मस्वातंत्र्यावर आणि विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा छुपा प्रयत्न सत्ताधारी आणि त्यांचे चेलेचपाटे करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुंड घसुवून विरोधकांना बदडून काढण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली दिसते. रोज जे घडत आहे तिकडे दुर्लक्ष करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी त्यावर मौन पाळले असले तर ते महाराष्ट्राला मुळीच आवडले नसते. देशात सुरू असलेल्या दंडुकेशाहीविरूध्द सुदैवाने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो ह्यांनी आणि उद्घाटक ना. धों महानोर ह्या दोघांनीही जोरदार आवाज उठवला. एखाद्याचा जीव घेणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणेही हीच का भारतीय संस्कृती आहे का, असा सवाल फादर दिब्रिटो ह्यांनी विचारला. त्यांचा सवाल कुठल्याही औपचारिक निषेधाच्या ठरावापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. कवी ना. धों महानोर काही वर्षांपूर्वी आमदार म्हणून वावरले. तरीही राजकारणी व्यक्ती अशी महानोरांची ओळख कधीही निर्माण झाली नाही. देशाला कुठलीही जाता नाही वा धर्म नाही, आंदोलन करणारी माणसे देशद्रोही आहेत असे म्हणण्याइतका करंटेपणा महाराष्ट्रात नाही, असे उद्घाटनाच्या भाषणात महानोरांनी स्पष्टपणे सुनावले.
भिन्न विचार मांडणा-यांच्या विचारांचे खंडन करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांच्या चेल्याचपाट्यांनी केला असता तर समजण्यासारखे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. भिन्न विचारसरणीच्या लेखक-पत्रकार, कलावंतांचे समाजमाध्यमातून ट्रोलिंग करण्याचे सत्र त्यांनी सुरू केले. ट्रोलिंगचे स्वरूप पूर्णतः गुन्हेगारी असूनही त्याविरूध्द कारवाई करण्याच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाने कुचराई केली. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानात चालते व्हा असे विचारवंत, कलावंत, साहित्यिक ह्या सर्वांना सुनावण्यासही कमी केले नाही. ह्या सा-याची दखल मराठी साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावरून घेतली जाणे अपेक्षित होते. ती अपेक्षा सा-यांनी पूर्ण केली. भूतपूर्व संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे ह्यांनीही बदलत्या वातावरणाची सणसणीत दखल घेतली.
आता एकच मुद्दा शिल्लक राहतो. तो म्हणजे खुल्या अधिवेशनात निषेधाचा ठराव संमत करण्याचा!  पण असा ठराव संमत करून घेणे ही निव्वळ औपचारिकता ठरते. मराठी साहित्य संमेलनास हजेरी लावताना राजकारणी मंडळींनी नेहमीचा राजकीय डामडौल बाजूला ठेवला पाहिजे अशी मराठी साहित्यरसिकांची फार जुनी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेकडे लक्ष न देता साहित्य संमलेनाला उद्घाटक म्हणून मंत्र्याला निमंत्रण देण्याचा अलिखित प्रघात मात्र आयोजकांनी कधीच बदलला नाही. मात्र उस्मानाबादेतील संमेलनाच्या आयोजकांनी ह्या वेळी उद्घाटक ह्या नात्याने मंत्र्यांना मुळी निमंत्रणच दिले नाही. काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी संमेलनाला हजेरी लावली; पण एक सामान्य रसिक म्हणून!
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करणे स्वाभाविक असले तरी प्रतिक्रियेचे महत्त्व हे प्रासंगिकच असते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अध्यक्षपदावरून भाषण करताना मराठी साहित्यासमोरील आव्हानांचा फादर दिब्रिटो ह्यांना विसर पडलेला नाही. मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे का ह्या प्रश्नावर फादर दिब्रिटो ह्यांनी दिलेले उत्तर कदाचित सर्वांना मान्य होणार नाही. मराठी भाषा मरणपंथाला लागली असे त्यांना वाटत नाही. भाषणात त्यांचा सूर आशावादी आहे. मरणयातना किंवा मानवी जीवनातल्या वेदना हीच साहित्याची जननी आहे ह्या त्यांच्या विचाराशी असहमत होता येणार नाही. खरे तर सृजन प्रक्रियेतल्या एका फार मोठ्या सत्यावर त्यांनी नकळतपणे बोट ठेवले. मराठीतल्याच नव्हे तर अन्य भाषेतील श्रेष्ठ साहित्याच्या निर्मितीचा इतिहासावर फादर दिब्रिटोंनी नजर टाकली आहे. त्यांना जे दिसले ते सत्य त्यांनी भाषणात मांडले आहे. लौकिक यशाची पर्वा न करणा-या लेखकांना अलौकिक यश लाभले आहे हेच ते चिरंतन सत्य!  
त्यांच्या प्रदीर्घ भाषणात अनेक मुद्दे आहेत की ज्यांचा स्वतंत्रपणे परामर्ष घेता येईल. ह्या दृष्टीने त्यांचे भाषण समाजमाध्यमातून प्रसिध्द होणे आवश्यक आहे. किंबहुना संपूर्ण मराठी साहित्य संमेलनची विडिओ प्रकाशित झाला पाहिजे. त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर चर्चा सत्रे आयोजित झाली पाहिजेत.
रमेश झवर