Wednesday, August 30, 2023

चांद्र मोहिम फत्ते

चंद्रावर उतरण्याच्या दृष्टीने विक्रम लँडरसज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते उतरवण्याची घडी समीप आली आहे. हे लँडर चंद्रभूमीवर विशिष्ट जागी उतरवण्यासाठी चांद्रायानाचा वेग कमी करावा लागतो. श्रीहरीकोटा अवकाशयान केंद्रावरील शास्त्रज्ञांनी यानाचा वेग शुक्रवारपासून कमी करत आणला. ह्या मोहिमेतील सारे टप्पे यशस्वीरीत्या ओलांडण्यात आले. आता हा अखेरचा टप्पा. लँडर विशिष्ट जागी उतरवणे महत्त्वाचे असते. ह्या वेळी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाणार आहे. ते एकदाचे नियोजित स्थळी आणि नियोजित वेळी उतरले की चांद्र मोहिम यशस्वी झाली असे म्हणता येईल.

चंद्रभूमीवरील मातीचे परीक्षण करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबवण्यात आली आहे. सत्तरीच्या दशकात अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग ह्याने जेव्हा चंद्रभूमीवर पाऊल टाकले तेव्हा मी सांजमराठाचा संपादक होतो. चंद्रा तुझे एकाकीपण संपलेअशी बॅनर हेडलाईन सांज मराठाच्या अंकाला दिली होती. नील आर्मस्ट्राँगला मी पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल ठेवले ह्या वाक्याने बातमीची सुरूवात केली. काही बावळट पोथीनिष्ठ वाचकांचे फोन आले. अमेरिकन अंतराळवीरम्हणण्याऐवजी तुम्ही पृथ्वीपुत्रच म्हणणार! मराठा हा कम्युनिस्टांचा पेपर आहे ना ! तुम्हाला मालकाचे ऐकणे भागच आहे. वर्तमानपत्रात बातमी लिहताना पत्रकाराची वैयक्तिक मते किंवा भूमिकेचा काही एक संबंध नाही. मराठाचे संपादक ह्यांच्या आम्हाला कोणत्याही सूचना नव्हत्या. मूळ पीटीआय किंवा रॉयटरच्या बातमीनुसार बातमी लिहावी हेच उपसंपादकांकडून अपेक्षित असते. मी लिहलेला इंट्रो बरोबरच होता. एक आवश्यक मुद्दा नव्या पिढीतील वाचकांच्या लक्षात यावा म्हणून मी जुन्या काळातील बातमीचा उल्लेख केला.

 चांद्र मोहिम राबवण्यामागे अनेक कारणे आहेत. खरे तर, जगातील सर्वच अंतराळ संशोधन संस्थांचा मंगळावर जाण्याचा इरादा आहे. मंगळावर यान पाठवताना चंद्र हे पहिले स्टेशन राहणार आहे. तिथे थोडा वेळ थांबून यान मंगळाच्या प्रवासाला निघेल. मंगळ प्रवासाच हा कार्यक्रम जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांनी ठरवला आहे. म्हणून चंद्राच्या भूगर्भात कुठल्या प्रकारची खनिजे आहेत ह्याची अद्यावत माहिती भारताकडून मिळवली जात आहे. इस्रोच्या मोहिमातले हे लॉजिक आहे अनेकांना माहित नाही. परंतु अंतराळ संशोधकांना, शास्त्रज्ञांना ते निश्चित करावेच लागते. त्यानुसार तूर्त तरी मातीपरीक्षण हा उद्देश ठरवण्यात आला आहे. हे लक्षात घेता विक्रमचे दि. २३ रोजी होणारे लँडिंग महत्त्वाचे राहील. ते एकदा यशस्वी झाले की भारताची ही चांद्रयान-३ मोहिम फत्ते झाली असेच म्हटले पाहिजे !

रमेश झवर

कल्पनेची बाधा

माणूस कल्पनेच्या बाधेत अडकतो म्हणजे नेमके काय? समोर दिसणारे ढळढळीत वास्तव त्याला दिसत नाही.विशेष म्हणजे नेहमी अद्वैत तत्तवज्ञानाच्या गप्पा मारणा-यांनामनातले हे सुप्त व्दंद्वध्यानात येत नाही.अध्यात्मात  मुरलेल्या माणसाला मात्र हे व्दंद्व लगेच समजते. अध्यात्म म्हणजेतरी काय? अध्यात्मशास्त्र  माणसाला आरशाप्रमाणे वास्तवाचे प्रतिबिंब दाखवते. रोजचे जीवन कसे जगत असताना येणा-या अडचणींचे निराकरण कसे करावे  हेही उलगडते. एखादी वस्तु लख्ख प्रकाशात जसजशी स्वच्छ दिसू लागते तसतसे अडचणही दिसते. त्यावरचा उपायही दिसतो.  म्हणून परिस्थिती कितीही विपरीत असली तरी तो मुळीच अस्वस्थ होत नाही. ह्याचे कारण  परिस्थिती अनुकूल असली तरी ती हळुहळू बदलणार हेही त्याच्या ध्यानात  येत असते. त्याच्या हेही ध्यानात येते की, विपरीत परिस्थितीदेखील कायम बसून राहणार नाही.  ह्या सत्याची मला वारंवार प्रचिती येत गेली.

एक लाख श्लोकांचे महाभारत किंवा २५ हजार श्लोकांचे रामायण वाचणे संस्कृत विषय घेऊन एमए झालेल्या  माणसाला शक्य नाही. मग सर्वसामान्य माणसाची काय कथासाधी ७०० श्लोकांची गीताही लोकांना समजत नाही. म्हणूनच गुरू निवृत्तीनाथांच्या आदेशावरून  ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावानुवाद नेवासे येथे मोहिनीराजांच्या मंदिरात श्रोत्यांसमोर सादर केला. नामदेवांनी  स्वतंत्र  अभंग रचना केली तरी त्यांच्या अभंगाला रामायण, महाभारत आणि भागवत पुराणांचा आधार आहे. नामदेवांच्या १४ अभंगांचा तर शिखांच्या गुरूबानीमध्ये समावेश करण्यात आला आहे. शीख लोकही पंढरपूरला नामदेव पायरीवर मत्था टेकण्यासाठी येतात. एकनाथांनी भागवत आणि भावार्थ रामायण तर लिहलेच; शिवाय भारूडे, गवळणी लिहून सामान्य जनांना आध्यात्मिक वाट दाखवली. समर्थांनी देशभर भ्रमण करून लोकांना तत्त्व आणि व्यावहारिक मार्गांचा मेळ घालण्याची शिकवण दिली. अकरा मारोतींची स्थापना करून दक्षिणेवर होणा-या  औरंगजेबाच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी प्रेरणा दिली! त्यातूनच पुढे मराठेशाही साम्राज्य स्थापन झाले.

 मी जेव्हा एकटा बसलेला असतो त्यावेळी बाराव्या शतकापासून अठराव्या शतकांचा चित्रपट  माझ्या डोळ्यांसमोरून सरकतो. ज्या अल्पसंख्यांक माहेश्वरी समाजात मी जन्मलो त्या समाजातील ७२ कुळांचे पूर्वज रजपूत सरदार  होते. ऐतिहासिक काळात कुठले तरी युध्द ते हरले. त्यामुळे  त्यांच्यावर रानावनात पळून जाण्याची पाळी आली. त्या वनवासातच भगवान महेशाने त्यांच्यावर कृपा केली. वणिग्‌ वृत्तीने आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली. भगवान महेशांच्या कृपेने त्यांच्या भाल्यांची लेखणी झाली. ढालींचे तराजू झाले ! सणावळ्या पाठ करणे म्हणजे इतिहास नाही. इतिहासाचा जिवंत चित्रपट आपल्या डोळ्यांपुढून सरकतो तेव्हाच आपल्या मनातले नैराश्याचे मळभ दूर होते! इतरांचे मला महित नाही, परंतु मनातले नैराश्य दूर होण्याच्या प्रक्रियेचे हे दर्शन मला वेळोवेळी झाले. भरकटलेले मन आपोआपच स्थिर होते गेल्याचा अनुभव आला.

माझ्या सध्याच्या आयुष्याची पार्श्वभूमी पुरेशी स्पष्ट व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तपशील मी मुद्दाम नमूद करत आहे. मी जळगावात मोठा झालो. जळगावात नदी अशी नव्हती. जळगावात जी मेहरूणी नामक लहानशी नदी होती. तिचे रूपान्तर कधीच नाल्यात झालेले होते! तापी आणि गिरणा ह्या दोन नद्यांचे वरदान जळगावला मिळाले खरे ; परंतु ह्या दोन्ही नद्या जळगाव शहरापासून  तशा लांबच. तापी स्नानासाठी ममुराबाद किंवा इदगावपर्यंत  बसने जावे लागायचे. सूर्यग्रहणाच्या दिवशी माझे वडिल गिरणा स्नानाला जात असत. मी थोडा मोठा झाल्यावर वडिल मला सायकलीवर डबल सीट बसवून  गिरणास्नानाला अनेकदा नेले.  जळगावकरांचे सुदैव असे की १९२७ साली जळगाव नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. ह्या योजनेमुळे जळगावकरांना गिरणेच पाणी नळाद्वारे मिळू लागले. बालाजी पेठेत माझे घर होते. हा  भाग जळगावतला लो लायिंग एरिया’. त्यामुळे घरात नळाला पाणी नाही असे कधीच घडलेच नाही! शिवाय घरात  विहीरही  होतीच.राहाटगाड्याने पाणी वर आणता येत असे.

जळगावनजीक मेहरूणचा तलाव किंवा गिरणा वॉटर टँक ही दोन स्थळे होती.  सहलीला जाण्याची ठिकाणे होती. मेहरूण रोडवर जवळ जवळ रान होते. त्या रानात एक देवीचे देऊळ होते. ह्या देवीचे नाव इच्छादेवी! आश्विन अष्टमीच्या दिवशी  माझे चुलते शंकरभाईजी झवर हे इच्छादेवीच्या देवळात सगळ्या झवर कुटुंबाला जेवण देत असत. सगळे झवर कुटुंब जेवणाला  हजेरी लावत असे. महाराष्ट्रातील सर्व शहरांचा विस्तार झाला तसा तो जळगाव शहराचाही झाला. त्याचा दृश्य परिणाम असा की इच्छादेवीचे मंदिर नेमके कुठे आहे हे रस्त्याने जाणा-यांच्या लक्षात येत नाही.

अलीकडे जळगाव नगरपालिकेची महापालिका झाली. महापालिकेचे कार्यालय १७ मजली टॉवरमध्ये आहे! एखाद्या शहराच्या महापालिकेचे कार्यालय १७ मजली टॉवरमध्ये असल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. शहर ह्या दृष्टीने जळगाव जितके आधुनिक तितकेच सांस्कृतिक  परंपरेच्या बाबतीही समृध्द आहे. जुन्या काळापासून  जळगावाचे नाव हे सांस्कृतिक केंद्र म्हणून दुमदुमू लागले होते. संगीत स्वयंवरपासून ते मी जिंकलो मी हरलोह्या विजय तेंडुलकरलिखित नाटकांपर्यंत पुण्यामुंबईला होणा-या बहुतेक नाटकांचे प्रयोग जळगावलाही केले जात. नाटकांप्रमाणे  वृत्तपत्र व्यवसायाची परंपराही जळगावात जुनी आहे. प्रबोधचंद्रिका साप्ताहिक  आणि कवितेला वाहिलेले काव्यरत्नावली’  मासिक नानासाहेब फडणीस ह्यांनी जळगावला सुरू केले. भा. रा. तांबेंपासून केशवसुत-केशवकुमार ह्यांच्यापर्यंत असा एकही कवी नसेल की ज्याच्या कविता काव्यत्नावलीत प्रसिध्द झाल्या नाही. राजसंन्यास नाटकाचे  काही प्रयोग राम गणेश गडकररींनी सोनाळकरांच्या घरी लिहले. नोकरीनिमित्त माधव ज्युलियन ह्यांचे अमळनेरमध्ये काही काळ वास्तव्य होते.

सानेगुरूजींनी तर खानदेश ही कर्मभूमी मानली. त्यांच्या वास्तव्यामुळे  खानदेशची भूमी पावन झाली. १९३० साली गांधींजींच्या आदेशावरून दांडी यात्रेत कायदेभंग केला. सानेगुरूजींनीही  कोकणात शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला. शिरोड्याच्या सत्याग्रहात माझ्या वडिलांनी भाग घेतला! आपण मिठाच्या सत्याग्रहाला जात असल्याची चिठ्ठी त्यांनी आजोबांना लिहून ठेवली. ही गीतेत ठेवल्यामुळे आजोबांना बरोबर सापडली. ह्या आठवणीला माझे वडिल अधुनमधून उजाळा  देत. मीही त्यांच्या आठवणीत रमून जात असे.

न. चिं केळकरांचे ज्येष्ठ बंधू महादेव चिंतामण केळकर हे जळगावला डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे मोठे घर होते. म. चिं. केळकरांच्य  पश्च्यात त्यांचे चिरंजीव वसंत केळकर हे जळगावात स्थायिक झाले. मुंबईतली आर्ट गॅलरी बंद करून उपजीवेकासाठी त्यांनी बळिराम पेठेत इंग्रजीचे क्लास सुरू केला. मी एस्सेसीला असताना त्यांच्या क्लासमध्ये ५ रुपये भरून प्रवेश मिळवला. इंग्रजीसह मी एस्ससी  पास झाल्याने माझा कॉलेज-प्रवेश सोपा  झाला. जळगावच्या मूळजी जेठा कॉलेजात  प्रा. म. ना. अदवंत हे मराठीचे विभागप्रमुख  होते. ते अनेक विद्यापीठांच्या अभ्यास समितीवर  होते. त्यांच्या मदतीला सुधाकर जोशी, विमल राणे, राजा महाजन हे तीन  व्याख्याते  होते. कॉलेजच्या आर्टस्‌ शाखेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदीतील प्रख्यात व्यंगकार शंकरबाब पुणतांबेकर हे हिंदी शिकवायला होते. उत्तमचंद कोठारी हे त्यांचे मदतनीस. ह्यांच्याखेरीज  सुरेश चिरमाडे ( अर्थशास्त्र ), जोगळेकर     ( तर्कशास्त्र ), तारळेकर दांपत्य, नाडकर्णी मॅडम हेही वेगवेगळे विषय शिकवत. एकूण सगळी टीम पुणे-मुंबई विद्यापीठातल्या व्याख्यात्यांच्या तोडीस तोड  होती.

ह्या लेखाचा  ‘फोकसनेमका कशावर दिला आहे असा  प्रश्न पडण्याचा संभव आहे. त्याचे उत्तर असे की माझ्या आध्यात्मिक जीवनाची पार्श्वभूमी वाचकांना समजण्यास मदत व्हावी. मला असे वाटते की ह्या लेखातील तपशीलाने ती वाचकांच्या  ब-यापैकी लक्षात आली असेल. वडिलांची परिस्थिती गरीबीची नव्हती किंवा फार श्रीमंतीचीही नव्हती. वडिलांनी सुरूवातील धान्याचा आणि नंतर नंतर सरकी, पेंड वगैरे पशुखाद्याचा व्यवसाय  केला. धंद्यात त्यांना फार पैसा मिळवला असे नाही. परंतु त्यांना कमी पडले नाही हेही तितकेच खरे. वंशपरंपरागत मिळालेल्या प्रॉपर्टीची हिस्सेवाटणी झाल्यानंतर आमची परिस्थिती ब-यापैकी पालटली. वडिल बंधूंचे शिक्षण एसेस्सीनंतर थांबले होते. मला मात्र कॉलेज शिक्षणाची संधी मिळाली  हे माझे वडिलोपार्जित भाग्य !

रमेश झवर

Saturday, August 5, 2023

विवेकबुध्दीचे दर्शन

लोकशाही राजकारणात
कोणालाही राजकारण करण्यास मज्जाव करणे हे लोकशाहीच्या मूळ तत्त्वाविरूध्द आहे. ह्यउप्परही राजकीय विरोधकाला संसदीय राजकारणात वावरण्यास मज्जाव करायचा असेल तर किमान सर्वोच्च नेत्याने तरी विवेकबुध्दीला तिलांजली देणे योग्य ठरत नाही. मोदी आडनावासंबंधीचे विधान राहूल गांधींनी मुळात करायला नको होते. परंतु त्यांनी ते केल्याबद्दल राहूल गांधींना गुजरातमधील मॅजिस्ट्रेट कोर्ट, सेशन्स कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली. वास्तविक अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयांनी नेहमीच सौम्य भूमिका घेतली. फारतर. कोर्ट उठेपर्यंत कारावासाची शिक्षाही अनेक प्रकरणात दिल्या गेल्या आहेत. राहूलला झालेली शिक्षा रद्द गुजरात हायकोर्टाला रद्द करता आली असती. किंवा नव्याने खटला चालवण्याचा आदेश देता आला असता. मुळात जिल्ह्याच्या राजकारणात कोर्टबाजी करण्याची अनेकांना सवय आहे. राहूल गांधीवरचे खटले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कनिष्ठ न्यायालयांचे समजू शकते. उच्च न्यायालयानेही कनिष्ठ कोर्टाचा निकाल उचलून धरावा? ह्याचा अर्थ गुजरातमधील न्याधीशवर्ग ‘नको रे बाबा’ असे मनातल्या मनात म्हणत गुजरातमधल्या न्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोष पत्करण्याची जोखीम पत्करली नाही.
भारत यात्रेच्या काळात कर्नाटकमधील कोलारजवळ राहूल गांधींनी केलेले विधान हे विनोदबुध्दीने केले असा पवित्रा राहूल गांधींना घेता आला असता. परंतु तो तसा त्यांनी घेतला नाही. भाजपातदेखील अनेकांना विनोदी बुध्दीचे वावडे आहे. राहूल गांधींचा काटा काढण्याची अचानकपणे आलेली पंतप्रधान नरेंद्र ह्यांना मिळाली. ती साधून राहूल गांधींचे लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला ह्यांना भाग पाडले. शेवटी राहूल गांधींना झालेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने हंगामी काळासाठी का होईना स्थगिती दिल्यामुळे राहूल गांधींचे हिसकावून घेतलेले लोकसभा सदस्यत्व मोदी सरकारला भाग आहे. ह्या प्रकरणाचा एकूण विचार करता ह्या मोदी सरकारचीच बदनामी अधिक झाली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. निवडणूक प्रचार सभांत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी राहूल गांधींना ‘पप्पू’ म्हटले. राहूल गांधींनी ते फारसे मनावर घेतले नाही. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला शेलकी विशेषणे बहाल करण्यामुळे श्रोत्यांची करमणूक होते. नेहरू - गांधी परिवारातल्या व्यक्तींविरुध्द वाटेल ते बोलण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रघात आहे. तो मोदींनी भाजपाच्या राजकारणात आणला.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात विवेकबुध्दीचे दर्शन घडले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहूल गांधींना त्यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले. ह्या बाबतीत वेळकाढूपणा करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरला असता. सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन घडलेच. राहूल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल झाली. अर्थात २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाविरूध्द हा मुद्दा निश्चितच राहील.
रमेश झवर
सर्व प्रतिक्रिया:
Sanjay Chitnis, Pradeep Varma आणि अन्य ११
लाईक
टिप्‍पणी
सामायिक करा
आणखी कमेंट्स पहा

Thursday, August 3, 2023

मित्रवर्य ना धों. महानोर

खानदेशला
  काव्यप्रतिभेचे  देणे  लाभले  आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बहिणाबाई चौधरी, सोपानदेव चौधरी अशी कितीतरी नावे सांगता येतील. सानेगुरूजी आणि माधव ज्युलियन हे मूळचे खानदेशचे नसले तरी  त्यांची प्रतिभा बहरली ती खानदेशच्या मातीत! निसर्गातल्या पिकाच्या संवेदना अलगद टिपणारे ना. धों.महानोर  हे अगदी अलीकडचे नाव. त्यांचे गाव पळसखेडे अजिंठा तालुक्याच्या सीमेवर असले तरी  जळगावला जवळ आहे. नशीब काढयाला पळसखेड्याची मंडळी जळगावला येतात. जैन इगेशनचे भवरलाल जैन हेदेखील मूळ पळसखेड्याचे. पळसखेड्याला भवरलाल जैन ह्यांची आणि नाधोंची थोडीफार शेती होती. भवरलाल जैन जळगावला आले. त्यांनी लहानसा व्यवसाय केला. महानोरही महाविद्यालयीन शिक्षणाला जळगावला आले. मूळजी जेठा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पुढे कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले.

कॉलेजमध्ये असताना त्यांना कविता लिहण्याचा छंद होता. तो त्यांनी  मनोमन जोपासलाही. हे म. ना. अदवंतांना कळताच त्यांनी आणि प्रा. राजा महाजन ह्या दोघांनी महानोरना उत्तेजन दिले. राजा महाजन हे अहिराणी भाषेत कविता लिहीत. ललितबंधच्या क्षेत्रात . ना. अदवंतांचे नाव महाराष्ट्रभर गाजलेले होते. आपल्या विद्यार्थ्यांच्या काव्यस्फूर्तीला उत्तेजन देणे हे दोघे आपले कर्तव्य समजायचे. ना. धों. महानोर, दिवाकर गंधे, पुरूषोत्तम भावसार. मंगला नाडकर्णी ह्यांचे कौतुक करण्याच्या बाबतीत दोघांनी कधी हात आखडता घेतला नाही. कवितेच्या प्रांतात मला लुडबूड करायचीच नव्हती. विनोदी लेख आणि कथा लिहण्याची मला इच्छा होती. सुदैवाने साप्ताहिक गावकरी आणि महाराष्ट्र टाईम्स ह्या दोन नियतकालिकांनी मला प्रसिध्दी दिली. साहजिकच अदवंतसरांनी आणि राजा महाजनांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे माझा भआव वधारला.

मी प्री डिग्रीमध्ये असताना कॉलेजतर्फे हिरवळ नावाची भित्तीपत्रिका सुरू करण्याचा उपक्रम अदवंतसरांनी सुरू केला. ह्या उपक्रमाची जबाबदारी त्यांनी प्रा. सुधाकर जोशी ह्यांच्यावर सोपवली. तो संपूर्ण अंक सुंदर हस्ताक्षरात लिहून काढण्याची जबाबदारी माझे मित्र दिवाकर गंधे ह्याने पत्करली. कॉलेजमध्ये आणि घरीदारी लिहण्याखेरीज आम्हाला दुसरे काही सुचत नव्हते. दिवाकरने त्याही पुढे मजल मारून साहित्य साधना नावाची संघटना स्थापन केली. साहित्य साधनेची बैठक दर रविवारी त्याच्या घरी भरत असे. बैठकीत प्रत्येक जण त्याचे लिखाण वाचून दाखवायचा प्रा. सुधाकर जोशी आवर्जून उपस्थित राहायचे. ना. धों. पळसखेड्याला राहायचे. त्यामुळे इच्छा असूनही आपल्याला साहित्य साधनाच्या बैठकीला हजर राहता येत नाही ह्याची खंत नाधोंनी दिवाकरकडे आणि माझ्याकडे अनेकदा व्यक्त केली.  मूळजी जेठा कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनास मात्र नाधों आवर्जून हजर राहायचे. पळसखेडे आणि जळगावमधले अंतर लक्षात घेता सायकलीने येणे सोपे नव्हते. कवितेबद्दल त्यांच्या मनात प्रेम होते. थोडं उशिरा का होईना ते येणार ह्याची आम्हा सर्वांना खात्री होतीआमची खात्री कधीही खोटी ठरली नाही हे आवर्जून सांगितले पाहिजे.

पाहता पाहता कवी म्हणून नाधोंचे नाव महाराष्ट्रभर गाजू लागले. विद्याधर गोखले ह्यांनी लोकसत्ता दिवाळी अंकाचे काम माझ्याकडे सोपवले. त्यांनी नावांची यादी तयार करून माझ्या हातात दिली. त्यानंतर मी भराभर एकेका कवीला फोन लावायल सुरूवात केली. महानोरना फोन लावला तेव्हा कळले की त्यांना जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या वतीने कुणीतरी नर्सबाई बोलत होत्या. महानोरनी मला निरोप दिला. ह्या वर्षी तरी मी कविता देऊ शकणार नाही. मलामाफ करा. बळावलेल्या काविळीमुळे मी जसलोकात दाखल झालो आहे.’

दुस-या दिवशी त्यांचे पत्र आले. त्या पत्रात त्यांनी लिहले होते, ह्या वर्षी माफ करा. पुढच्या वर्षी मी तुम्हाला नक्की  कविता देईन. नंतर विधानपरिषदेवर त्यांची आमदार म्हणून नेमणूक झाली. ते आणखी बिझी झाले. मी जळगावला जेव्हा जेव्हा माझ्या घरी जाई तेव्हा तेव्हा महानोरना त्यांच्या घरी जाऊन भेटत असे. चहापोहे घेतल्याशिवाय त्यांनी मला कधी जाऊ दिले नाही.

 आज मित्रवर्य ना. धों गेल्याची बातमी फेसबुकवर वाचताच मन उदास झाले.

रमेश झवर