Sunday, October 27, 2013

वक्तृत्वाचे काडी पहिलवान!

2014 साली होणा-या लोकसभा निवडणूक घोषित होण्यास अजून अवकाश असताना यंदा निवडणूक प्रचाराची भाषणे सुरू झाली असली तरी भाषण करणारे निवडणुकीचे स्टार प्रचारक मात्र वक्तृत्वकलेच्या दृष्टीने पाहिले तर काडी पहिलवान! त्यांच्या भाषणात ना गुद्दे ना मुद्दे! खणखणीत भाषण म्हणजे भरघोस मते आणि हमखास विजय हे समीकरण निवडणुकीच्या राजकारणात कधीच जुळलेले नाही हे खरे आहे; पण एखाद्या नेत्याचे भाषण चांगले झाले नाही तर त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही असा निष्कर्ष मात्र काढल्याशिवाय लोक राहात नाही. एकच सूर आणि एकच राग आळवणा-या गवयाची बैठक हळुहळू ओस पडू लागते. गवयाच्या हे जसजसे लक्षात येऊ लागते तसतसा त्या गवयाचा आत्मविश्वास संपुष्टात येतो! नेत्यांच्या बाबतीतही हे तितकेच खरे आहे. असा प्रकार घडत गेला की त्याची निवडणूक धोक्यात येण्याचा संभव दाट होत जातो. अलीकडे नरेद्र मोदी आणि राहूल गांधी ह्यांच्या बाबतीतही हे घडेल की काय अशी शंका वाटू लागली आहे.
नरेंद्र मोदी ह्यांचे पहिले प्रचार-भाषण उद्योगपतींच्या एका संघटनेत झाले तर  राहूल गांधींच्या प्रचार-भाषणाची सुरूवात उद्योगपतींच्याच सभेत पण दुस-या संघटनेत झाली. पण दोन्ही नेत्यांच्या प्रचारसभा वाढत चालल्या तसतशी त्यांच्या भाषणंची रंगत संपत चालली असून त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही असा लोकांचा समज होऊ लागला आहे. उदाहरणार्थ गुजरातचा विकास आपण कसा घडवला ह्या पलीकडे त्यांच्या बाजूने सांगण्यासारखे काहीच नाही. देशाचा विकास घडवण्याचा आत्मविश्वास आपल्या एकट्याकडेच आहे हे ठासून सांगण्यासारखे मुद्दे त्यांच्याकडे बिलकूल नाहीत. तेच राहूल गांधींच्या बाबतीही म्हणता येईल. ग्रामीण रोजगार, भाकरीचा हक्क, वगैरे योजनांबद्द्ल त्यांनी बोलणे ठीक आहे. नव्हे प्रचार सभात ह्याच मुद्द्यांवर भर देण्याची गरज आहे. पण त्यांनी सोनियाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले वगैरे सांगतिल्यामुळे विनोदच झाला. सोनियाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले खरे, पण ते मतदान करता आले नाही म्हणून! गरिबांबद्दल आमच्या घरात वंशपरंपरेने कणव आहे, माझी आईदेखील त्याला अपवाद नाही, असे सांगितले असते तर त्याचा योग्य परिणाम झाला असता.
आपल्या आजीचा आणि वडिलांचा खून झाला; आणि आता आपलाही खून होऊ शकतो, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगायला सुरूवात केली. लोकांची सहानभूती मिळवण्याच्या दृष्टीने ह्या मुद्द्याचा उपयोग होण्यासारखा आहे. गांधीजींच्या हत्येचा काँग्रेसने अनेक निवडणुकीत फायदा उचलला. किंबहुना भाषणांच्या जोरावरच काँग्रेसने निवडणुका त्या काळात सगळऴ्याच पक्षांच्या नेत्यांनी फायदा घेतला. अगदीच काही नेहरू, लोहिया, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी वाजपेयी वगैरेंच्या भाषणांचे दाखले देण्याची गरज नाही. खुद्द राहूल गांधींच्या मातोश्रीचे उदाहरण घेतले तरी पुरेसे आहे. आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात त्यांनी लोकांची मने जिंकल्याचे उदाहरण ताजे आहे. मध्यप्रदेशात नर्मदेकाठावरच्या कुठल्याशा गावात त्यांचे निवडणूक प्रचार सभेत भाषण झाले. त्या भाषणाची सुरूवात त्यांनी नर्मदास्तवनाच्या संस्कृत श्लोकाने केली होती. त्यामुळे मध्यप्रदेशातल्या सामान्य माणसांची मने सोनियाजींनी जिंकली. परंतु स्क्रीप्ट रायटरने लिहून दिलेले भाषण वाचून दाखवताना मात्र राहूल गांधींचा दमछाक होत असल्याचे श्रोत्यांना स्पष्ट जाणवले. मग त्यांच्या सभांना गर्दी कशी वाढणार? म्हणता म्हणता त्यांनी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. राहूल गांधींची सभा मध्यप्रदेशात शहडोल येथे झाली तेव्हा त्यांनी अन्न सुरक्षा बिलाच्या वेळी मतदान करता आले नाही म्हणून सोनियाजींच्या डोऴ्यांत अश्रू तरळल्याचे राहूल गांधींनी सांगितले. मुळात अघळपघळ बोलण्याची राहूल गांधींना सवय नाही. त्यामुळे मध्येच अश्रूंचा उल्लेख करून त्यांनी काय साधले हे त्यांचे त्यांनाच अन् त्यांचे स्क्रीप्ट लिहीणा-यालाच माहित! अश्रूंची मते होणार का?
उत्तरप्रदेशात एकदा विमानप्रवास करत असताना त्यांचे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न जैश-एमहम्मदने केला होता. त्या प्रयत्नामागे राहूल गांधींचे अपहरण करण्याचा इरादा होता, अशी कबुली पकडण्यात आलेल्या एका आरोपीने दिली होती. पण ज्यांचे अपहरण करण्याचे अतिरेक्यांनी ठरवले होते त्यांच्या यादीत अटलबिहारी वाजवेयी, लालकृष्ण आडवाणी वगैरे नेत्यांचाही समावेश होता अशी माहिती आता उजेडात आली आहे. आपल्या खुनास देशात जातीय राजकारणाचे वातावरण भाजपा तयार करत आहे असे सांगून त्यांनी 'आपला खून होऊ शकतो' असे विधान केले असते तर त्यांच्या म्हणण्याला अर्थ होता. पण तसे काही ते बोलले नाही. निदान प्रसिद्ध झालेले नाही. किंवा त्यांच्या भाषणाचे रिपोर्टिंग बरोबर झाले नसावे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि आता राजस्थानमध्ये त्यांच्या प्रचार-भाषणासाठी एक दोन दौरे झाले. पण त्यांच्या भाषणाचा इंपॅक्ट म्हणावा तसा झाल्याचे दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांबरोबर नेत्यांनाही जिवाचे रान करावे लागते हे सत्य त्यांना उमगायचे आहे!
अतिरेक्यांमुळे राजकारण्यांना मुक्त संचार अवघड झाला आहे. झेड सिक्युरिटीखेरीज मोठे नेते वावरू शकत नाहीत हेही खरे आहे. पण बाबरी मशिद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर विरोधकांनी जे राजकारण केले त्यानंतरच मुंबईत दंगल पेटली. बाँबस्फोटांची मालिका मुंबईत 1992 साली झाल्यानंतर पाकलष्कराच्या अखत्यारीत असलेले हेरसंस्थेच्या भारतात बाँबस्फोट घडवून आणण्याचा आणि कारगिलमध्ये सैनिक घुसवण्याचा कारवायांना जोर आला ह्या वस्तुस्थितीकडे बोट दाखवून राहूल गांधींना प्रचाराची तोफ डागता आली असती. नेहरू-घराण्याच्या त्यागानंतर इंदिरा गांधीं आणि राजीव गांधींचा बलिदान हा विषय तर लोकांच्या भावनांना हात घालणारा असाच आहे. परंतु राहूल गांधींच्या बरोबर डी टीम आहे त्यांना हे तर्कशुद्ध मुद्दे मांडता आले असते.कादचित त्यांची ह्यापुढील भाषणं अधिक प्रभावी होऊ शकतील. पण अलीकडच्या राहूल गांधींच्या भाषणांमुळे त्यांची बूंदसे गई वो हौदोंसे नही आएगी अशी स्थिती आहे.
रमेश झवर                                           
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: