Tuesday, April 11, 2017

वाचाळतेचा सुकाळ

भाजपाला जन्मापासून वाचाळतचे वरदान लाभले आहे. पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री पंतप्रधानांपासून ते जिल्हा भाजपा कार्यालयात खांद्यावर गमछा टाकून हिंडणा-या कार्यकर्त्यांपर्यंत भाजपात असा एकही नेता नाही की ज्याने अकलेचे तारे तोडले नाहीत. अनेक वर्षे सत्तेपासून वंचित राहिल्या मुळे वेळीअवेळी वाटेल ते बोलण्याची खोड भाजपामध्ये अनेकांना लागली आहे. संधी मिळताच अक्कल पाजळल्याशिवाय चूप बसेल तर भाजपा कार्यकर्ता कसला? 'राममंदिराच्या निर्माण होण्यासाठी मला फाशी जावे लागले तरी चालेल', असे उमा भारतीने नुकतेच लखनौ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले तर हैदराबादचे भाजपा आमदार राजा सिंग म्हणाले, अयोध्येत राममंदिर उभारण्यास विरोध करणा-यांचा मी शिरच्छेद करीन.
उमा भारतीच्या विधानाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची किंवा भाजपाश्रेष्ठींची प्रतिक्रिया जाहीर झाल्याचे कुठेही काही प्रसिध्द झाले नाही. त्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांची भेट घेतल्यावर 'मी फाशी जायला तयार आहे' असे विधान केले. हे विधान योगी आदित्यनाथांच्या भेटीतही त्यांनी केले का हे कळण्यास मार्ग नाही. खुद्द आदित्यनाथांची उमा भारतीच्या वक्तव्यावर काहीच टिपणी केली नसावी. तशी ती त्यांनी केली असती तर ती प्रसारमाध्यामांच्या नजरेतून सुटली नसती.
वास्तविक राममंदिरांचा प्रश्न अजून न्यायासनासमोर चर्चिला जात आहे. दे काही बोलायचे ते कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलले पाहिजे. बाबरी मशिद उद्ध्वस्त करण्याची घटना ही कायद्चच्या दृष्टीने गुन्हा आहे. तसेच राममंदिराची पुन्हा उभारणी करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवरून आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अचूक तपशीलही त्यांनी माहित करून घेतला पाहिजे. आता आपण सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसत असून जबाबदारीने बोलले पाहिजे ह्याचे भान सुटल्याची ही उदाहरणे आहेत.
हैद्राबादचे आमदार राजा सिंग ह्यांच्या 'शिरच्छेदा'च्या विधानाबद्दल मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्ट खुलासा करण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारासा राष्ट्रीय स्वयंसेवकरा संघाचा पाठिंबा नसल्याचे संघप्रवक्त्याकडून स्पष्ट करण्यात आले. इतकेच नव्हे, तर राजासिंगांची जबाबदारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झटकून टाकली आहे. बिचारे संघचालक सुटले! गोमांस हादेखील भाजपा आमदार-खासदारांचा आवडता विषय आहे. ह्या विषयावर भाजपाचे कार्यकर्ते काय बोलतील ह्याचा भरवसा नाही. 'सबका विकास सबका साथ' ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  घोषणेबद्दल मात्र भाजपा एकाही खासदाराने कधी तोंड उघडल्याचे वृत्त नाही. नितिन गडकरी महामार्गाच्या प्रगतीबद्दल तसेच अरूण जेटली हे विदेशी गुंतवणूक, जीडीपी, जीएसटी ह्या तीन विषयांखेरीज अन्य विषयावर बोलल्याचे क्वचितच ऐकायला मिळाले.
नोटबंदीचे समर्थन करताना काळा पैसा बाहेर काढण्याच्या कामी अपयश आले तर मला खुशाल भरचौकात फाशी द्या असे उद्गार नोटबंदीचा पहिला आठवडा संपता संपता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले होते. नोटबंदीच्या निर्णयाची अमलबजावणी करण्याच्या कामी कुठे कसूर झाली असेल तर त्याची रीतसर चौकशी करण्यात येईल आणि दोषी ठरलेल्यांची गय करण्यात येणार नाही असे पंतप्रधान मोदींनी कधी सांगितले नाही. नोटबंदीच्या निर्णयाची अमलबजावणीत चुका निदर्शनास आणून द्या असे स्पष्ट आवाहन निदान संसदेत तरी सरकारने करायला हवे होते. परंतु तसे आवाहन सरकारकडून करण्यात आले नाही. ना भाजपा खासदारांने चांगले प्रश्न विचारले. वास्तविक काळा पैसा हुडकून काढण्याच्या कामी स्वपक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करायला हवी होती. अशा प्रकारची मदत त्यांनी केल्याचे चित्र कुठे दिसले नाही.
दुसरा किस्सा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. भिवंडी येथे माणकोली नाक्याजवळ उड्डाणपुलाचे करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ह्यांनी राजकारण्यांची अधिकारीवर्गाशी अनाठायी तुलना करण्याचा मोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांसाऱख्या ज्येष्ठ नेत्यांनाही आवरता आला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येतं. आम्हा राजकारण्यांना मात्र पाच वर्षातच रिटायरमेंट मिळते. पाच वर्षांत कामे व्यवस्थित न झाल्यास लगेच रिटायरमेंट मिळते. त्यामुळे आम्हाला भराभर कामे करावी लागतात.
वास्तविक सरकारी नोकरीत पात्रता असलेल्या उमेदवाराला पारखून घेतले जाते. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींत तावूनसुलाखून निघालेल्यांनाच सरकारी नोकरी मिळते. त्याखेरीज वरिष्ठांच्या गोपनीय अहवालावरच त्यांची बदलीबढती अवलंबून राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. निधीटी टंचाई, मंजूर प्रकल्पाचे काम रखडणे, मतभेदाचे जंजाळ इत्यादि अवघड परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो. त्यासाठी सारे बुध्दीकौशल्य खर्ची पडते. एवढे करून प्रकल्प पुरा करण्याच्या कामी चुका झाल्यास अधिका-यांना क्षमा नाही. तुलनेने राजकारण्यांचा `गेम' सुरक्षित म्हटला पाहिजे. भारतात तरी पाच वर्षांत फारच कमी राजकारणी रिटायर झाले आहेत. चुका करूनही चारपाच टर्म्स निव़डून येणारे अनेक राजकारणी दाखवता येतील. आपल्या चुका अधिका-यांच्या माथी मारण्याच्या बाबतीत राजकारणी माहीर असतात हे सगळ्यांनाच माहित आहे. खरीखोटी विधाने करून राजकारण्यांची पाच वर्षे सहज निघून जातात. देशातल्या सर्व आमदार-खासदारांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे हे देशभरातील उनेदवारांचे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज तपासून पाहिल्यास सहज ध्यानात येईल! सतत वाढणआ-या त्यांच्या संपत्तीचा तर्कशुध्द खुलासा त्यांच्या सनदी लेकापालांनाही करता येणार नाही.
असो. देशातील समस्यांबद्दल बोलताना अभ्यासोन बोलावे एवढे पथ्य जरी त्यांनी पाळले तरी भाजपा नेतृत्वापुढील समस्या काही अंशी का होईना कमी होतील. देशभक्तीचा धोशा लावून देशभक्त तयार होत नाहीत. इंदिरा काँग्रेमध्येही गरिबांबद्दल कणव व्यक्त करणा-यांची संख्या कमी नव्हती. त्यांच्यामुळे इंदिरा काँग्रेसचे नुकसानच झाले होते. वाचाळतेचा सुकाळ आणि देशभक्ती वल्गना ह्यामुळे त्यांच्या पदरात पुण्य वगैरे काही पडणार नाही, उलट देशाच्या नेतृत्वासमोरील डोकेदुखी मात्र वाढणार!

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: