Sunday, January 12, 2014

हलकल्ळोळ आणि रणकल्ळोळ


लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यांच्या मध्याच्या सुमारास निवडणुकीची औपचारिक घोषणा होईल हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. परंतु नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित करून त्यांच्या प्रचाराचा रणकल्लोळ भाजपाने खूर आधीपासून सुरू केला. परिणामी काँग्रेसलाही पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली सुरू करणे भाग पडले. पंतप्रधानपदाचा उमेदवार आधीच जाहीर करताना भाजपाची रणनीती अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतल्या रणनीतीसारखी ठरवण्यात आली.  पण अमेरिकेत पक्षान्तर्गत अध्यक्षपदाची नावे निश्चित करताना लोकशाही मूल्यांची बूज ज्या प्रकारे राखली जाते त्याप्रमाणे भाजपाने मात्र बूज राखली असे म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदींच्या नावाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाचा कितपत पाठिंबा आहे ह्याची फारशी फिकीर भाजपाने केली नाही हे समजण्यासारखे आहे. परंतु भाजपातील ज्येष्ट नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी वगैरे ज्येष्ट नेत्यांच्या मतांनादेखील भाजपाने फारशी किंमत दिली नाही. त्यामुळे भाजपामध्येही लोकशाही मूल्ये गुंडाळून ठेवली जातात असेच चित्र निर्माण झाले. काँग्रेसवर घराणेशाहीचा करण्याचा संघनिष्ठ राजकारण्यांना तसा नैतिक अधिकार नाही.
पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधी ह्यांच्याखेरीज कोणाचे नाव असू शकणार नाही, असे देशभरातल्या यच्चयावत राजकीय पुढा-यांनी 2004 च्या निवडणुकीच्या वेळी गृहित धरले होते. पण सोनिया गांधींनी सगळ्यांचा अंदाज सपशेल खोटा पाडला. खुद्द शरद पवारांचाही होरा तेव्हा खोटा ठरला आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशाचे नेतृत्व राहूल गांधींच्या हाती दिले जाईल असे सर्वजण गृहित धरून चाललेले असताना राहूल गांधी ह्यांच्या निवासस्थानी भरलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रियांका गांधी ह्याही उपस्थित झाल्या. बैठकीच्या दुस-या दिवशी दोघांनी सोनियाजींची भेट घेतली. 16 जानेवारीपूर्वी होणा-या काँग्रेस कार्यकारिणीच्या बौठकीपूर्वी दिल्लीत झालेल्या ह्या हालचाली माझ्या मते खूपच सूचक आहेत. प्रियांका गांधी ह्यांना काँग्रेस नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत का बोलावण्यात आले असावे?  राहूल गांधी ह्यांना निवडणुकीत मदत करण्याच्या दृष्टीने प्रियांकाच्या निश्चित स्वरूपाच्या सूचना विचारात घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले असेल का? की सोनिया गांधींच्या जागेवर त्यांना उमेदवारी देण्याचे काँग्रेसने ठरवल्याचे त्यांना सांगण्यासाठी त्यांना रीतसर पाचारण करण्यात आले?  ह्यातले खरे काय हे कोणालाही सांगता येणार नाही. कदाचित् दोन्हीही खरे असेल किंवा दोन्हींपैकी काहीच खरे नसेल! पक्षप्रवक्त्यांच्या सटरफटर प्रेसकॉन्फरन्स कव्हर करणा-या पत्रकारांना ह्यातले काहीच कळलेले नाही एवढे मात्र खरे!
पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत भाजपाने आघाडी मारली. मोदींची देशभरात सर्वत्र व्याख्यानेही झाली. ह्याउलट पंतप्रधानपदाचा प्रश्न हा निवडणुकीनंतर ठरवण्याची काँग्रेस पक्षाची प्रथा आहे असे सांगत काँग्रसने आतापर्यंत कसा तरी वेळ काढला. पण जानेवारीत झालेल्या पंतप्रधानांच्या प्रेसकॉन्फरन्समध्ये आता देशाची सूत्रे हाती घेण्यास राहूल गांधी लायक आहेत, असे निःसंदिग्ध जाहीर करण्यात आले. त्यापूर्वीही राहूल गांधींना मंत्रिमंडळात सामील होण्याचे आवाहन राहूल गांधींना त्यांनी दोन वेळा केले होते. पण राहूल गांधींना ह्यांना बहुधा त्यांच्या पद्धतीने पक्षात उमेदवारी करायची असल्याने ते त्यांनी स्वीकारले नाही. खेरीज मंत्रिपद स्वीकारून इतर मंत्र्यांकडून आपला आब राखला न जाण्याचा धोका पत्करण्यापेक्षा खेड्यात जाऊन गरीब वस्तीतल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केला होता. अण्णांच्या उपोषणाच्या वेळी  लोकपाल विधेयकाच्या स्वरूपाबद्दल लोकसभेत त्यांनी कोणीतरी तयार करून दिलेले दोन पानी निवेदन वाचून दाखवले. जे वाचून दाखवले ते मात्र मुद्देसूद होते. मुंबईत निदर्शकांना चुकवण्यासाठी त्यांनी लोकलचा प्रवास करून शिवसेनेच्या निदर्शकांना गुंगारा दिला आणि प्रेसची टीका ओढवून घेण्याचा प्रसंगच येऊ दिला नाही.
नव्या वर्षात पहिलीवहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंगांना मिडियाला खडे बोल सुनावण्याची संधी होती. पण ती त्यांनी घेतली नाही. मिडियाचे आपल्याबद्दल काहीही मत असले तरी भावी इतिहासकार मिडियाच्या मताशी सहमत होणार नाही एवढेच माफक विधान त्यांनी केले. वास्तविक सध्याच्या मिडियाबद्दल काँग्रेसच्या बाजूने खूप काही बोलण्यासारखे आहे. विशेषतः मुळीच सिद्ध न करावा लागणारा आरोप करायला मनमोहनसिंग मोकळे होते. पण राजकारणात प्रतिस्पर्ध्याला चीत करणे मह्त्त्वाचे असते ह्या सनातन तत्त्वाचा त्यांना विसर पडला. नरेंद्र मोदींचा हल्ला परतवून लावण्याइतकी ताकद मनमोहनसिंगांकडे नाही हे आता सर्व जण जाणून आहेत.. पण मोदींचा हल्ला परतून लावण्याची ताकद राहूल गांधींत तरी आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. म्हणून तर प्रियांका गांधींना मदतीला आणले असेल का? आम आदमीचा धोशा लावणा-या केजरीवाल कंपनीला रॉबर्ट वधेरांनी 'मँगो' संबोधून किमान खिल्ली तर उडवली होती. त्याप्रकारची खिल्ली राहूल गांधींनाही उडवता आली नाही. कदाचित जे यश राहूल गांधींना मिळाले नाही ते प्रियांका वधेराला मिळू शकते. संजयपुत्राप्रमाणे वरूणकडेही राजीवपुत्र राहूलकडेही वक्तृत्वकला नाही. देशाचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने इंदिरा गांधींच्या नातवांच्या ह्या मर्यादाच म्हटल्या पाहिजे.
निवडणुका जिंकण्यासाठी वक्तृत्वकलेपेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे आहे ह्यात संशय नाही. पण कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळण्यासाठी आधी वक्तृत्वकला मात्र आवश्यच असते. फार जुन्या काळातली उदाहरणे घेण्याची गरज नाही. अगदी अलीकडची उदाहहरणे घेतले तरी हे स्पष्ट होते. अमेरिकेत ज्युनिअर बुश आणि क्लिंटन ह्यांच्याकडे विचारांची सुस्पष्टता होती. ओबामांकडेही ती चांगल्या प्रकारची आहे. वारेमाप गृहकर्जापायी अमेरिका डबघाईस आली तेव्हा ओबानांनी तिथल्या गुंतवणूक व्यावसायिकांना एवढे गलेलठ्ठ पगार कशाला हवेत, असे फटकारले. त्यामुळे त्यांच्यावर कॉम्रेड ओबामा अशीही टीका झाली. काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरूद्ध भाजपाने आरोपांचे धारदार शस्त्र चालवले. ते चालवताना भाजपाने अनेकदा तर संसदीय कामकाजही हाणून पाडले. पण पंतप्रधान मनमोहनसिंग अथवा त्यांचे सहकारी संसदीय कामकाचमंत्री कमलनाथ, अर्थमंत्री चिदंबरम्, खासदार राहूल गांधी इत्यादि मंडळींनी भाजपाच्या सभासदांना साधी 'नेम' करण्याचीही मागणी केली नाही. लोकसभा अध्यक्ष मीराकुमारनी 'आप शांत रहिए' वगैरे आवाहन करून सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यापलीकडे काहीच केले नाही. काँग्रेस हतबल झाल्याचेच चित्र दिसत राहिले. काँग्रेसच्या कारभाराची एकही चांगली बाजू त्यांना संसदेत मांडता आली नाही. पण खुद्द काँग्रेसवाल्यांनाही तसे चित्र दिसले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली हा सर्व परिस्थितीवर कळस झाला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेसचा दणदणीत पराभव झाल्यामुळे आणि भाजपाने सरकार बनवण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये हलकल्लोळ माजला आहे. त्याचेच प्रतिबिंब काँग्रेसच्या ज्येष्ट नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत उमटले असावे. खेरीज भाजपाने उभ्या केलेला रणकल्लोळात राहूल गांधींचा आणि काँग्रेसचा निभाव लागेल का असाही प्रश्न पडलेला असू शकतो. ते काहीही असो. भाजपाचा रणकल्लोळ कसा शमवावा आणि काँग्रेसमध्ये उसळलेला हलकल्लोळ कसा शांत करावा ह्यासाठी प्रियांकाला पाचारण करण्याटी वेळ काँग्रेसवर आली आहे.. आगामी काळात भाजपाच्या रणकल्लोळाला कसे तोंड द्यावे ह्याची चर्चा ज्येष्ट नेत्यांच्या बैठकीत झालेली असू शकते. कदाचित निवडणुकीत सेनानायक बदलण्याचाही हा प्रयत्न असू शकतो. हे येत्या काही दिवसात वस्तुस्थिती स्पष्ट होईल. प्रियांका वधेरा काही अंशी काँग्रेसची बाजू सांभाळू शकतील का हेही लौकरच स्पष्ट होईल.

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: