Wednesday, November 11, 2020

गेला बिहार कुणीकडे?

बिहारमध्ये सुरू झालेल्या मतमोजणीत जसजसे भाजपा उमेदवार आघाडीवर दिसू लागले तसतसे बिहारचे मुख्यमंत्रीपद मुळी नितिशकुमारना कां द्यायचे, ते भाजपाला मिळाले पाहिजे अशी चर्चा दुय्यम- तिय्यम फळीच्या भाजपा नेत्यांत सुरू झाली. निकाल काहीही लागो, मुख्यमंत्रीपद नितिशकुमारनाच देऊ असे वचन भाजपाश्रेष्ठींनी निवडणुकीपूर्वी जाहीररीत्या दिले होते. अर्थात ह्याला कारण शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ह्यांना दिलेला शब्द न पाळल्याने सेना भाजपा युतीला महाराष्ट्रात सत्ता गमावावी लागली होती. शरद पवारांच्या सल्ला आणि मदतीने महाराष्ट्रात युती मोडून उध्दव ठाकरेंना  महाविकास आघाडीचे सरकार आणणे शक्य झाले. महाराष्ट्राचा हा ताजा इतिहास भाजपाश्रेष्ठींच्या डोळ्यांसमोरून नक्कीच तरळून गेला असेल! म्हणूनच त्यांनी नितिशकुमारांना दिलेले वचन पाळले नाही तर हातातोडांशी आलेली बिहारची सत्ता गमावण्याची  वेळ येऊ शकते  ह्याचा भाजपाश्रेष्ठींना अंदाज आला असावा.  आता  ही अखेरची निवडणूक लढवत आहे, असे उद्गार नितिशकुमारांनी निवडणूक प्रचारसभेत काढले. हे उद्गार केवळ मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी काढले नसावे. त्यांच्या ह्या उद्गारात आणखीही गूढ अर्थ दडलेला असू शकतो! कदाचित् काही महिने मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक राज्यपालपद देण्याचा सामंजस्य  करार

ही भाजपा श्रेष्ठींकडून झालेला असावा. अर्थात हा काही तहनसल्यामुळे त्यात अटी वगैरे घालण्याचा प्रश्न उपस्थित झाला नसेल.
बिहारच्या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेजस्वी यादवांच्या रूपाने राजदाची शक्ती बिहारमध्ये उदयास आली. राजदाला भाजपापेक्षा ३ का होईना अधिक जागा खेचून आणण्यात तेजस्वींना यश मिळाले. गेल्या खेपेस ८० जागा मिळवून उपमुख्यमंत्रीपद पटकावणा-या तेजस्वीकुमारचे हे यश लक्षणीय म्हटले पाहिजे. लालूंना तुरूंगात डांबण्यात आल्यामुळे नितिशकुमारांचा मार्ग आधीच मोकळा झालेला होता. तेजस्वीने तो पुन्हा काही अंशी अडवला! रालोआतून नितिशकुमार बाहेर पडले होते. परंतु बिहारला मदतीचे पॅकेज मिळावे म्हणून ते पुन्हा  रालोआत सामील झाले, आता नजिकच्या भूतकाळात सक्रीय राजकारणातून सन्मानपूर्वक निवृत्ती पदरात पाडून घेण्याची संधी नितिशकुमारांनी साधली अलेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. केंद्र सरकार जास्तीत बळकट असले पाहिजे, ‘वन नेशनवगैरे हा भाजपाचा मूळ अजेंडा! तो आमलात आणण्याच्या कामात थोडी खीळ जरूर बसल्याचे दिसते.  परंतु आपला  मूळ गुप्त अजेंडा भाजपाने सोडून दिलेला नाही. तो अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेला पेशन्सही भाजपाकडे आहे. येत्या वर्षांत होणा-या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील काही राज्यात सत्ताधारी पक्षात खिंडार पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भाजपाला फुरसद मिळेल असे राजकीय चित्र दिसत आहे.
बिहारमध्ये ७० जागा लढवणा-या काँग्रेसला अवघ्या २० जागा मिळाल्या. कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि ओवायसींच्या पक्षालाही थोड्या जागा मिळाल्या. देशात झालेल्या पोटनिवडणुकातही काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळवता आल्या नाही. ह्या पक्षाला काय झाले आहे हेच कळत नाही.  बुजूर्ग नेते शरद पवार आणि सोनिया गांधी ह्यांच्यात  तीन दिवस प्रदीर्घ चर्चा झाली तेव्हा कुठे  काँग्रेस  महाविकास आघाडीत सामील झाली आणि सत्तेत थोडाफार वाटा मिळवू शकली! राजस्थानातील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसला खूप प्रयत्न करावे लागले. ते करताना काँग्रेसची दमछाक झाली. कर्नाटकात काँग्रेसने कुमारस्वामींना सत्त्ता मिळवून दिली त्यावेळी काँग्रेसला सत्तेचा वाटा  मिळाला होता. पण येडुरप्पांनी संधी साधून कुमारस्वामींना सत्ताभ्रष्ट केले.  ह्या सा-या घटना दीडशे वर्षांच्या जुन्यापुराण्या काँग्रेस पक्षाच्या मुळावर आल्या आहेत. एकट्याच्या बळावर राहूल गांधी किंवा  सोनियाजी काँग्रेसला किती सावरणार? भाजपाशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला खूप काही करावे लागेल हे बिहार निवडणुकीच्या निकालाने अधिक स्पष्ट झाले.
रमेश झवर 


रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार


No comments: