Saturday, August 10, 2019

जलप्रलयापासून वाचवा!

नद्यांना आलेल्या पुरामुळे थोडासा भाग वगळता अवघ्या महाराष्ट्रावर जलप्रलयाचे संकट आले आहे. ज्या शहरात नद्या नाहीत तिथे सांडपाण्याचे नाले क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने त्या शहरांतील रस्त्यांचे रूपान्तर जणू नद्यात झाले!  ह्या जलप्रलयात झालेल्या वित्तहानी आणि जीवित हानीची मोजदाद करणे अजून तरी शक्य झालेले नाही. जीवितहानीची मोजदाद करता येईल. किंबहुना ती झालेलीही असेल. परंतु किती गुरेढोरे पुरात वाहून गेली ह्याचा आकडा लगेच सांगता येणार नाही. शेती, घरे आणि दुकाने, कर्मचा-यांचे अवजार ह्यांचे किती नुकसान झाले, ते केव्हा भरून निघेल हे मात्र सांगता येणार नाही. पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असला तर मदतीपेक्षा राजकारणाला आलेला पूर अधिक आहे. राज्यात आलेला पूरस्थिती पाहण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काही ठिकाणी धावून गेले खरे. पण ह्या संकटप्रंगी आपण कसे काम करत आहोत ह्याचे घरात बसलेल्या मतदार जनतेला दाखवण्यासाठी त्यांनी सेल्फीचा पाऊस सुरू केला! मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या गहू-तांदूळाच्या पिशव्यावर मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या नावांचे स्टीकर लावण्यात आले!  असे स्टीकर्स लावण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच सांगणार नाही. स्टीकर्समुळे फडणविसांची जी नाचक्की झाली त्याला त्यांच्याच पक्षाचे आगाऊ कार्यक्रतेच जबाबदार आहेत हे उघड आहे. पुराचे राजकारण करू नका ह्या त्यांच्या आवाहनाला त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी हरताळ फासला!
पुरामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती हाताळण्याच्या बाबतीत स्थानिक यंत्रणा कमी पडतात हे समजण्यासारखे आहे. परंतु ही परिस्थिती जास्तीत जास्त बिकट होण्यास मात्र स्थानिक यंत्रणा शंभऱ टक्के जबाबदार आहेत. अभूतपूर्व पर्जन्यवृष्टीला स्थानिक यंत्रणा कारणीभूत नाहीत हे खरे आहे. मात्र, निसर्गाचा कोप कसा आणि केव्हा होईल येता जाता ऐकवण्याचे दिवस अलीकडे उरलेले नाही. पर्यावरणीय बदलामुळे, विशेषतः पृथ्वीचे तपमान वाढत असल्याचा इशारा जगभऱातल्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. पृथ्वीचे, विशेषतः समुद्रावरील पृष्टभागाचे तपमान १-२ अंशांनी वाढत चालल्यामुळे पर्जन्यमानात बदल होतो ह्या निष्कर्षाप्रत अनेक शास्त्रज्ञ आले आहेत. कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याचा इशारा जगभरात दिला जात आहे तो ह्यासाठीच. भारतातल्या सनदी अधिका-यांना हे माहित नाही असे मुळीच नाही.
सद्यस्थितीत नागरीकरणाचे कठोर धोरण स्वीकारावे लागेल हे देशातील प्रत्येक उच्च अधिका-यांना माहित आहे.  त्याचबरोबर त्यांना हेही माहित आहे की हे कठोर धोरण अवलंबताना लोकप्रतिनिधींशी पंगा घ्यावा लागेल. तसा तो घेण्याची कोणाचीही तयारी नाही हे खेदजनक आहे. शास्त्रशुध्द पूररेषा निश्चित करण्याच्या बाबतीत कोल्हापुरात झालेली चालढकल हेतूपूर्वक नाही असे म्हणता येत नाही. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सीआरझेडचे तीनतेरा वाजवून झाले आहेत. त्याचे गंभीर दुष्परिणाम अजून पाहायला मिळाले नाही हे खरे. पण भविष्यकाळात ते पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही. पूररेषा ठरवण्याचो काम असो, वा सीआरझेडची अमलबजावणी असो, दोन्ही बाबतीत सुरू असलेल्या अनीती आणि अनिर्णयाला सर्वपक्षीय आमदार-खासदार आणि नगरसेवक कारणीभूत आहेत. प्रत्येक प्रकरणात सुरू असलेल्या अनीतीत आणि अनिर्णयात स्थायी समितीच्या प्रमुखांबरोबर पालकमंत्रीदेखील सामील आहेत. नदीकाठचा परिसरात वृक्षांची कत्तल करून भूभागाचे सपाटीकरण करण्यास म्हणजेच बेकायदा भूसंपादनाला ना जिल्हा प्रशासनांनी अटकाव केला ना नगरशासनाने! बांधकामांना परनानग्या ही निव्वळ बेफिकीरी नाही. ह्या बांधकामात भ्रष्टराचा भराव घालण्याचे काम राज्यकर्ते, पालिका अधिकारी आणि बिल्डर्स ह्या तिघांनी मिळून केले आहे!
पुराच्या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी राजकर्त्या पक्षाबरोबर विरोधी पक्षांचे उरले सुरले लोक मदत कार्यात गुंतल्याचे चित्र दिसत आहे. पण ह्या सर्वांचा डोळा आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे! ह्याचे कारण सच्च्या  कार्यकर्त्याला कोणताही राजकीय पक्ष मुळात तिकीट देत नाहीत. चुकून तिकीट दिले तरी तो कधीच निवडून येऊ शकत नाही. मदतकार्याला आपला हातभार लागला लावण्यासाठी सिध्दीविनायक, शिर्डी आणि तुळजाभवानी ह्या तीन देवस्थानांनी मोठ्या रकमांची देणगी दिली हे चांगले आहे. साईबाबांच्या, सिध्दीविनायकाच्या आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तास न् तास तिष्ठत राहणा-या लाखो भक्तांनाही देवस्थानांच्या विश्वस्तांनी मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले पाहिजे. संकटात सापडलेल्यांना माणूसकीच्या भावनेने मदत करणेच खरे पुण्य आहे. संताना आणि ईश्वाराला तेच अभिप्रेत हे. असे पुण्याच माणसाला आराध्य दैवताच्या समीप पोहचवते. राज्यातील जनतेला जलप्रलयामुळे आलेल्या संकटातून वाचवण्याच्या बाबतीत तरी उच्चपदस्थ अधिकारी, राज्याचे नेते, विरोधी पक्षातले नेते ह्यांच्यात अभूतपूर्व एकमेळ दिसला पाहिजे. तरच राज्यातील जनतेचे भाग्य पुन्हा फळण्याची शक्यता!
जलप्रलयापासून राज्य वाचवा! महाराष्ट्राचे भाग्यविधाते व्हा!!
रमेश झवर

No comments: