सामान्यतः रमीच्या खेळात तीनपत्ती जुगार लोकप्रिय आहे. परंतु ह्या वेळी विधानसभा
निवडणुकीच्या खेळातला जुगार ‘तीनपत्ती’ नसून ‘पाचपत्ती’ आहे. ह्या निवडणुकीला जुगार म्हणण्याचे कारण कोणत्याही पक्षाचा
स्वतःचा असा म्हणण्यासारखा जाहीरनामा नाही. जाहीरनामा नाही म्हणण्यापेक्षा
जाहीरनामा लिहीण्याइतकेही ठळक मुद्दे त्यांच्याकडे नाहीत. मुद्दे येणार तरी कुठून? ह्या निवडणुकीत पद्धतशीर जाहीरनामा तर सोडाच पण आपला उमेदवार कोण
असेल आणि त्याचा सामना कोणाविरूद्द राहील हे ठरवण्यइतका अवधीही अनेक पक्षांना
मिळाला नाही. जो काही अवधी मिळाला तो एकमेकांवर टीका करण्यात खर्ची पडला!
राज्यातल्या चारी प्रमुख पक्षप्रमुखांना शेवटपर्यंत असे वाटत होते की, कितीही कटकटी झाल्या तरी शेवटी जागावाटप मनासारखे जुळून येणार, समझोता होणारच! काहीही झाले तरी निवडणूक एकत्र लढवण्याच्या मूळ
निर्णयात फेरबदल होण्याचे कारण नाही! अन्य पक्षाबरोबर युती न मोडता कसेही करून
स्वतःचे बहुमत मिळवायचे हे भाजपाचे सूत्र लोकसभा निवडणुकीत यशस्वी ठरलेल होते.
विधानसभा निवडणुकीतही तच सूत्र यशस्वीरीत्या राबवायचे भाजपाने ठरवले होते.
भाजपाप्रमाणे अन्य पक्षांच्या नेत्यांनाही असे वाटू लागले की युत्याआघाड्याचे
राजकारण संपुष्टात आणण्याची हीच वेळ आहे, आता नाही तर कधीच नाही! ह्याचा परिणाम असा झाला की ‘शुअर सीट’बद्दलची प्रत्येक पक्षाची गणिते
चुकणार की काय अशी भीती प्रत्येकास वाटत आहे.
लोकसभा निवडणुकीत प्राप्त झालेल्या यशानंतर भाजपात प्रवेश केला तरच आपली धडगत असल्याचे राज्यातील मातब्बर नेत्यांना वाटू लागले. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे ह्या पक्षातील अनेकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नुसतेच जवळ केले नाही तर तिकीटही दिले. त्यामागे संख्याबळ गोळा करणे एवढे एकमात्र लक्ष्य भाजपाने डोळ्यांसमोर ठेवल्याचे स्पष्ट दिसते. हाच प्रयोग भाजपाने गुजरात, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड ह्या राज्यात केला असून तेथे सत्तेची खुर्चीही प्राप्त केली. ‘उठापटक की राजनीती’ आणि ‘निवडणुकीचा जुगार’ खेळण्याची तयारी हे सूत्र जुन्या काँग्रसावाल्यांचे होते. भाजपाने हे सूत्र चांगल्या प्रकारे आत्मसात केले असून महाराष्ट्रातही त्याचा प्रयोग सुरू आहे. भाजपा नेत्यांची ही ‘खेळी’ लक्षात येताच उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे पंचवीस वर्षांची युती मोडण्यावाचून पर्याय उरला नाही. भाजपा नेत्यांवर त्यांची आगपाखड सुरू झाली ती ह्यामुळेच.
इकडे भाजपा नेत्यांविरूद्ध तोंडसुख घ्यायला शिवसेनेची सुरूवात तर तिकडे पंधरावर्षांपासून सत्तेत सहकारी म्हणून वावरलेल्या अजित पवारांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनीदेखील टीकेची तोफ डागली आहे. आपला पक्ष राज्यव्यापी नाही ह्याची खंत पहिल्यांदाच मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे ह्यांनाही वाटू लागली आहे. ह्याचाच अर्थ राज ठाकरे ह्यांचा आत्मविश्वास पूर्वीइतका राहिलेला नाही.
गेल्या कित्येक वर्षांपासून अपक्ष आमदारांचेही राज्यात एक धोरण ठरलेले आहे. ते म्हणजे शक्यतों सत्ताधा-यांबरोबर उठायचे, बसायचे आणि जेवताना पान मांडायचे! म्हणूनच अपक्षांच्या मदतीखेरीज सरकार स्थापन करता येतच नाही अशी स्थिती युती शासनाच्या काळात होती. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाच्या काळातही होती. अपक्षांची मनधरणी करावी लागत नाही. सत्ता काबीज करायची असेल तर त्यांच्याबरोबर सौदा करावा लागतो. मग निम्मे काम संपते. राहता राहिला प्रश्न कमी पडणा-या जागा कशा गोळा करायच्या हा! ह्या वेळी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या चारी पक्षांना सुचतील ते सर्व पर्याय मोकळेच आहेत.
माझे मित्र रमेश गुणे ह्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपा 122 तर शिवसेनेला 80 जागा मिळतील. काँग्रेसला 30-35 तर राष्ट्रवादीला 20-25 आणि मनसेला 10 जागा! त्यांच्या मते, इतर म्हणजे अपक्ष वगैरेंना 10 जागा मिळू शकतात. रमेश गुणे ह्यांनी संघनेते नानाजी देशमुख ह्यांच्याबरोबर सामाजिक काम करण्यापूर्वी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये वार्ताहर म्हणून उमेदवारी केली होती. संघाच्या पठडीत राहूनदेखील ते कधीही भोळसर आशावादाच्या आहारी गेले नाहीत! आता त्यांचे वास्तव्य अमेरिकेत आहे. सुरूवातीला त्यांनी अमेरिकेत पत्रकारिता केली. अलीकडे त्यांनी व्यवसाय बदलला आहे, म्हणूनच ते राजकीय पूर्वग्रहापासून मुक्त आहेत. लोकसत्तेत शिवसेना आणि मनसेचा बिट सांभाळणारे संदीप आचार्य ह्यांच्या मते, शिवसेनाला 70-80 जागा मिळतील. ह्या जागा पूर्वीपेक्षा जास्तच असतील. राष्ट्रवादीला गेल्य़ा विधानसभा निवडणुकीत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा ‘जास्त’ जागा मिळाल्या हे खरे; परंतु राष्ट्रवादीला झालेले मतदान राष्ट्रवादीची सत्तेत भागीदारी राहणार हे लक्षात घेऊन केलेले होते हे विसरता येणार नाही. आता स्थिती पूर्ण पालटली आहे. ह्याचे साधे कारण हे चारी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत!
एकवेळ राजकीय पक्षांचा मुद्दा बाजूला ठेवला तरी उमेदवारांचे ‘प्रोफाईल’ कसे पूर्वीसारखेच आहे. ह्या निवडणुकीत उतलेले 34 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून भाजपाकडे 53 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काँग्रेसने उभे केलेल्या उमेदावारात 33 टक्के उमेदावारांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या पक्षातही गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तोटा नाही. त्याखेरीज कोट्याधीश उमेदवार, लाखभर रुपयांच्या आत निवडणुकीचा जुगार खेळायला बसलेले उमेदवार, शिकलेले तसेच कमी शिकलेले अशा सर्वच उमेदावारांना तिकीटे मिळाली आहेत. मतदारांच्या ‘प्रोफाईल’मध्ये फारसा फरक पडलेला नाही. उलट तो पूर्वीपेक्षा जास्त गोंधळलेला आहे. राजकारण हा महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय धंदा असून सर्व जुन्या-नव्या घराण्यांचे उमेदवार रिंगणात आहेत. फरक फक्त इतकाच आहे की ह्यावेळचा जुगार तीनपत्ती नसून पाचपत्ती आहे. त्यामुळे कोणाचा सिक्वेन्स कसा जुळेल हे सांगता येणार नाही.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
लोकसभा निवडणुकीत प्राप्त झालेल्या यशानंतर भाजपात प्रवेश केला तरच आपली धडगत असल्याचे राज्यातील मातब्बर नेत्यांना वाटू लागले. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे ह्या पक्षातील अनेकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नुसतेच जवळ केले नाही तर तिकीटही दिले. त्यामागे संख्याबळ गोळा करणे एवढे एकमात्र लक्ष्य भाजपाने डोळ्यांसमोर ठेवल्याचे स्पष्ट दिसते. हाच प्रयोग भाजपाने गुजरात, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड ह्या राज्यात केला असून तेथे सत्तेची खुर्चीही प्राप्त केली. ‘उठापटक की राजनीती’ आणि ‘निवडणुकीचा जुगार’ खेळण्याची तयारी हे सूत्र जुन्या काँग्रसावाल्यांचे होते. भाजपाने हे सूत्र चांगल्या प्रकारे आत्मसात केले असून महाराष्ट्रातही त्याचा प्रयोग सुरू आहे. भाजपा नेत्यांची ही ‘खेळी’ लक्षात येताच उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे पंचवीस वर्षांची युती मोडण्यावाचून पर्याय उरला नाही. भाजपा नेत्यांवर त्यांची आगपाखड सुरू झाली ती ह्यामुळेच.
इकडे भाजपा नेत्यांविरूद्ध तोंडसुख घ्यायला शिवसेनेची सुरूवात तर तिकडे पंधरावर्षांपासून सत्तेत सहकारी म्हणून वावरलेल्या अजित पवारांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनीदेखील टीकेची तोफ डागली आहे. आपला पक्ष राज्यव्यापी नाही ह्याची खंत पहिल्यांदाच मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे ह्यांनाही वाटू लागली आहे. ह्याचाच अर्थ राज ठाकरे ह्यांचा आत्मविश्वास पूर्वीइतका राहिलेला नाही.
गेल्या कित्येक वर्षांपासून अपक्ष आमदारांचेही राज्यात एक धोरण ठरलेले आहे. ते म्हणजे शक्यतों सत्ताधा-यांबरोबर उठायचे, बसायचे आणि जेवताना पान मांडायचे! म्हणूनच अपक्षांच्या मदतीखेरीज सरकार स्थापन करता येतच नाही अशी स्थिती युती शासनाच्या काळात होती. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाच्या काळातही होती. अपक्षांची मनधरणी करावी लागत नाही. सत्ता काबीज करायची असेल तर त्यांच्याबरोबर सौदा करावा लागतो. मग निम्मे काम संपते. राहता राहिला प्रश्न कमी पडणा-या जागा कशा गोळा करायच्या हा! ह्या वेळी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या चारी पक्षांना सुचतील ते सर्व पर्याय मोकळेच आहेत.
माझे मित्र रमेश गुणे ह्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपा 122 तर शिवसेनेला 80 जागा मिळतील. काँग्रेसला 30-35 तर राष्ट्रवादीला 20-25 आणि मनसेला 10 जागा! त्यांच्या मते, इतर म्हणजे अपक्ष वगैरेंना 10 जागा मिळू शकतात. रमेश गुणे ह्यांनी संघनेते नानाजी देशमुख ह्यांच्याबरोबर सामाजिक काम करण्यापूर्वी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये वार्ताहर म्हणून उमेदवारी केली होती. संघाच्या पठडीत राहूनदेखील ते कधीही भोळसर आशावादाच्या आहारी गेले नाहीत! आता त्यांचे वास्तव्य अमेरिकेत आहे. सुरूवातीला त्यांनी अमेरिकेत पत्रकारिता केली. अलीकडे त्यांनी व्यवसाय बदलला आहे, म्हणूनच ते राजकीय पूर्वग्रहापासून मुक्त आहेत. लोकसत्तेत शिवसेना आणि मनसेचा बिट सांभाळणारे संदीप आचार्य ह्यांच्या मते, शिवसेनाला 70-80 जागा मिळतील. ह्या जागा पूर्वीपेक्षा जास्तच असतील. राष्ट्रवादीला गेल्य़ा विधानसभा निवडणुकीत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा ‘जास्त’ जागा मिळाल्या हे खरे; परंतु राष्ट्रवादीला झालेले मतदान राष्ट्रवादीची सत्तेत भागीदारी राहणार हे लक्षात घेऊन केलेले होते हे विसरता येणार नाही. आता स्थिती पूर्ण पालटली आहे. ह्याचे साधे कारण हे चारी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत!
एकवेळ राजकीय पक्षांचा मुद्दा बाजूला ठेवला तरी उमेदवारांचे ‘प्रोफाईल’ कसे पूर्वीसारखेच आहे. ह्या निवडणुकीत उतलेले 34 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून भाजपाकडे 53 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काँग्रेसने उभे केलेल्या उमेदावारात 33 टक्के उमेदावारांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या पक्षातही गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तोटा नाही. त्याखेरीज कोट्याधीश उमेदवार, लाखभर रुपयांच्या आत निवडणुकीचा जुगार खेळायला बसलेले उमेदवार, शिकलेले तसेच कमी शिकलेले अशा सर्वच उमेदावारांना तिकीटे मिळाली आहेत. मतदारांच्या ‘प्रोफाईल’मध्ये फारसा फरक पडलेला नाही. उलट तो पूर्वीपेक्षा जास्त गोंधळलेला आहे. राजकारण हा महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय धंदा असून सर्व जुन्या-नव्या घराण्यांचे उमेदवार रिंगणात आहेत. फरक फक्त इतकाच आहे की ह्यावेळचा जुगार तीनपत्ती नसून पाचपत्ती आहे. त्यामुळे कोणाचा सिक्वेन्स कसा जुळेल हे सांगता येणार नाही.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
बिगरमराठी वाचकांसाठी खास साईटः http://en.rameshzawar.com/wordpress/
आपल्या बिगरमराठी मित्रांना सांगा. तुम्हीही मुद्दाम भेट द्या!
No comments:
Post a Comment