Tuesday, December 29, 2015

चालतीबोलती कविता निघून गेली!

मंगेश पाडगावकरांनी अखेर निरोप घेतला. चालतीबोलती कविता निघून गेली. कविता हा त्यांचा श्वास होता. संदेश देणे ही त्यांची प्रकृती नव्हती. तरीही त्यांनी लिहीलेली ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही ओळ महाराष्ट्राला संदेश ठरली! जीवनावर भाष्य करावं अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती. ते लिहीत राहिले. सुचलं की लिहीलं हा त्यांचा पिंड होता. उच्च्भ्रू साहित्यिक वर्तुळाची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. त्यांच्या अंतःस्फूर्तीने कुठलाच नियम मानला नाही. लिज्जत पापडच्या जाहिरातीत, पावसाळा आला की पावसावर ! आकाशवाणी आणि नंतर मुंबईस्थित अमेरिकन माहितीकेंद्रावर नोकरी करत असताना तिथल्या राजकारणात अजिबात भाग न घेणा-या पाडगावकरांनी कधी माहितीचा आव आणला नाही की रसिकतेचा टेंभा मिरवला नाही. तो मिरवायची त्यांना कधी गरजच भासली नाही!
यशवंत, गिरीश आणि सोपानदेव चौधरी ह्या कवीत्रयींना महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांच्याआधी एकाही मराठी कवीला ते भाग्य मिळाले नव्हते. परंतु वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर ह्या कवीत्रयींना हे भाग्य मिळाले. सोपानदेव, यशवंत आणि गिरीश ह्यांच्या काव्यगायनाची परंपरा बापट, विंदा आणि पाडगावकरांनी जिवंत ठेवली इतकेच नव्हे तर त्या परंपरेत रसरशीतपणा ओतला. मी स्वांत सुखाय लिहतो ह्या दंभोक्तीच्या आहारी मराठीतले अनेक कवी गेले आहेत. पण मंगेश पाडगावकरांना ह्या दंभोक्तीने कधी पछाडले नाही. नोकरीमुळे त्यांच्या काव्यलेखनात विघ्न आले नाही की खासगीत सतत चालणा-या निंदानालस्तीनेही कधी त्यांच्या काव्यलेखनात विघ्न आले नाही. मराठी माणूस नाटकांवर जितके प्रेम करतो तितकेच तो कवितेवरही प्रेम करतो हे मंगेश पाडगावकर ओळखून होते. म्हणूनच ताजी कविता त्यांना ताज्या मासळीइतकीच प्रिय होती.
ज्योतिष हा एक त्यांचा छंद होता. अनेकांच्या कुंडल्या त्यांनी पाहिल्या होत्या. आपले  भविष्यकथन हा चेष्टेचा विषय होतो हे त्यांना माहित होते. पण त्यांनी कधी त्यांची पर्वा केली नाही. माझे बंधू   बाळकृष्ण झवर ह्यांच्या संपादकत्वाखाली ज्योतिषधारा ते वाचत असत. ज्योतिषधाराच्या अंकात छापून आलेले लेख आवडले की ते आवर्जून फोन करायचे. लोकसत्तेत आले तर मुद्दाम माझ्या टेबलापाशी येऊन कौतुक करायचे. पुढे ज्योतिष धाराचे स्वरूप बदलले. तेव्हा ते त्यांना आवडले नाही. ते म्हणाले, मी जगातली अनेक नियतकालिके चाळत असतो. तुमच्या ज्योतिषधाराचे स्वरूप जागतिक नियतकालिकांच्या तोडीचे होते. ते तुम्ही का बदलले?  ह्या त्यांच्या प्रश्नाला प्रामाणिक उत्तर देण्याची मला भीती वाटली. साधारण महिना उलटल्यावर मी त्यांना युसिसमध्ये भेटलो. सांगितलं, अण्णा जाहिरातीचं उत्पन्न नव्हतं. म्हणून स्वरूप बदललं. नाव बदललं. त्यावर ते काही बोलले नाही. एक दयाद्र कटाक्ष टाकला, बस्स! पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ज्योतिषधाराचा विषय कधीच काढला नाही.
विद्याधर गोखल्यांनी त्यांना दिवाळी अंकासाठी कविता मागणारे पत्र पाठवायला सांगितले. दोन दिवसांनी त्यांनी फोन केला, ह्या वर्षी एकाही दिवाळी अंकात कविता देणार नाही. माझ्यापुढे संकट उभे राहिले. मी लगेच विद्याधर गोखल्यांच्या हातात फोन दिला. गोखल्यांनाही त्यांनी तेच सांगिततले. गोखले म्हणाले, मंगूअण्णा! याद राख. तुझी कुठल्याही दिवाळी अंकात कविता दिसली तर तुझं डोस्क फोडीन...पाडगावकर काय म्हणाले हे मला ऐकू आले नाही. पण त्यांनी सांगितलं असावं, एका दिवाळी अंकात जरी कविता दिसली तर तुम्ही खुशाल माझं डोकं फोडा!
त्या वर्षी एकाही दिवाळी अंकात पाडगावकरांची कविता दिसली नाही. ह्या प्रसंगाला खूप वर्षे झाली. आजचा दिवस असा उगवला, पाडगाव दिसणार नाही!  त्यांची गजल, भावगीत किंवा मुलांचे गाणं त्यांच्या स्वरात ऐकायला मिळणार नाही. पेयतेवाचून पाणी नाही तसं गेयतेवाचून गाणे नाही. पण पाडगावकर कधी गेयतेही अडकले नाही. त्यांचं साधं वाचनही गेयतेवर कडी करणारं होतं. सूर आणि स्वराबरोबर त्यांच्या कवितेला अर्थाचे वावडे नव्हते. नव्हे, त्यांच्या सा-याच कविता अर्थगर्भ होत्या. मनामनातल्या भावना त्यांच्या कवितेत सहज प्रवेश करायच्या! हिंदीतला मुशायरा काय चीज आहे हे कळलं हे महाराष्ट्राला प्रथमच कळलं. कवितेखेरीज कशाच्याच भानगडीत न पडलेल्या मंगेश पाडगावकरांचे महाराष्ट्राला सतत स्मरण होत राहील!


रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: