Thursday, November 21, 2019

अग्रलेखांचा बादशहा

मी मुंबईला आलो तेव्हा निळूभाऊ हे नवाकाळचे रिपोर्टर होते. गाजलेले नाटककार कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकरांचा हा नातू कसा आहे हे पाहण्याची मला उत्सुकत होती. पण तो योग जुळून यायला खूप वर्ष लागली. मी मराठात लागलो तेव्हा निळूभाऊंचे रिपोर्ट नवाकाळमध्ये छापून यायचे. विशेष म्हणजे एखाद्या घटनेची इत्थभूत माहिती जाणून घ्यायची तर नवाकाळच्या पहिले पान अवश्य वाचण्याचा प्रघात मी सुरू केला! निळूभाऊंच्या बातम्या पहिल्या पानावर यायच्या. त्यामुळे मराठा वाचून झाला की नवाकाळ मस्टहोता. आतल्या पानात अप्पासाहेबांचा अग्रलेख असायचा. पण आतल्या पानापर्यंत मी क्वचितच जात असे.त्या काळी मराठाच्या संपादक खात्यात आणि दुस-या मजल्यावर असलेल्या साहेबांच्या निवासस्थानी मुंबईहून प्रसिध्द होणारी सकाळी
वर्तमानपत्रे यायची. आचार्य अत्रे रोज सकाळी लौकर उठायचे. घाडी किंवा पाटील हे त्यांचे शिपाई सकाळी ताजे पेपर आले की साहेबांच्या टीपॉयवर नेऊन ठेवायचे. साहेबांचा अवडता पेपर कोणता ह्याची चर्चा संपादक खात्यात चालायची. त्या चर्चेतून असे कळले की नवाकाळ हा साहेबांचा आवडता पेपर! मला आश्चर्यच वाटले. नवाकाळ वाचून झाला की साहेब टाईम्स ऑफ इंडिया वाचायचे. टाईम्स वाचता वाचता एखादी आगाळीवेगळी बातमी वाचली की त्यावर खूण करायचे आणि पेपर खाली संपादक खात्यात पाठवून द्यायचे. खूण केलेल्या बातम्यांपैकी एखादी बातमी सांजमराठाला घ्यायची असेल तर संपादक खात्यातल्या सांजच्या संपादकाला आवर्जून फोन करायचे. कधी कधी बोलावूनही घ्यायचे.
नवाकाळमध्ये साहेब अर्थात् निळूभाऊंनी लिहलेला रिपोर्ट वाचायचे. तो वाचून झाला की त्यांचे नवाकाळचे वाचन संपले! त्यावेळी निळूभाऊ अग्रलेखांचे बादशहाझाले नव्हते. अग्रलेखांचा बादशहा ही बहुमानाची पदवी निळूभाऊंना कुणी दिली हे मला माहित नाही. पण आचार्य अत्र्यांच्या निधनानंतर केव्हातरी त्यांना ती प्राप्त झाली असावी. निळूभाऊंच्या शैलीवर नाटककार कृष्णाची प्रभाकर खाडिलकर आणि आचार्य अत्रे ह्या दोघांच्या शैलीचा प्रभाव पडला होता. मात्र, दोन्हींचा प्रभाव बाजूस सारून निळूभाऊंनी त्यांची स्वतःची शैली निर्माण केली. ती निर्माण करत असताना अतिशयोक्तीचा अलंकार निळूभाऊंनी बाजूस सारला. जे लिहायचे ते रोखठोक असा त्यांचा खाक्या होता. अन्य वर्तमानपत्रांच्या अग्रलेखात शक्यतो कोणावरही घसरायचे नाही किंवा दिलखुलास पाठिंबाही द्यायचा नाही ह्याची जणू संपादक काळजी घएत आहेत की काय असे वाटायचे. एखाद्या धोरणाबद्दल अथवा घटनेबद्दल वाक्यावाक्यातून संपादकांचे रिझर्व्हेशनव्यक्त व्हायचे. साध्या भाषेत सांगायचे तर निःसंदिग्ध मत व्यक्त करण्यापेक्षा अशी भूमिका घ्यायची की संपादकांची नक्की भूमिका कोणती ह्याचा वाचकाला थांग पत्ता लागू नये. थोडक्यात, गुळमुळीत अग्रलेख लिहून मोकळे व्हायचे! ह्या पार्श्वभूमीवर निळूभाऊ सडेतोड लिहायचे. त्यांचा पाठिंबा इंदिरा काँग्रेसला होता. पण इंदिरा काँग्रेसमधील गणंगाना त्यांचा अजिबात पाठिंबा नव्हता. निळूभाऊ अग्रलेखांचे बादशहाठरले नसते तरच नवल होते. मी मराठा सोडून लोकसत्तेत गेल्यानंतर पत्रकारसंघात निळूभाऊंची गाठ पडली. त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याशी ओळखच असली पाहिजे असे काही त्या काळात नव्हते. बसच्या तिकीटीवर एखाद्या सभेतील प्रमुख वक्त्यांच्या भाषणातील एकदोन शब्दच ते लिहून घ्यायचे. त्याबद्दल मी आश्चर्य व्यक्त करताच ते म्हणाले, मन लावून भाषणे ऐकली की तुम्हालाही ते जमेल! शब्दशः रिपोर्टिंगची फॅशन त्या काळात लुप्त होत चालली होती. एकामागून एक पॅरेग्राफचे पॅरेग्राफ लिहणे म्हणजेच रिपोर्टिंग असे काही जर्मानलिझममध्ये नाही असे त्या काळात इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार उठता बसता बोलायचे. निळूभाऊंचे रिपोर्टींग स्कूलमात्र वेगळे होते. एकच रिपोर्ट लिहला तरी चालेल, पण तो सणसणीत असला पाहिजे असे त्यांचे मत होते. कदाचित कमी पृष्टसंख्येवर मात करण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा.
मोठ्या वर्तमानपत्रांना जाहिराती कशा मिळतील ह्याचा विचार करावा लागतो!निळूभाऊ
मोठी वर्तमानपत्रे खपाचाही विचार करतात!माझा क्षीण युक्तिवाद.
त्यावर निळूभाऊ हसले. म्हणाले, ‘अजून तुम्हाला वर्तमानपत्रांच्या
धंद्याची माहिती नाही. होईल हळुहळू!
नंतर त्यांनी खप आणि कंपनीचे बॅलन्सशीट कसे मॅन्युपिलेट केले जाते मला
लेक्चर दिले. त्याच विषयावर त्यांनी नंतर नवाकाळमध्ये सणसणीत लेखमाला लिहली. त्या लेखमालिकेत एबीसी रिपोर्ट, जमाखर्च, बँकिंग वगैरे सगळ्या मुद्द्यांचा निळूभाऊंनी विस्तृत परामर्ष घेतला. कुणाचेही नाव न घेता त्यांनी जास्त खपाचे मर्म उलगडून दाखवले. बारकावे टिपण्याची त्यांच्या लेखणीचा किमया पाहायची असेल तर ही लेखमाला अवश्य वाचून पाहावी असे मला वाटते. नंतर माझ्या जसजशा अनेक चार्टर्ड अकौऊंटंटच्या भेटीगाठी वाढत गेल्या तेव्हा मला निळूभाऊंच्या लेखमालेतली सत्यता पटू लागली. मिडिया व्यवसायाचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ती लेखमाल अवश्य वाचून पाहावी.नव्वदच्या दशकात मी न्यूजएडिटर झाल्यानंतर माझा व्यवस्थापकवर्गाशी जवळून संबंध आला. एका भेटीत आमच्या कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी रंगनाथन् ह्यांनी मला सांगितले, नवाकाळ हा लोकसत्तेचा पहिल्या नंबरचा स्पर्धक आहे. कमी पानांच्या वर्तमानपत्राचा खप वाढण्याचे कारण एकच होते, डाऊनमार्केटमधल्या वाचकांना आवडणारा मजकूर देण्यावर निळभाऊंचा कटाक्ष होता. त्या जोरावरच छोट्या जाहिरातींचा ओघ नवाकाळकडे वळवण्यात नवाकाळला यश मिळाले. संपादक ह्या नात्याने पेपरचा खप वाढवून दाखवणारे निळूभाऊ खाडिलकर हे, मला वाटते, अखेरचे मराठी संपादक!
त्यांना माझी विनम्रश्रध्दांजली.

रमेश झवर 

ज्येष्ठ पत्रकार

No comments: