Sunday, July 5, 2020

कोरोनाचं आक्रित

५ जुलै रोजी उजाडलेला रविवार वाढीव कोरोनारूग्ण संख्येसोबत मुसळधार पाऊसही घेऊन आला!  रविवारी कोरोनाग्रस्तांची संख्या ६७३१६५ झाली उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २४४८१५ झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी कोरोना रूग्णांची संख्या २ लक्ष ६६१९ झाली तर कोरोना बळींची संख्या ८८२२ झाली. महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक आहे. अर्थात कोरोनाच्या आजारातून मुक्त होऊन घरी परतणा-यांची संख्या वाढली ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब! ह्या आकड्यांचा अर्थ स्पष्ट आहे. अजून तरी कोरोनाचं आक्रित संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. चिंतेची बाब अशी की कोरोनाचा फैलाव झालेल्या देशांत भारत आता तिस-या क्रमांकावर पोहोचला. अमेरिका पहिवा तर ब्राझिल दुसरा! भारत आणि रशियाह्या दोन्ही देशात रूग्णसंख्येत फारसा फरक नाही. रशिया तिस-या क्रमांकावर आहे! भारत केव्हाही रशियाच्या पुढे निघू शकतो.
कोरोनाकडे लक्ष गेल्यानंतर जगभरातील सरकारांनी ज्या प्रकारची उपाययोजना केली त्याच प्रकारची उपाययोजना भारतातही केंद्र सरकारने केली. ३ वेळा प्रदीर्घ टाळेबंदी, नंतर अन्लॉक-१ आणि सुधारित अन्लॉक-१ अशी लोकजीवनाची वाटचाल सुरू आहे. कोरोनाविना आणि कोरोनासह ह्या दोन्ही प्रकारे लोकजीवन सुरू झाल्याला सुमारे साडेतीन महिने झआले. तरीही कोरोना कमी होण्याचे नाव नाही. उलट, तो वाढथच आहे. कोरोनावरून राजकारण करायचे नाही असे सांगत देशभरातील सा-या राजकीय पक्षांनी कोरोनाचे राजकारण केलेच. ट्विटरबाजी आणि आभासी जाहीर सभांची चटक लागलेल्या राजकारण्यांकडून वेगळी अपेक्षा बाळगण्यात फारसा अर्थ नाही. कोरोना संकट हाताळण्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीची टिमकी वाजवण्यात खुद्द केंद्र सरकारही सामील झाले हे वाईटच!
औषधोपचाराच्या बाबतीतली स्थिती वेगळी नाही. Hydroxychloroquine ह्या औषधाचा कोरोनावरील उपचारात फारसा उपयोग झाली नाही असे जागतिक आरोग्या संघटनेने जाहीर केले तर १५ ञॉगस्ट रोजी कोरोना प्रतिबंधक लसचे भारतात उत्पादन सुरू करण्याची घोषणा करण्याची कंद्र सरकारल घाई झाल्याचा तज्ज्ञांचे मत आहे. ह्या संदर्भात गोंधळ केव्हा संपुष्टात येईल ह्याची वाट पाहण्याखेरीज लोकांच्या हातात काही नाही. कोरोना उपचाराच्या बाबतीत डॉक्टर मंडळींतले मतभेदही चव्हाट्यावर आले!  त्यात हळद वगैरे टाकलेले काढे प्या, लंवगा चघळा वगैरे उपदेश देत देशभरातल्या तथाकथित आयुर्वेद तज्ज्ञांनी व्हॉट्स आणि फेसबुकवर धमाल उडवून दिली. परंतु निर्जीव करोनापुढे अजून तरी कोणाचे काही चालले नाही असे आकडेवारीच सांगते. शेवटी, दैववाद आणि अंधश्रधदेच्या मार्गानेच भारतीय समाज वाटचाल करू लागण्याची भीती नव्याने उत्पन्न झाली आहे. भारतातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कुचकामी असून भारत अजून पुढारेला देश नाही हे कटू सत्य कोरोनामुळे लक्षात आले.
युरोप-अमेरिकेच्या तुलनेने भारतात कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यूदर कमी आहे, असा युक्तिवाद करण्यात सरकारला धन्यता वाटते. भारत आणि युरोप-अमेरिका ह्यांची तुलना मुळातच अप्रस्तुत आहे. कारण, युरोप-अमेरिकेच्या हवामानात आणि भारताच्या हवामानात जमीनअस्मानचा फरक आहे. थंड प्रदेशातल्या लोकांची लोकांची प्रतिकारशक्ती उष्ण कटिबंधातल्या भारतासारख्या देशातल्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे. थंड प्रदेशात कोरोना मृत्यूदर अधिक असेल तर त्यात आश्चर्य नाही. असो.
कोरोनाकामगिरीबद्दल केंद्रीय सरकार किंवा अन्य राज्य सरकारे स्वतःच्या कामगिरीवर खूश असतील तर असोत बापडी! मात्र, कोरोना आक्रिताची चिंता संपलेली नाही. आज ना उद्या ती संपली तर कामधंदा आणि रोजगार सुरळित होण्याची चिंता संपण्याचे लक्षण दिसत नाही.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: