Thursday, July 16, 2020

गूगलचा पैसा

येत्या काही वर्षांत भारतात गूगलकडून ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यापैकी ३३७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक अंबानीच्या जिओच्या विविध उपकंपन्यात केली जाणार आहे. ह्यापूर्वी फेसबुक ह्या विख्यात कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये १ लाख १६ हजार कोटीं रुपयांची गुंतवणूक केली होती. असून अंबानीं गटाला कर्जमुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आगामी प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा फेसबुकचा हेतू होता. जिओतर्फे लहान दुकानदार आणि छोटे उद्योजक ह्यांना ऑनलाईन काम करता यावे म्हणून स्वस्त दराने वर्ड, एक्सेल ह्या दैनंदिन गरजेच्या किमान सॉफ्टवेअरसह इंटरनेट सेवा पुरवण्याचे जिओने मागेच जाहीर केले होते. आता जिओतर्फे गूगल मीटच्या धर्तीवर जिओ मीटहे नवे सॉफ्टवेअर बाजारात येणार आहे. 
अमेरिकेत १९९८ साली स्थापन झालेल्या गूगलचे २००४ साली भारतात आगमन झाले. गूगल विद्यापीठ’ ‘व्हॅटस्अप युनिव्हर्सिटीचे विद्वान अशी भारतातल्या मध्यमवर्गिंयांची कितीही टवाळी करण्यात आली तरी गेल्या १५-१६ वर्षांत गूगलने भारतातील माहिती क्षेत्रात चांगले बस्तान बसवले हे नाकारता येणार नाही. विशेषतः गूगल मेल आणि गूगल सर्च इंजिनने भारतातील बुध्दिवंतांना अक्षरशः ताब्यात घेतले तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी गाठू इच्छिणा-या अंबानी गटाच्या प्रयत्नांना गूगलची साथ मिळणार आहे. त्यामुळे अंबानी पुढे जाणार ह्यात शंका नाही. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि कौशल्यविकास ह्या पंतप्रधान मोदींच्या घोषणांमागील इंगित आता तरी ध्यानात यावे!
मोदी सरकारने नीती आयोगाच्या सल्ल्याने आरोग्य सेवा, फिनान्शियल सर्विहसेस इत्यादी ५ क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रकल्पांवर संशोधन सुरू केले असून तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते व्यापारी वापरासाठी खासगी क्षेत्रांकडे सुपूर्द केले जातील हे उघड आहे. त्याखेरीज ४ जी आणि ६५ जी ह्या सेवाही लौकरच देशात सुरू होणार आहेत. ह्या सगळ्यांचा फायदा रिलायन्सला मिळेल हे उघड आहे.
ओरॅकल, अपल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, गूगल इत्यादि अनेक    कंपन्यांचा अमेरिकेच आणि जगात किती पसारा वाढला आहे ह्याची कल्पना करता येणार नाही. ह्या कंपन्यांची आपापसात जोरदार स्पर्धा असली तरी काही बाबतीत त्या एकमेकांना भंडावूनही सोडतात. विशेष म्हणजे ह्या सा-या कंपन्यांची कार्यक्षेत्रे भिन्न आहेत. कोणी आर्टिफिशयल इंटेलिजन्समध्ये तर कोणी ब्लॉकचेन क्षेत्रात पुढे घुसण्याच्या प्रयत्नात आहे. महासंगणकाकडून क्लाऊड टेक्नालॉजीकडे प्रवास तर ह्यापूर्वीच सुरू झाला. अपनिर्मितीचा अनेकांना धडाका लावला असून हातातल्या मोबाईलवरून वाट्टेल ती काम करण्याचा अनुभव लोक घेत आहेत.  विशेष म्हणजे ह्या कामात भारतातून अमेरिकेत गेलेल्या सॉफ्टवेअर तज्ज्ञांचा वाटा मोठा आहे. परंतु ते सगळे श्रीमंत झालेले नाहीत! ह्या संदर्भात एकच म्हणता येईल की गूगलचा कार्यकारी संचालक सुंदर पिचाई हा अमेरिकेतला सर्वात जास्त पगार घेणारा सीइओआहे. असे असले तरी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्सप्रमाणे त्यांचे नाव फोर्बस् च्या अति श्रीमंतांच्या यादीत नाही. ह्याउलट, मुकेश अंबानी, कुमारमंगलम् बिर्ला, सुनिल मित्तल, रतन टाटा ह्यांची नावे मात्र फोर्बस् च्या यादीत आहेत!
साहसे श्रीः प्रतिवसतिह्या संस्कृत उक्तीखेरीज  ‘पैशाकडे पैसा जातोअशीही लोकोक्ती आहे. अंबानी ह्या दोन्ही उक्तीत फिट बसतात. पंतप्रधान मोदींच्या सरकारचे निर्णय अंबानी गटाला अनुकूल घेतले जातात अशी सार्वत्रिक टीका केली जाते! परंतु अंबानींकडे वाट्टेल त्या क्षेत्रात घुसण्याचे साहस नसते तर मोदी सरकारने घेतलेल्या अनुकूल निर्णयांचा फायदा त्यांना घेता आला असता का? कुमारमंगलम् बिर्ला टेलिकॉम क्षेत्राच्या थकबाकीत अडकले तर एअरटेलचा विस्तार दक्षिण आशिया आणि आफ्रिका ह्या दोहोत मिळून एकूण १८ देशात करण्यात सुनिल मित्तलनी यश मिळवले. टाटांचे बलस्तान आयर्न तर बिर्लांचे बलस्थान सिमेंट क्षेत्र आहे. टीसीएस सारखी माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातली भारतातील सर्वात मोठी कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बिर्लांचा विस्तार गरजेपुरताच आहे. मोदी सरकारच्या नव्या धोऱणांचा फायदा घेण्यासाठी टाटा आणि बिर्ला कंपन्या फारशा पुढे आल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे!
कुमारमंगलम् बिर्ला हे अवघ्या ५२ वर्षांचे तर मुकेश अंबानी  ६३ वर्षांचे! वास्तिवक दोघांची तुलना करण्याचे कारण नाही. कुमारमंगलम् बिर्लांकडे सुरूवातीला धडाडी होती. ती कमी झाली की काय न कळे! तुलनेने मुकेश अंबानी ६३ वर्षांचे असून त्यांची धडाडी कमी झालेली नाही.  विदेशी भांडवलांच्या मदतीने अतिरेकी खासगीकरण आणि आत्मनिर्भर भारत ही मोदी सरकारची धोरणातली ठळक विसंगती आहे  खरीपरंतु त्या विसंगतीवर बोट ठेवण्यापेक्षा विसंगतीचा फायदा कसा घेता येईल ह्याचा उद्योगपतींनी विचार करणे श्रेयस्कर ठरेल. भारत ही आयात मालाची बाजारपेठ होण्यासाठी ते आवश्यक आहे. पैसा उभा करा आणि जोमाने कामाला लागा; अन्यथा धडगत नाही!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: