Thursday, December 31, 2020

कोरोना संवत्सराला निरोप!

मध्य रात्री बरोबर १२ वाजता वर्ष २०२० कालकुपीत बंदिस्त झाले आणि नवे वर्ष २०२१ उगवते झाले! मावळलेल्या वर्षात कोविड १९ ने जगभर कहर मांडला.  अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलियादि  सप्तखंडात कोरोनाने  सुमारे १७ लाख ७५ हजार लोकांचे  प्राण घेतले. व्यापार-उद्योगात प्रगत असलेल्या बहुतेक देशांची अवस्था कोरोनामुळे केविलवाणी झाली. हिंदू पंचागात वर्षाला नावे देण्याची जशी पध्दत आहे तशी रोमन कॅलेंडरमध्ये वर्षाला नावे देण्याची पध्दत नाही. तशी ती असती तर सरलेल्या २०२० वर्षाला कोरोना संवत्सरअसेच नाव दिले गेले असते! निदान लोकव्यवहारात तरी गत सालाचे नाव कोरोना वर्ष भावी काळात लिहल्या जाणा-या इतिहासाच्या पुस्तकात ओळखले जाईल.

अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, भारत इत्यादी देशांची अर्थव्यवस्था भुईसपाट झाली. आपल्या कर्तबगारीचा टेंभा मिरवणा-या लहानमोठ्या कंपन्या रसातळाला गेल्या. लोकांना जगवण्यासाठी अमेरिकेने ७०० डॉलरची मदत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यानंतर परवाच अमेरिकेच्या सदनाने ही मदत २००० डॉलर्स करण्याचा ठराव संमत केला. भारतातील मोठ्या शहरात नोकरीधंदा मिळवण्यासाठी आलेल्या हजारो मजुरांना धान्य आणि ५०० रुपये रोख देण्यात आली. परंतु ती घेण्यापेक्षा हजारो मजूर मिळेल त्या वाहनाने त्यांच्या मूळ गावी निघून गेले. मास्क आणि सुरक्षित अंतर ह्या दोन्हींचे पालन करणे मुंबई किंवा दिल्लीसारख्या शहरात राहून शक्य होणार नाही हे मजुरवर्गाच्या लक्षात आले. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात सरकारकडून कुचराई झाली असे नाही. आरोग्य यंत्रणा अक्षरशः दिवसरात्र राबली. शेवटी त्यांच्या राबण्यालाही मर्यादा होत्या हे समजून घेतले पाहिजे. कोरोना ऐन भरात असताना जगभरातल्या स्वार्थप्रेरित राजकारणात खंड पडला नाही. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम केंद्रीय आरोग्य खात्याने रोजच्या रोज चोख बजावले. गेल्या दोन शतकात आलेल्या साथीच्या रोगाने लोक जितके हैराण झाले होते तितकेच चालू शतकात ईलेल्या कोरोनाच्या साथीमुळे लोक  हैराण झालेले दिसले. अगदी अलीकडच्या काळात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या.  कोरोनाप्रतिबंधक लस टोचण्याचा कार्यक्रम अनेक देशात सुरू झाला. भारतातही तो एकदोन दिवसात सुरू होईल. हा कार्यक्रम सुरू होतो न होतो तोच ब्रिटनमध्ये कोरोनाची स्ट्रेनची दुसरी महाभयंकर लाट आली. नवा कोरोनाचा विषाणू वेगाने मेंदुपर्यंत पोहचल्याचे दिसून आले एवढेच निरीक्षण तूर्त तरी प्रसृत झाले आहे. मेंदुतील डीएनएत प्रवेश करण्यात हा विषाणू यशस्वी झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणवणा-या देशांची कोरोनाने पुरती घमेंड तर जिरवलीच शिवाय आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्नांचा पार चक्काचूर करून टाकला. भारतात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच चीनी घुसखोरीच्या बातम्या आल्या आणि लाखो लोकांची मने चिंतेने काजळून गेली. कोरोनाला सर्रास महामारीअसा शब्द वापरला गेला. हाच शब्द एकेकाळी कॉल-यालाही वापरला गेला होता. कोरोनाची साथ स्पॅनिश फ्ल्यू किंवा प्लेगसारखी प्राणघातक ठरली नसेल, परंतु ह्या साथीमुळे मानवजात हवालदिल झाली हे नाकारता येणार नाही. दुसरे म्हणजे कोरोना साथ संपली असे वाटत असले तरी ती संपण्याची चिन्हे मात्र मुळीच जाणवत नाही. ज्यांच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले त्यांच्या घरातल्या लोकांना आणि त्यांच्या निकटवर्तियांना अंत्यसंस्कारालाही हजर राहता आले नाही. विवाह-मौजीबंधन वगैरे कार्यक्रमही अनेकांना मर्यादित नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीत कसेबसे उरकावे लागले. हे सगळे माणसांचे भावजीवन उध्दवस्त करणारे ठरले. संस्कृती नावाची चीज किती तकलादू आहे ह्याचाही लोकांना अनुभव आला. एरवी गर्दीचे व्यसन जडलेल्या कलावंतांवर अक्षरशः पोटापाण्याची फिकीर करण्याची वेळ आली. गर्वोन्मत्त प्रसारमाध्यमांची, विशेषतः मुद्रणमाध्यमांची मान मोडली गेली.

सरलेले वर्ष ही प्रलय काळाची सुरूवात तर नव्हे अशी भीती सश्रध्द मनाला चाटून गेली असेल!  देशातील बहुसंख्य माणसे रामायण-महाभारत काळातपुराण काळात वावरत असतात. खरेतर, वर्षपालट ही नित्याची घटना. मुळात परिवर्तन हाच संसाराचा नियम! ह्या नियमाचा लोकांना विसर पडला.  ब्रह्म सत्य जग मिथ्या हे वचन संन्यासाच्याही पचनी पडलेले नाही. तेव्हा, सामान्य माणसांना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे? वास्तविक उपनिषदात विश्वउत्पत्तीबरोबर सृष्टीत प्रत्यही होणा-या बदलांचाही विचार केला आहे. आधुनिक विज्ञानानेही अंतराळाचा अभ्यास चालवला असून चंद्र-मंगळावरील वातावरणाचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.चांद्रमोहिमापासून ते मंगळावर यान पाठवण्यापर्यंतचे अनेक यशस्वी उपक्रम अंतराळ संशोधनाच्या मदतीने यशस्वीरीत्या राबवले गेले. अजूनही राबवले जात आहेत. भारतातील संशोधकांसह जगातील संशोधक  त्यात सहभागी झाले आहेत.
एकीकडे वैज्ञानिक प्रगती पाहता असमान ठेंगणे झालेले दिसते तर दुसरीकडे पृथ्वीवरील आकाश वायू आणि जल ह्या तिन्हीच्या पर्यावरणाती नासधूस  जोरात सुरू असलेली दिसते. हा प्रखर विरोधास लोकांच्या इतका अंगवळणी पडलेला आहे की त्याचे लोकांना काही वाटेनासे झाले आहे. देशभरातल्या नद्या प्रदूषित झाल्या. हिमाच्छादित पर्वतशिखरांवरील ग्लेसियर वितळत चालले असून हिमनद्या नाहिशा होताहेत. हे सगळे घडण्यात, घडवून आणण्यात जगभरातील सत्ताधा-यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला व्यापारी मिळालेली स्वार्थबुध्दीची जोड लपून राहिलेली नाही. तसेच ह्या सगळ्याला असलेली दुष्ट संघर्षाची गडद काळी किनारही सहज ध्यानात येण्यासारखी आहे. वादळाला नावे देण्याचे तज्ज्ञांना सुचले; पण पृथ्वीवर पोत असलेल्या ह्या विघातक बदलावर चिंतन करण्यास कुणाला फुरसद नाही !

वर्ष येते, वर्ष जाते! मात्र, मानवजात काळ गणनेच्या संकल्पनेपलीकडे जायला तयार नाही. उपनिषदात काळ हा दोन प्रकारचा मानला गेला आहे-  संवत्सरात्मकआणि यज्ञात्मक! हे टिळेधारी भक्त तर सोडाच घनपाठी वैदिक विद्वानांना माहित आहे की नाही कोण जाणे! माहित असते तर त्यांनी लामान्य जनांना सावध केले असते. यज्ञात्मक संवत्सर तर हरघडीला प्रतीत होते.  ज्या बिंदूपासून सूर्याभोवती पृथ्वीची वर्तुळाकार प्रदक्षणा सुरू होते त्या बिंदूवर पृथ्वी जेव्हा पुन्हा येते तेव्हा कालगणनावाचक संवत्सरबदलते. ह्या संवत्सरात्मकबदलापेक्षाही यज्ञात्मकबदल मह्त्त्वाचा असतो. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे बदलणारे ऋतू जगभरातल्या लाखो लोकांना स्पष्टपणे जाणवतात. अखंड आणि नियमित सुरू असेलेली क्रिया म्हणजेच यज्ञ! उपनिषदकारांनी ह्यालाच यज्ञात्मक बदल मानले आहे.

चिंतेची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून यज्ञात्मक संवत्सरातली नियमितता  काहीशी बदलत चालली आहे. एखाद्या वर्षी भरमसाठ पर्जन्यवृष्टी तर पुढच्या वर्षी कोरडा ठणठणीत, पाऊस नसलेला पावसाळा असा अनुभव येऊ लागला आहे.  पण हा अनुभव का येतो ह्याचा खोलात जाऊन अभ्यास करणारी मंडळी विरळच!  वास्तविक आज पृथ्वीला प्राप्त झालेले स्वरूप लाखो वर्षापासून सुरू असलेल्या ऋतू पालटाचा परिणाम आहे. काळ अनादि अनंत आहे. आधुनिक विज्ञानानेही ते अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. अन्यथा  The passage of time is merely feature of our consciousness and has no objective physical significance. Thus past, present  and  future has no value of mere than illusion.  असे उद्गार सुप्रसिध्द शास्त्रज्ञ आईनस्टाईनने काढलेच नसते! हेच सत्य अडीच हजार वर्षांपूर्वी  भगवान महावीरही सांगून गेले.  महावीर म्हणतात, काळ बदलला असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. काळ होता तसाच आहे. बललायला तो  भरीव पदार्थ नाही, आपल्याला जेव्हा बाह्या बदल जाणवतात तेव्हा आपण म्हणतो, काळ बदलला! असो.
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर तथाकथित पुरोगामी आणि तथाकथित प्रतिगामी ह्यांच्यात वादावादी मात्र गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे. पृथ्वीवर सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षाशी ह्या मंडळींना देणेघेणे नाही. ना वेदउपनिषदांचे अथवा पुराणांचे संशोधन ना आधुनिक वैज्ञानिक संशोधनाची आस बाळगण्याची त्यांना इच्छा! गेल्या एकदोन शतकांच्या इतिहासात डुंबण्याची दांडगी हौस दोन्हींना सारखीच आहे. नारळीकर, गोवारीकर ह्यांच्यासारखे काही सन्माननीय  अपवाद! एकमेकांना शत्रू मानूनच आयुष्याचा काळ व्यतित करण्यात  पुरोगामी आणि प्रतिगामी मंडळी मग्न आहेत. वर्ष बदलले तरी त्यांच्यात बदल होण्याची सूतराम शक्यता नाही. वैचारिक चळवळीचे नेतृत्व करणा-या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना नववर्षानिमित्त शुभेच्छा!
२०२१ हे नवे वर्ष सगळ्यांना सुखसमृध्दीचे जावो !
रमेश झवर

ज्येष्ट पत्रकार

No comments: