Friday, February 19, 2021

थक्क करणारी दरवाढ !

आभासी चलनात होणा-या व्यवहारात तेजीचे वारे वाहात आहेत.  कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था गळाठल्या तरी समान्तर अर्थव्यस्थेचा प्रवास मात्र मजबुतीच्या दिशेने सुरू आहे. १० वर्षांपूर्वी आभासी चलन व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हा बिटकॉइन नामक चलन सुरू झाले. २७ फेब्रवारी २०११ रोजी त्याचा दर अवघा १ डॉलर होता. काल बुधवार दि. १७ फेब्रुवारी रोजी त्याचा दर  ५१ हजार ४३१ डॉलर्सवर गेला. २०१४ सालच्या डिसेंबर महिन्यात तो ६३० डॉलर्स होता. बिटकॉइनचा हा चढता दर थक्क करणारा आहे!  बिटकॉइनचा दर जगाच्या कोणत्याही देशाच्या चलनास मागे टाकणारा आहे ! सुदैवाने बिटकॉइन काय किंवा अन्य कोणत्याही आभासी चलनास अनेक देशात बंदी आहे. भारतातही बंदी आहेच. णि ती योग्यही आहे. परकी चलन व्यवहारावर केवळ भारतातच निर्बंध आहेत असे नव्हे, तर जगातील बहुतेक देशात परकी चलन व्यवहारांवर निर्बंध आहेत. निर्बंध मोडणारा कोणी आढळलाच तर त्याची सीबीआय कोठडीत रवानगी निश्चित झालीच म्हणून समजा!

जगभऱात संगणक व्यवहार आणि इंटरनेट स्थिरस्थावर होताच इंटरनेट आणि ब्लॉक चेन तज्ज्ञ कामाला लागले. त्यांनी पाहता पाहता डार्क किंवा डीप इंटरनेट विकसित केला. इंटरनेटच्या विकासमुळे शिक्षण, करमणूक, हिशेब आणि लेखासेवा, माहिती अदानप्रदान इत्यादि सेवा सुरू झाल्या. त्यामुळे अनेक प्रकारे जग झपाट्याने बदलत गेले. अजूनही बदल सुरूच आहेत. गतिमान संवाद माध्यमाचा वेग इतका अफाट आहे की त्यामुळे भल्याभल्यांची त्रेधातिरपिट उडाली. ह्या त्रेधातिरपिटीतून जग अजूनही सावरलेले नाही. अशा ह्या गतीमान सेवेचा सरकारनेच उपयोग सुरू केला म्हटल्यावर इमाने इतबारे कर भरणा-या करोडे लोकांनाही ह्या सेवेचा उपयोग करणे भाग पडले. बदलत्या परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मागे कसे राहतील? संख्येने ते जरी अल्पसंख्य असले तरी सवस्थ्य बसणे त्यांना शक्यच नाही.  फेरा फेमासदृश  कायद्यांच्या कचाट्यात न सापडता करोडोंची उलाढाल करणे ही तर ड्रग व्यावसायिकांची रोजची गरज. ते स्वस्थ बसणे त्यांच्या शब्दकोशात नाही.  संगणक, अकाऊंटस्, इंटरनेट ह्या तंत्रातल्या जाणकरांच्या मदतीने त्यांनी आभासी व्यवहाराची कल्पना अमलात आणली. विशिष्ट आयडी आणि पासवर्ड एकदा टाकला की क्रिप्टो करन्सी खात्याचे पान तुमच्या संगणकावर समोर येते आणि खातेधारकाला इच्छित व्यवहार करता येतात. हा झाला व्यवहाराचा पूर्वार्ध! व्यवहाराचा उत्तरार्ध मात्र त्या त्या देशाच्या करन्सीत नेहमीच्या बँकिंग चॅनेलमधून उरकला जातो. अर्थात त्यात अमेरिकन डॉलर्सला त्यात प्राधान्य असते हे उघड गुपित आहे. उत्तरार्ध व्यवहार काही अंशी करयंत्रणेच्या लक्षात आले तरी पूर्वार्ध मात्र सहसा लक्षात येत नाही. त्याचा फायदा असा की व्यवहार करणा-याला तुरुंगवासाचा धोका नाही. त्यामुळे यशाचाही तुरूंग त्यांना नाही.

आभासी चलनात व्यवहारा करणा-यांना पेट्रोल शंभर रुपयांच्या घरात गेले काय, किंवा बीएमडब्ल्यूचे दर वाढले काय, कशा कशाचाही फरक पडत नाही. पेट्रोल किंवा भाजी शंभर रुपयांच्या घरात गेली काय! गेली तर गेली! सामान्य माणसांप्रमाणे त्यांना कुणाच्या तरी नावाने ओरडत राहण्यात जसे स्वारस्य असते तसे स्वारस्य आभासी चलनात खेळणा-यांना नाही. त्यांच्या जगात १ नंबर २ नंबर ही भाषादेखील अस्तितवात नाही. व्यवहार हा व्यवहार असतो. तो इमानदारीने केला की देवाधर्मावर खर्च करण्यास ते मोकळे होतात. चर्चाला देणगी दे,  सामाजिक कार्यला देणगी दे असे काही न काही सुरू असते. अभ्यागताला विन्मुख पाठवायचे नाही हाच त्यांचा नियम. आपला आकडा इतर कोणापेक्षाही मोठा पडला पाहिजे एवढीच त्यांना काळजी. अधिकृत चलनातून अधिकृत व्यवहार करणा-यांच्या मनावर मात्र काळजीचे ओझे असते. सरकारनामक संस्थेने आणि बँकिंग व्यवस्थेमार्फत लागू करण्यत आलेल्या अनेक प्रकारच्या निर्बंधाचे पालन त्याच्याकडून झाले नाहीतर  मात्र बेमौत मरण्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे नाही. काही वर्षापूर्वी रतन खत्रीच्या मटक्याचे सर्वसमान्य गरीब माणसास खूप आकर्षण होते. आकर्षण अशासाठी की. लावलेल्या आकडा बरोबर निघाला आणि चिटोरे बुकीला दाखवले की त्याला लगेच हातात पैसे मिळणारच. इथे सही करा, त्या खिडकीसमोर रांग लावा अशा प्रकारची सरकारी ऑफिसातली भानगड रतन खत्रीच्या बुकीकडे नव्हती.  सरकारला कर वसूल करण्याचा अधिकारच नाही अशी स्वातंत्र्यवादी भूमिका ही मंडळी हमखास घेत आली आहे. तशी ती घेण्यासाठी त्यांना एक ओळही खरडावी लागत नाही. त्यांना हवे ते आणि हवे तसे लिहून देणा-या लोकशाहीतील चौथ्या स्तंभाची यंत्रणा आहेच. त्यानंतर पुढे कोर्टात दाद मागण्याची यंत्रणाही आहे. देशातली यंत्रणा लोकशाहीची असो की मर्यादित हुकूमशाहीची, मुक्त व्यवहार करणा-यांना त्या सहसा त्रास देत नाही. आपल्याकडे आभासी जगात आतापावेतो उद्घाटन सोहळे, बैठकी वगैरे सुरू झाल्या आहेत. आभासी चलनाच्या दुनियेत मात्र भारताचा प्रवेश झालेला नाही. तसा तो झाला असता तर बँकिंग यंत्रणा,  खुद्द पंतप्रधानांच्या अखत्यारीतली सीबीआय, रॉ  किंवा तत्सम यंत्रणा कधीच कामाला लागल्या असत्या! एव्हाना तिहार जेलमध्ये १-२ जणांना बंद करून ठेवावेही लागले असते. अजून तरी तसे घडल्याचे चित्र दिसले नाही. हा केवढा दिलासा!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: