Tuesday, February 23, 2021

खरं आणि खोटं !

निवडणुकीच्या रणधुमाळीत  प्रचार- सभा म्हणजे ख-या खोट्याची राळ उडवून देणा-या असता! राळ उडवून देण्याच्या ह्या  प्रकारात  उपवक्ते म्हणून गाजलेल्या नेते अहंअहमिकेने पुढे सरसावतात. मुख्य वक्त्याचे सभास्थानी आगमन होताच ह्या उपवक्त्यांच्या हातातला माईक बेमुर्वतखोरपणे हिसकावून घेतला जातो! आणि मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांच्या आगमनाची घोषणा केली जाते. काही मिनीटातच चिडीचूप शांतता पसरते आणि मोठ्या नेत्याचे भाषण सुरू होते. श्रोतेही सावध होतात. मुद्देसूद प्रतिपादन, तर्कशुध्द युक्तिवाद ह्या भाषणआत असतो. ह्या भाषणात आरोप प्रत्यारोप असले तरी ते अतिशय जबाबादारीपूर्वक केले जातात. पश्चिम बंगालच्या निवडणूक सभा मात्र ह्याला  अपवाद ठरल्या आहेत. भाजपाला पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. वक्त्त्यांनाही आपण सत्तेवर येऊ असे वाटू लागले आहे.

अशाच एका सभेचा वृत्तांत वाचण्यासारखा आहे. त्या वृत्त्तांतानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी प्रचारसभातून केलेल्या आरोपांना तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने पत्रक काढून चोख उत्तर दिले. मोदींनी केलेले सारे आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रिएन ह्यांनी खरी आकडेवारी देऊन खोडून काढले. ते खोडून काढताना डेरेक ह्यांनी पंतप्रधानांच्या टेलेप्रॉम्टर भाषणाला बॅग ऑफ लाईज असे विशेषण लावले. शिवाय पंतप्रधानांनी भाषणात फेकलेली आकडेवारी साफ खोटी असल्याचे ठामपणे सांगणारे निवेदन प्रसिध्द केले. पाईपद्वारे स्वच्छ पाणी देण्यासाठी केंद्राने पश्चिम बंगालला १७ हजार कोटी रुपये पाठवले. ही रक्कम पश्चिम बंगाल सरकारने मुळीच वापरली नाही. ह्या मुद्द्याचा समाचार घेताना डेरेक ह्यांनी म्हटले आहे, पाईपद्वारे पाणी पुरवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने जलस्वप्न योजनेखाली ५८ हजार कोटी रुपये खर्च केले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेखाली केंद्राने पाठवलेली रक्कम  शेतक-यापर्यंत पोहोचलीच नाही, असा आरोप मोदींनी केला. त्यावर उत्तर देताना डेरेक ह्यनी म्हटले आहे, पश्चिम बंगाल सरकारने अडीच लाख शेतक-यापर्यत ही रक्कम पोहचवली, इतकेच नव्हे , तर केंद्राला सारा तपशील पाठवला. त्याची साधी पोच देण्याची तसदी संबंधित केंद्रीय खात्याने घेतली नाही.

डमडम विमानतळापासून ते दक्षिणेश्वरपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मोदींचे सरकार आले. मात्र, ह्या मेट्रो प्रकल्पाला मोदी सरकारच्या काळात  पुरेसा निधी मिळाला नाही. माँ दूर्गाची बंगाली लोकांना साधी पूजा करता येऊ नये अशी ममता बॅनर्जींच्या राज्यात अवस्था आहे. मोदींचे हेही म्हणणे डेरेक ह्यांनी खोडून काढले. डेरेक ह्यांनी म्हटले आहे, पूजा समित्यांना ममता सरकारने भरघोस साह्य दिले !

पश्चिम बंगालच्या गैरकारभारावर  मोदींनी टीकेची झोड उठवली होती. ह्या संदर्भात डेरेकनी पुन्हा  सविस्तर आकडेवारी दिली आहे. गेल्या १० वर्षात पश्चिम बंगालचा जीडीपी ४.५ लाखांवरून ६.९ लाखांवर गेला.  ही वाढ ५३ टक्के आहे. बंगाली माणसाच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ झाल्याचे डेरेक ह्यांचे म्हणणे आहे. बंगालची माणसे स्थलान्तर करू लागल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना डेरेक म्हणतात, पश्चिम बंगालमधील माणसाचे उत्पन्न २०१० साली ५१ हजार होते. ते २०१९ साली १ लाख ९ हजार ४९१ रूपयांवर गेले, पश्चिम बंगालमध्ये ८९ लाख व्यापारी आहेत. त्यांच्याकडे १-३ लाख कोटी लोक काम करतात. त्यांचे उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढले! शिवाय कारखान्यात काम करणा-यांच्या उत्पन्नात ७७ टक्के वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे आणि तागाचे उत्पन्न घटले आहे असा मुद्दा मोदींनी त्यांच्या भाषणात मांडला. त्यावर उत्तर देताना डेरेक म्हणतात, २०१९ साली पश्चिम बंगालमध्ये  सात कोटी बारदानाच्या पिशव्या तयार झाल्या. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने ज्यूट बोर्डच बरखास्त करून टाकले. आजही  ३० लाख टन बटाटे निर्यात करण्याची पश्चिम बंगालची क्षमता आहे. पण केंद्राने सरकारने बटाटा जीवनाश्यक मालाच्या यादीतून काढून टाकले आणि पश्चिम बंगालकडून बटाटा हल्ली बाहेर जात नाही अशी हाकाटी केंद्राने सुरू केली!

आता मोदी खोटे बोलताहेत की डेरेक हे कोण ठरवणार? निवडणूक प्रचार सभेतील भाषणाचं खरंखोटं तुम्हीच ठरवा!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: