Monday, August 30, 2021

राजकारणी कृष्ण

महाराष्ट्राला कृष्णाइतका रामही प्रिय आहे. वनवास काळात नाशिक परिसरात रामाचे वास्तव्य झाले. राम एकवचनी, पित्याची आज्ञा विनातक्रार पाळणारा. धनुर्धर , दुष्टांचे निदार्ळण करणारा आदर्श पुरूष म्हणून विख्यात आहे. कृष्णाची प्रतिमा रामाच्या प्रतिमपेक्षा भिन्न आहे. कृष्ण हा मल्लायुध्दापासून कोणत्याही प्रकारचे शस्त्र लीलया हाताळू शकणारा युध्दकुशल तर होताच; त्याहीपेक्षा धुरंधर राजकारणीही होता. युध्दाचे आणि राजकारणाचे पारडे फिरवण्यात तो वस्ताद आहे. तीव्र बुध्दिमत्ता लाभलेला तत्त्ववेत्ता तर तो होताच, शिवाय त्याच्याकडे संभाषण चातुर्यही होते. राम आणि कृष्ण ह्या दोघांनाही देवत्त्व बहाल करण्यात आल्यामुळे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांकडे दुर्लक्ष झाले. उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती ह्या काव्यात्म भाषेच्या दृष्टीने कृष्णाचे आणि रामाचे चित्र कवींनी रंगवल्यामुळे दोघांच्या मानुषी रूपाकडे दुर्लक्ष झाले. अर्थात दोघेही नायक खरोखरच होऊन गेले की केवळ प्रतिभावंतांनी सृजन केलेल्या व्यक्तिरेखा आहेत हा वादाचा मुद्दा शिल्लक राहतोच. ज्ञानकोशकार केतकर ह्यांच्या मते वंशचा पहिला दैवी पुरूष वगळता बाकी अन्य संपूर्ण वंशाचे राजपुरूष प्रत्यक्षात होऊन गेले ! दुसरे म्हणजे राम आणि कृष्ण ह्या व्यक्तिरेखा काल्पनिक असोत वा खरोखर होऊन गेलेल्या असोत, मूळ प्रतिप्रादनात फरक पडण्याचे कारण नाही.

राम आणि कृष्ण ह्या दोघांत परस्परांचा वांशिक संबंध होता का? उपलब्ध संशोधनाच्या आधारे ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ते होकारात्मक द्यावे लागेल. सूर्यवंशीय ईक्ष्वाकु कुळातला वंशज श्रीराम सिंहासनारूढ झाल्यानंतर त्याने अयोध्येच्या राज्याची, खरे तर साम्राज्याची, व्यवस्था लावण्याचे काम हाती घेतले. बंधू शत्रूघ्नला रामाने सध्याच्या पूर्व उत्तरप्रदेशातला शूसेन, मधुरादि राज्याचा अधिपती केले. ह्याच शत्रूघ्नच्या वंशातील कन्येचा विवाह चंद्रवंशी यादव कुळाच्या राजाशी लावण्यात आला होता. त्यामुळे आर्यावर्तातील ह्या दोन्ही राजवंशात परस्पर नातेसंबंध निर्माण झाले. वसुदेवपुत्र श्रीकृष्ण हा यादवांच्या पोटशाखेतील वृष्णी कुलोत्पन्न ! आर्ष काळाबद्दल ब्रिटिश आणि जर्मन संशोधकांनी अठराव्या शतकात विपुल संशोधन केले. ह्या संशोधनात निरनिराळ्या प्रांतातील विद्वान संशोधकदेखील हिरीरीने सहभागी झाले. पाश्चात्य विद्वानांनी केलेल्या संशोधनाची भारतीय संशोधकांनी चिकीत्सा केली. अनेकांनी पाश्चात्यांच्या संशोधनाला दुजोरा दिला तर काहींनी त्याबद्दल साधार मतभेद व्यक्त केली.  ह्या सर्वांचे संशोधन इतके अफाट आहे की त्या संशोधनाचा सारांश देणे ह्या छोट्याशा लेखात शक्य नाही. म्हणून राजकारणी कृष्ण ह्या शीर्षकापुरताच हा लेख मर्यादित ठेवला आहे. ह्या छोट्याशा लेखात कृष्णाच्या राजकारणाचा समग्र वेधही घेता येणे शक्य नाही. फक्त महाभारतातील दोनतीन ठळक प्रसंगांची निवड करून मी वेध घेण्याचा प्रयत्न केलाआहे.

ज्येष्ठ राजपुत्र ह्या नात्याने कौरव राज्याचे राजेपद खरे तर धृतराष्ट्राला मिळालायला हवे होते. परंतु तो जन्मांध असल्याने त्याला सिंहासनावर बसण्याचा अधिकार गमवावा लागला. तो अंगविहीन मानला गेल्याने तत्कालीन संकेतानुसार ( Unwritten Constitution ) वडील पुत्र असूनही धृतराष्ट्राला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नव्हता. सिंहासन पांडुकडे चालून आले. दुर्दैवाने त्याचा अकाली मृत्यू घाला. पांडवाच्या दुर्दैवाने कौरव राज्याचा हंगामी राजा धृतराष्ट्र राजसिंहासनाला चिकटून बसला. साहजिकच दुर्योधनादि शंभर थृतराष्ट्रपुत्रांनी पांडवांना राज्याबाहेर हुसकावून लावण्याचा जोगदार प्रयत्न केला. त्यातून सुखरूप बचावून पांडवांनी पुन्हा हस्तिनापुराचे राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला. ते हस्तिपुरास परत आले. त्यावेळी य़ुधिष्टारादि  पाचही पांडवांना इंद्रप्रस्थादि गावे देऊन त्यांचे वेगळे राज्य स्थापन करण्यास सांगून हस्तिनापूरच्या राज्यापासून त्यांना लांब ठेवण्यात कौरवांना यश मिळाले.

पांडवांचा कौरवांना वाटणारा दुस्वास तेवढ्यावर थांबला नाही. पांडवांना द्यूत हस्तिनापापूरला येण्याचे आमंत्रण दिले. हा निरोप देण्यासाठी विदूराला मुद्दाम इंद्रप्रस्थला पाठवण्यात आले होते. कौरव दरबारात द्यूत खेळण्याचा कार्यक्रमही होईल असे मोघमपणे पांडवांना सांगण्यात आले. खरे तर, द्यूत खेळण्याच्या उद्देशानेच पांडवांना कौरव दरबारात बोलावण्यात आले होते. द्यूत खेळण्याचा घाट शकुनीच्या सांगण्यावरून दुर्यधनानेच घातला होता. जेव्हा द्युताचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा  धृतराष्ट्र मुद्दाम उशिरा दरबारात हजर झाला. ठरल्याप्रमाणे शकुनीने फासे टाकायला सुरूवात केली आणि तो जिंकतच गेला. युधिष्ठराने राज्यासह सगळी संपत्ती पणाला लावली. त्याही वेळी तो हरला ! शेवटी शकुनीने युधिष्ठराला सुचवले,

पणस्व कृष्णां पांचाली तयात्मनां पुनर्जय

  युधिष्ठारालाही द्ययुताची धुंदी चढलेली होतीच. द्रौपदीला पणाला लावताना तो महणाला,

 नैव ह्रस्वा न महती नातिकृष्णा न रोहिणी। सरागरक्तनेत्रा च तया दीव्याम्याहं त्वया ।।

हाही डाव युधिष्ठर हरला. साहजिकच द्रौपदी आता कौरवांची दासी झाल्याने तिला दरबारात आणण्यासाठी दुर्योधनाने सूतपुत्र प्रतिकामीला पाठवले. द्रौपदीने त्याला सरळ प्रश्न विचारला, जो राजा स्वतः भांवडासह कौरवांचा दास झालेला आहे त्याला मला पणास लावण्याचा अधिकार काय? प्रतिकामी दरबारात परत गेला. द्रौपदीला दरबारात आणण्याचे काम सोपे नाही हे लक्षात आल्यावर द्रौपदीला आणण्यासाठी दुर्योधनाने दुःशासनाला पाठवले. दौप्रदी रजस्वला होती. दुःशासनाने तिचे काही एक न ऐकता तिला खेचून दरबारात आणले. हा सगळा प्रकार घडत असताना भीष्म, द्रोण खाली माना घालून बसले होते. द्रौपदीच्या तर्कशुध्द प्रश्नाचे उत्तर देण्याचे घाडस कुणीही दाखवले नाही. सगळा दरबार दिङ्मूढ झाला. शेवटी त्या प्रसंगातून द्रौपदीची कशी सुटका झाली वगैरे कथाभाग सर्वांना माहित आहे. द्यूत सुरू असताना भीम स्वस्थ बसला नाही. युधिष्ठराचे मी हात जाळून टाकीव असे जळजळीत उद्गार त्याने काढले. तो सगळ्यांवरच संतापला होता. परंतु त्याने गदा उचलली असती तर त्याचा नक्कीच पराभव झाला असता.

हा सारा प्रकार ज्यावेळी कृष्णाला समजला तेव्हा त्याने असे उद्गार काढले की मी दरबारात असतो तर हे द्यूत होऊच दिले नसते. त्या वेळी भारतवर्षात जे द्युताचे ४-५ जाणकार होते त्यापैकी श्रीकृष्ण हा एक होता! कौरव दरबारात खेळले गेलेले द्यूत सरळ सरळ द्यूतविषयक नियमांचा भंग करणारे होते. ज्याच्याबरोबर द्यूत खेळायचे ते त्याच्या दरबारात जाऊन खेळायचे हा द्युताचा पहिला नियम. दुसरा नियम असा की दुर्योधनाच्या वतीने इतर कुणालाही द्यूत खेळण्याचा अधिकार नव्हता. तरीही दुर्योधनाच्या वतीने शकुनीच फासे टाकत होता. समजा, शकुनी डाव हरला असता तर दुर्योधनाने जिकलेली धनसंपत्ती  पांडवांना परत दिली असती का? ह्यावरन तेथल्या तेथे युध्दप्रसंग उभा झाला असता.

पांडावांना त्यांची संपत्ती  परत करून इंद्रप्रस्थास जाऊ देण्याचा आदेश शेवटी धृतराष्ट्राने दिला खरा, परंतु दुर्योधनाचा आग्रहावरून पुन्हा एकदा एक डाव खेळण्याची संधी  युधिष्ठराला देण्याची तयारी धृतराष्ट्राने पांडवांना दिली. पांडव पुन्हा माघारी परत आले. पांडवांनी डाव जिंकल्यास त्यांना त्यांचे राज्य परत केले जाईल आणि ते हरल्यास त्यांना १४ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल असे ठरले. हाही अखएरचा डाव पांडव हरले. राज्य परत मिळवण्याची पांडवांची उरली सुरली संधी हिरावून घेण्यात आली. महाभारत युध्दाचे हेच एकमेव कारण ठरले.

वनवास आणि अज्ञातवास संपल्यावर युध्दाची तयारी करण्यापूर्वी राजनैतिक मुत्सद्देगिरीचा एक भाग म्हणून कौरव दरबारात शिष्टाई करण्यास श्रीकृष्ण तयार झाला. अर्थात शिष्टाईचा प्रयत्न करण्याची गरज काय, असा सवाल द्रौपदीने उपस्थित केला. शिवाय भीमाच्या प्रतिज्ञेचे काय, असाही प्रश्न द्रौपदीला पडला होता. दुःशासनाच्या रक्ताने माखलेल्या हातांनी द्रौपदीची वेणी घालण्याची भीमाची प्रतिज्ञा होती.जर कृष्णाची शिष्टाई यशस्वी झाली तर युध्द होणार नाही असे द्रौपदीला वाटत होते. शेवटी कृष्णाने तिला समाजावून सांगितले, कोणत्याही परिस्थितीत युध्द हे होणारच. तू काळजी करू नको !’

कृष्ण स्वतःच्या रथाव आरूढ होऊन हस्तिनापुरला निघाला. श्रीकृष्ण हा प्रभावशाली वक्ता होता. युक्तिवादपटुत्व हजरजबाबीपणा, आणि अमोघ भाषण आणि चेह-यावर आत्मविश्वासाचे तेज हे त्याचे वैशिष्ट्य होते. ठरल्यानुसार त्याने सभा जिंकली. जा जा असे इंद्राजाल करणारे मी खूप पाहिले आहेत. तुझ्या इंद्रजालाला मी भुलणारा नाहीअसे उद्गार दुर्योधनाने काढले. इतकचे नव्हे तर, श्रीकृष्णाला कैद करण्याचा घाट त्याने घातला. कृष्णाला दुर्योधनाच्या अंतस्थ हेतूची कुणकुण लागलेली होतीच. तो भाषणात म्हणाला, मला कैदेत टाकून तर पाहाच ! कोण कुणाला कैदेत टाकतो हे मी पाहतो. तू मला कैदेत टाकण्यापूर्वी तुझ्याशी युध्द करून मीच तुला कैदेत टाकेन!

कृष्णाच्या भाषणामुळे कौरव सभा भयचकित झाली. सुदर्शन चक्र फेकून त्याने शिशुपालाचे मस्तक उडवले हे सगळ्यांना माहित होते. त्यामुळे श्रीकृष्णाच्या वाटेला जाणे धोक्याचे ठरेल  हे धृतराष्टादिकांच्या लक्षात आले. हस्तिनापूरला त्याने विदुराचा पाहुणचार घेतला. कुंतीची आणि कर्णाची भेट घेतली. कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगून त्याला ज्येष्ट भ्राता म्हणून पाचही पांडव तुझ्या वडिलकीचा मान राखतील वगैरे वगैरे सांगून त्याला पांडव पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याचा काही उपयोग होणार नाही ह्याची त्याला कल्पना होती. मात्र, त्यातून एक साध्य झाले. अर्जुनाखेरीज मी कुणाला ठार मारणार नाही, असे आश्वासन त्याने कुंतीला दिले.

द्युताखेरीज १८ दिवसांच्या युध्दात आणखी असे काही प्रसंग आले की ज्यात कृष्णाच्या चातुर्याचा कस लागला. युध्दाच्या सुरूवातीलाच अर्जुनाला गीता सांगून त्याने अर्जुनाचा विषाद नाहीसा केला आणि त्याला युध्दाला प्रवृत्त केले.  ५ हजार वर्षे उलटली तरी गीता ह्या सातशे श्लोकांच्या लहानशा ग्रंथाची लोकप्रियता आजही कायम आहे. मनुष्यमात्राला परमेश्वराने माणसाला बहाल केलेली ही एक घटनाच आहे असे म्हटले तरी चालेल!

युद्धात कर्णाला मारण्यात अर्जुनाला यश मिळत नव्हते. एकदा युध्दावरून संध्याकाळी शिबीरात  परत आल्यानंतर युधिष्ठर त्याला म्हणाला, तुझे गांडीव धनुष्य काय कामाचे!

झाले! गांडीव धनुष्याच्या संदर्भात कोणी निंदा केली तर त्याचे डोकेच उडवण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा होती. तो युधिष्ठरावर धावून गेला. तेवढ्यात कृष्ण मध्ये पडला. तुझी प्रतिज्ञा ठीक आहे. पण तू काय करतोयेस् हे तरी तुला का कळतं का?’

मग मी काय करावे  असे तुझे म्हणणे आहे,असा सवाल करताच कृष्ण अर्जुनाला म्हणाला, एखाद्याची निंदा केली तरी ती त्याला ठार मारण्यसारखेच आहे. तू युधिष्ठराची निंदा कर बरं.

त्याप्रमाणे अर्जुनाने युधिष्ठराची निंदा केली. परंतु कुणाचीही निंदा केली तर स्वतःचे शिर उडवून घेण्याची त्याने दुसरी प्रतित्रा केलेली होती. खड्ग हातात घेऊन तो स्वतःचे शिर उडवणार एवढ्यात ते कृष्णाच्या लक्षात आले. कृष्ण त्याला म्हणाला, केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप कर. पश्चाताप करणे म्हणजे स्वतःचे शिर उडवण्यासारखेच आहे. तू पश्चाप केला की तुझे शिर उडवल्यासारखे ठरेल!

चातुर्य आणि वक्तृत्व ह्या जोरावर कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य कृष्णाकडे होते हे ह्या दोन प्रसंगातून दिसून आले. युध्द संपल्यावर गांधारीची त्याने भेट घेतली असता. कौरव कुळाचा विनाश घडवून आणल्याबद्दल तिने कृष्णाला शाप दिला, माझे कुळ तू नष्ट केलेस. तुझेही कुळ असेच नष्ट होईल. त्या शापाबद्दल कृष्णाला मुळीच राग आला नाही.

माझ्या मनात माझे कुळ नष्ट करण्याचा विचार होताच. चला बरे झाले, तुझ्या शापामुळे माझे काम सोपे झाले, असे उद्गार त्याच्या तोंडून निघाले. पांडवाच्या भेटीपूर्वी युध्दातून केव्हा माघार घ्यायची आणि केव्हा कुठली खेळी करायची ह्याचा त्याला उदंड अनुभव होता. म्हणूनच त्याच्या काळात कृष्ण यशस्वी राजकारणी ठरला!

रमेश झवर

No comments: