Sunday, March 22, 2020

जंतूयुध्द

विश्वात १६७०००० प्रकारचे जंतू आहेत. त्यापैकी ६३१ ते ८२७ हजार जंतू माणसावर हल्ला करू शकतात. २००३ साली सार्स, २००५ साली बर्ड फ्लू, २००९ साली स्वाईन फ्लू, २०१२ साली एमइआरएस, २०१४ साली एबोला आणि गेल्या वर्षी-- २०१९ साली—सार्स एन कोरोना उर्फ कोरोना आयडी-१९ ह्या विषाणूचा हल्ला झाला! 2003 ते २०१४ ह्या १८ वर्षांच्या काळात झालेला विषाणूंचे हल्ला मर्यादित होता. कोरोना विषाणूचा हल्ला मात्र इतका मोठा आहे की हा हल्ला एखआद्या महायुध्दात शत्रूवर होण्या-या हल्ल्यापेक्षा मोठा आहे. दीडशेहून अधिक देशातली माणसे ह्या हल्ल्यात सापडली आहेत. एवढी मोठ्या प्रमाणावर हल्ला गेल्या शतकात झालेल्या दोन्ही महायुध्दातही झाला नव्हता! दोन्ही महायुध्दे १५-२० देशांपुरतीच सीमित होती. दुसरे म्हणजे ती महायुध्दे लष्करांकडून लढली गेली. कोरोना युध्द एकाच वेळी अनेक देशात लढले जात असून ते सैनिकांऐवजी हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉईज आणि लॅबमधले असंख्य विश्लेषक लढत आहेत.
भारतात २०० जणांना कोरोनाची लागण झाली असून आपले हजारो डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनाविरूध्द सुरू झालेल्या युध्दात केंद्र आणि राज्य सरकारांकडून यथाशक्ती मदत केली जात आहे. अजूनही कोरोनाचे उच्चाटन झालेले नाही. कोरोनाने जनजीवन तर विस्कळीत करून टाकलेच; शिवाय टेंभा मिरवणा-या अर्थव्यवस्थेचा गुमान जिरवला. मजूर आणि कर्मचारीवर्गाला कसस्पटासमान लेखण्याची प्रवृत्तीही बळावत चालली होती. काळ तर मोठा कठीण आला आहे! ही परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली क्षमता आपल्या राज्यकर्त्यांत काही अपवाद वगळता निश्चित दिसून आली. अर्थात ही क्षमता पुरेशी नाही. म्हणूनच कोरोना युध्दात मिळालेल्या यशाने आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही.
जगाची लोकसंख्या एक अब्ज व्हायला तीन लक्ष वर्षे लागली. गेल्या शंभर वर्षांत ती ६ अब्जांनी वाढली. तुलनेने पाहिले तर पूर्वी माणसाची भूक भागवण्यासाठी चीनमध्ये १ अब्ज कोंबड्या कापाव्या लागत होत्या. १९६० नंतरच्या काळात माणसाची भूक भागवण्यासाठी चीनमध्ये २०अब्ज कोंबड्या कापाव्या लागतात! सांगण्याचा हेतू इतकाच की पशुपक्ष्यांचा संपर्क कमी झाल्याखेरीज व्हायरसचा प्रसार थआंगणे अवघड आहे. डीएनए १८ वा भाग हा व्हायरसमय आहे. जेव्हा व्हायरसची लागण होते तेव्हा तो डीएनएमधल्या असलेल्या कुठल्यातरी व्हायरसची हकालपट्टी करतो आणि स्वतःला अंशतः का होईना सुस्थापित करतो. ही व्हायरस सुस्थापित तर होतोच. तो इमानेइतबारे पुढच्या पिढीत संक्रमित होतो. आणि तसा तो होताना हळुहळू त्याचे इम्युनायजेशनही होत जाते. हा एक वेगळा विषय आहे. शास्त्रज्ञांच्या मते जंतूतले प्रोटिन हे त्याचे गंडस्थळ. ते फोण्यात डॉक्टर्सना यश मिळाले की जंतूविरूध्दधे युध्द मानवाने जिंकल्यासारखेच आहे. मी कोणी शास्त्रज्ञ नाही. हा ब्लॉग-लेख लिहताना माझ्या मर्यादांचे मला भान आहे. माझ्या लेखातली माहितीतल्या तज्ज्ञांनी उणीवा दाखवून दिल्या किंवा पुष्टी दिली तर मला आनंद वाटेल!
रमेश झवर  
ज्येष्ठ पत्रकार

No comments: