Friday, April 23, 2021

आनंदयात्री पत्रकार

कष्ट केल्याने माणूस मरत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे. परंतु कष्ट केल्याने माणूस दमत नाही हे मात्र सोपान बोंगाण्यांनी सगळ्या लहानथोर पत्रकारांना दाखवून दिले.  हातातले एक काम संपले की दुसरे काम ते आनंदाने करायला घेत. दुस-या दिवशीही पुन्हा तेच!  बातमी लिहण्याचे काम  म्हणजे कालच्याय प्रकारचे काम. परंतु ते काम करताना उत्साह आणि आनंद मात्र नवा असतो! सोपान बोंगाणेंचे हे उत्स्फूर्त  तत्त्वज्ञान होते. सोपान बोंगाणेंनी ३०-३५ वर्षे केलेली वार्ताहरकी  म्हणजे एक आनंदयात्रा होती. गुरूवारी पुण्यात कोरोनाने त्यांना ग्रासल्यानंतर सोपानची आनंदयात्रा संपवून ते परलोक प्रवासाला निघून जातील असे वाटले नव्हते. पण कोरोनाने ह्या आनंदयात्रीला भर यात्रेतून खेचून नेले. त्याची आनंदयात्रा कायमची संपली.

सुरूवातीला सोपान बोंगाणे बँक ऑफ इंडियात नोकरीला होते हे आज कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. केवळ हौस म्हणून नरेंद्र बल्ल्ळांच्या दैनिकात ते बातम्या लिहायचे. वर्षभरातच कुठलाही प्रकारच्या करारपत्राविना त्यांनी लिहलेल्या बातम्या लोकसत्तेत छापून येऊ लागल्या. त्यामागचे कारण  मोठे मजेशीर आहे. ठाण्याचे अधिकृत वार्ताहर श्याम घाटगे एकदा मला म्हणाले, साहेब मी दोन दिवस रजेवर जात आहे. वृत्तसंपादक तुकाराम कोकजे ह्यांच्याकडे रीतसर रजेचा अर्ज दिला आहे. मी रजेवर गेलो तरी ठाण्याच्या बातम्या मी चुकू देणार नाही. ठाण्यात सोपान बोंगाणे म्हणून एक पत्रकार आहेत. त्यांना मी महत्त्वाच्या बातम्या देण्यास सांगितले आहे. ते बातम्या पाठवतील. वेगळे हस्ताक्षर म्हणू त्यांच्या बातम्या बाजूला ठेऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे.

ठीक आहे.  कोकजेंच्या कानावर घातलेय् ना?’ मी

हो तर! त्यांनीच मला तुमच्या कानावर घालायला सांगितलंय्.घाटगे

घाटगेंनी सांगितल्याप्रमाणे सोपान बोंगाणेंनी दोन बातम्या पाठवल्या.  व्यवस्थित लिहलेली भरगच्च कॉपी हातात पडल्यावर मी खूश झालो. बातम्याही महत्त्वाच्या होत्या. किरकोळ फेरफार करून मी त्या कंपोजला पाठवल्या. सोपान बोंगाणेंचा मला दुस-या दिवशी सकाळी फोन आला थँक्यू साहेब’. त्यावर मी त्यांना म्हटले, महत्त्वाची बातमी असेल तर जरूर पाठवा. मला तसा फोनही करा.

सोपान बोंगाणेंची वार्ताहरकी लोकसत्तेत अनोख्या प्रकारे सुरू झाली! श्याम घाटगे हे इंडियन एक्सप्रेसचेही काम करायचे. त्यांच्या मूळ बातम्या इंग्रजीत करून घेण्याची सोय इंडियन एक्सप्रेसचे वृत्तसंपादक एस. कृष्णमूर्ती उर्फ एसकेएम ह्यांनी केली होती. मात्र ती बातमी एकाच वेळी लोकसत्तेला आणि इंडियन एक्सप्रेसला देण्याची अट घाटगेंना घालण्यात आली होती. ह्या अटीचे पालन करताना ब-याचदा त्यांची त्रेधातिरपीट उडायची. त्यावर श्याम घाटगेंनी सोपान बोंगाणे हा तोडगा काढला होता! सोपान बोंगाणे श्याम घाटग्यांच्या वतीने बातम्या द्यायचे. कायदेशीर झंझट निर्माण हणार नाही अशा बेताने ठाण्याच्या बातम्यांच्या बाबतीत घाटग्यांनी काढलेल्या मार्गाला लोकसत्तेच्या संपादकवर्गानेही मान्यता दिली होती.

माधव गडकरी लोकसत्ताचे संपादक झाले तेव्हा त्यांनी सोपान बोंगाणेंचा मार्ग अधिक प्रशस्त केला. घाटगेंचं वय लक्षात घेऊन त्यांना प्रादेशिक डेस्कचे काम सोपवले. घाटगेंनीही ते आनंदाने मान्य केले. गडकरीसाहेबांनी त्याच वेळी सोपान बोंगाणेंना स्टाफ कॉरस्पाँडंटची ऑफर दिली. दुस-या दिवशी सकाळी बोंगाणे माझ्या घरी हजर! त्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला.

मी स्वीकारावी का गडकरीसाहबांची ऑफर?’

` बँक ऑफ इंडियाची नोकरी तुम्ही कां सोडताहांत?’

वार्ताहराचे काम मला आवडतं. अन् गडकरीसाहेबांनी मला संधी दिली आहे. अश संधी पुन्हा मिळणार नाही.

`बँकेच्या नोकरीत जे स्थैर्य आहे ते वर्तमानपत्राच्या नोकरीत मिळणार नाही. पाहा विचार करा.

मी स्वतः स्मॉल कॉजेस कोर्टाची नोकरी सोडून मराठात नोकरीला लागलो होतो. म्हणून कर्तव्यबुध्दीने मी वर्तमानपत्राच्या नोकरीतले वास्तव त्यांच्या ध्यानात आणून दिले. पण त्यांचा उत्साह पाहून मला वाटले की बोंगाणे जे करत आहे ते बरोबर आहे. बँकेच्या नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं हेच लोकसत्तेची नोकरी स्वीकारण्याचं खरं कारण होतं.

लोकसत्तेत जॉईन झाल्यापासून सोपान बोंगाणेंचा बातम्या देण्याचा उत्साह कमी झाला नाही. एकदा त्यांचा मला फोन आला. तुम्हाला उद्या संध्याकाळी दादोजी कोंडदेन स्टेडियममध्ये जाणता राजाच्या प्रयोगाला यायचं आहे. तुम्हाला ठाण्यात येण्यासाठी गाडीची व्यवस्था केलीय् एवढं सांगून त्यांनी फोन बंद केला. दुस-या दिवशी ठरलेल्या वेळी गाडी आली आणि मी दादोजी स्टेडियमवर हजर झालो. तेथल्या कार्यकर्त्यांनी मला सरळ आत नेऊन आनंद दिंघेच्या शेजारी बसवलं. ही काहीतरी वेगळी भानगड दिसतेय् हे माझ्या लगेच लक्षात आलं. आता त्या भआनगडीत मी सापडलो होतो. निसटण्याचा मार्ग नव्हताच. थोड्याच वेळात बाबासाहेब पुरंदरे हजर झाले. दोन मिनटं बसल्यानंतर आनंद दिघ्यांनी बाबासाहेबांसह मला स्टेजवर नेलं. बाबासाहेबांनी माझ्या डोक्यावर शिंदेशाही पगडी ठेवली आणि खणखणीत आवाजच आरती सुरू झाली. आरती आटोपून आम्ही खाली आलो. कार्यक्रम संपल्यावर मी दिघेंचा आणि बाबासाहेबांचा निरोप घेऊन निघालो.

दुस-या दिवशी मी सोपान बोंगाणेना फोन केला, `काल तुम्ही कुढे दिसला नाही?’ त्यावर त्यांचे मौन!

पुढे ते लोकसत्ता सोडून सामनात गेले. आणखी कुठे कुठे गेले ! मला असं वाटतं, निवृत्तीनंतर त्यांनी लेखनाची स्टाईल बदलली. नवे विषय, नवी धाटणी!  त्यांच्या काही लेखांची शीर्षके पाहा-  `आनंदी व्हा!’, ‘ काल्पनिक मृगजळामागे धावू नका. शिंपले वेचू नका,मोती वेचा !’ ह्या त्यांच्या शीर्षकावरूनच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान साकार झालेले दिसते! काम करायचे अन् विसरून जायचे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम झाला. तेव्हा गडकरी रंगायतन खच्चून भरून गेले. एखाद्या संपादकाला जशी लोकप्रियता लाभते तशीच अफाट लोकप्रियता वार्ताहरकी करणा-या सोपान बोंगाणेंना लाभली.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: