
रोज शिस्तबध्द प्रेसब्रिफिंग आयोजित करून पत्रकारांचे समाधान होईपर्यंत
त्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देण्याची कामगिरी प्रेस इन्फर्मेशन ब्युरो नेटकेपणे
पार पाडत आहे. दिल्लीच्या तुलनेने निरनिराळ्या राज्यातली स्थिती मात्र फारशी समाधानकारक
नाही. सध्याच्या परिस्थितीत हिडीस स्वरूपाचे ठरू शकतील असे वाढदिवसासारखे
कार्यक्रम राज्यात आयोजित केले जात आहेत. राज्याचे नेते मुख्यमंत्री आणि त्यांचे
सहकारी जातीने व्हिडिओच्या माध्यमातून जनसंपर्क साधत आहेत हे सुदैवच. महत्त्वाचे
म्हणजे जनतेपासून काहीही लपवण्याची सरकारला इच्छा नाही. अनेक शहरात भाजीमंडीतली
वाढती गर्दी आणि अकारण फिरणा-या टग्यांना पोलिसांकडून दिला जाणारा प्रसाद दूरचित्रवाहिन्यांवर
प्रेक्षकांना जसा पाहायला मिळत आहे तसा तो मंत्रिमंडळाच्या सदस्यांनाही पाहायला
मिळत आहे. प्रशासनाचे चांगले कार्यही पाहायला मिळत आहे. हे सगळे पाहता असताना
संचारबंदी कम टाळेबंदीची राज्यात अजूनही आवश्यकता आहे हे स्पष्ट दिसले. ह्या पार्श्वभूमीवर
संचारबंदी आणि टाळेबंदीची मुदतवाढ निश्चितपणे समर्थनीय ठरते. रोजगार, कामधंदा,
लहानसहान कंपन्यांचे काम, शेतीमालाचा, किराणा मालाचा व्यवसाय, वाहतूक इत्यादी
समस्या उद्भवणार नाही ह्यादृष्टीने प्रशसकीय तयारी करण्यास अवसर मिळावा म्हणून १४
एप्रिलच्या खूप आधी मुदत वाढवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. सध्याची कारवाई टाळेबंदीची आहे, क्लोजरची
नाही असाच संदेश मुख्यमंत्र्यांच्या
व्हिडिओ भाषणाने मिळाला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई सावरली तर
देश सावरणार! मुंबई आणि राज्यातील
उद्योगधंद्यांचे बंद पडलेले चक्र पुन्हा गतिमान करायचे असेल तर राज्याला
जीडीपाच्या शंभर ट्क्के अर्थसाह्य मिळाले पाहिजे असा महत्त्वाचा विचार महाराष्ट्रातर्फे
बोलून दाखवण्यात आला. कोरोना संकटातून राज्यातील जनतेलाही वाचवायचे आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही वाचवायचे आहे. म्हणूनच संचारबंदी कम टाळेबंदी आश्वासक
आहे. अर्थात ह्या काळात जनतेने आपली विवेकबुध्दी शाबूत ठेवली तरच संचारबंदी कम
टाळेबंदी यशस्वी ठरणार!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment