Monday, April 27, 2020

महाभारतातले राजकारण-२


कौरवांच्या दरबारात झालेल्या सर्वस्वान्तकारक द्युतात द्यूतविषयक सारे संकेत पायदळी तुडवले गेले होते हे आपण महाभारतातले राजकारण-१ ह्या लेखात पाहिले. द्युतात हरल्यावर पांडवांना १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. वेष आणि नाव बदलून पांडवांनी मत्य्स्य देशाच्या राजदरबारात अज्ञातवासाचे एक वर्ष काढले. भीम-अर्जुन ह्यांच्या मनात सरळ हस्तिनापूरशी युध्द करून दुर्योधनादि अन्यायी कौरवांना ठार मारायचे होते.
परंतु राजकारण धुरंधर श्रीकृष्णाने युध्दाची जबाबादारी कौरवांवर टाकण्याच्या हेतून राज्याची मागणी करण्यासाठी कौरवांकडे दूत पाठवण्याची सूचना केली. त्या सुचनेनुसार विराटाच्या पुरोहिताला कौरव दरबारात दूत म्हणून पाठवण्यात आले. दूत ह्या नात्याने तो पुरोहित कमी पडला. पांडवांनी दूत पाठवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून धृतराष्ट्रानेही संजयला पांडवांकडे दूत म्हणून पाठवले. कारण इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांना परत करण्यास तोही मनोमन तयार नव्हता. राज्य परत करण्यात पुत्रमोह धृतराष्ट्राच्या आड आला. युध्दात कौरवांचा पांडवांपुढे टिकाव लागणार नाही अशी धृतराष्ट्राला भीती वाटू लागली. म्हणून कसेही करून युध्द टाळण्याची खटपट त्याने सुरू केली. स्वतःची बाजू मांडण्यासाठी संजयला पाडवावकडे पाठवण्याचा निर्णय धृतराष्ट्राने घेतला. जमल्यास युधिष्ठिराच्या न्यायी स्वभावाचा फायदा घेऊन त्याला अन्य भावांकडून वेगळा पाडण्याचा प्रयत्न करता आला तर पाहावा असाही धृतराष्ट्राचा सुप्त हेतू होताच. त्याच्या आदेशानुसार लगोलग संजय मत्स्यदेशाकडे दूत म्हणून कामगिरी बजावण्यासाठी निघालादेखील.
मत्यस्यदेशाच्या दरबारात दूक ह्या नात्याने संजयने मार्मिक भाषणे केले. खरे तर अज्ञआतवासाचा कालावधी पुरा व्हायच्या आत अर्जुन पकडला गेला, सबब अज्ञातवासाच्या अटीचा पांडवांकून भंग झाल्याचा  दावा दुर्धनाने केला होता. त्याचाच फायदा दुर्योधनाप्रमाणे धृतराष्ट्रही घेऊ इच्छित होता. वस्तुतः भीष्माच्या मते पांडवांचा अज्ञातवासाचा कालावधी पूर्ण झाला होता. अत्ज्ञातवास पुरा झाल्याची खात्री नसती तर मुळात शमीच्या झाडावर बांधून ठेवलेली राजवस्त्रे आणि शस्त्रास्त्रे अर्जुनाने काढून आणलीच नसती. गौळीवाडा लुटायला आलेल्या कौरव सैन्याशी लढायला गेल्या राजपुत्र उत्तर ह्याला सारथ्य करायला लावलेच नसते. अज्ञातवासाचा नियमभंग करून कौरवांशी युध्द करण्याचा मूर्खपणा त्याने केला नसता. अज्ञातवास सुरू होण्याचे आणि तो संपण्याचे पांडवांचे गणित सोपे होते, इंद्र दरबारात अप्सरेने दिलेल्या शापानुसार त्याचे पौरषत्व ज्या दिवशी सुरू झाले त्याच दिवशी पांडवांचा अज्ञातवास सुरू झाला आणि ज्या दिवशी अर्जुनाचे पौरूषत्व परत आले त्याच दिवशी अज्ञातवासही संपला!      
गीतेत विषादयोगात अर्जुनाने ऐनवेळा सीदन्ती मम गात्राणी म्हणत युध्द करायला नकार दिला. त्यावेळी जो युक्तिवाद त्याने केला तोच युक्तिवाद संजयने दूत ह्या नात्याने पांडवाकडे केला. युध्द करून स्वकियांना ठार मारण्यापेक्षा भिक्षा मागून उदारनिर्वाह करणे जास्त युक्त ठरेल असे संजयने प्रतिपादन केले.  राजाला  धृतराष्ट्राला पांडवांची सतत आठवण येतेय्. दुर्योधन हा मंदबुध्दी आहे. राजा धृतराष्ट्राला पांडवांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत. दुर्योधन पांडवाशी द्रोह करतो ह्याबद्दल राजा धृतराष्ट्र व्यथित आहे. राजा धृतराष्ट्र भातृकलह पाप समजतो. युध्दात कोणाचाही जय झाला तरी तो श्रेयस्कर ठरणारा नाही. कारण, युध्द हे विनाशकारी, पापमय, नरकहेतू निरर्थक कर्म असते. युधिष्ठरसारख्या धर्मशील माणसाने शांतीचा वध करणारे असले नीचपणाचे युध्द करू नये हेच योग्य ठरते, पुत्र, बंधू सगेसोयरे इत्यादींना ठार मारण्यात शांति आणि कल्याण नाही. भीष्म आणि राजा धृराष्ट्र ह्या दोघांनाही संधी अभिमत आहे असेही संजयने शेवटी सांगतले. त्याच्या युक्तिवादात गीतेत अर्जुनाने उपस्थित केलेले सारे मुद्दे आले आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनावा गीतेत केलेला उपदेश अर्जुनापेक्षा धृतराष्ट्राला जास्त लागू पडतो! म्हणूनच गीतेत धृतराष्ट्राच्या आणि संजयच्या तोंडी अनेक श्लोक आहेत. अर्जुनाचे निमित्त करून धृतराष्ट्राचे सगळे मुद्दे श्रीकृष्णाने गीत्तेतच खोडून काढले.
संजयच्या युक्तिवादाला युधिष्ठिरने अतिशय समर्पक उत्तर दिले. राजा धृतराष्ट्र आणि संजय ह्या दोघांबद्दल आदरभाव व्यक्त करून युधिष्ठिर म्हणाला, कौरवांमुळे पांडवांना जो क्लेश सहन करावा लागला त्याबद्दल एकवेळ कौरवांना क्षमा करता येईल, पण त्यासाठी इंद्रप्रस्थाचे आमचे राज्य सुयोधनाने आम्हाला परत केले पाहिजे. त्यावर संजय म्हणाला, जीवन अनित्य आहे. त्यासाठी कीर्ती नष्ट होऊ देणे योग्य नाही. दुर्योधनाने राज्य परत केले नाही तर पांडवांनी राज्यात भिक्षा मागून उदारनिर्वाह केलेला बरा. परंतु युध्सारखे घोर पापकर्म करणे उचित नाही. कामना ही धर्माचरणात विघ्न आणते. ती कामना सोडून देऊन युधिष्ठिरने ह्या लोकात आणि परलोकात सुखी होणे जास्त चांगले!
संजय हा सत्पुरूष होता. महात्मा अशीच त्यांची कीर्ती होती. तरीही राजकारणाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचीही कामगिरी मुत्सद्देगिरीची होती. धृराष्ट्राच्या इच्छेनुसार संजयचा युक्तिवाद युध्द टाळण्यासाठी होता. पांडवांना आणि श्रीकृष्णाला तर युध्द हवेच होते. श्रीकृष्ण राजकारणचतुर होता. युध्द करण्याची दुर्योधनाची इच्छा आहे, पांडवांची नाही असा आभास उत्पन्न करण्यात श्रीकृष्ण कमालीचा यशस्वी ठरला. साहजिकच पांडवांचा दूत म्हणून तो शिष्टाई करण्यास कौरव दरबारात गेला. अर्थात दूत म्हणून श्रीकृष्णाखेरीज पांडवांकडे अन्य कोण अधिकारी व्यक्ती होती? तो पांडवांचा मामेभाऊ तर होताच, शिवाय सुरूवातीपासूनच श्रीकृष्णाला पांडवांचा हिततचिंतक होता.  त्तत्कालीन भारतवर्षातल्या राजे मंडळात श्रीकृष्णासारखा कर्तृत्वान, सामर्थ्यशाली, निःस्पृह, निःस्वार्थी वीर योध्दा असा कुणी नव्हता. युध् केव्हा करावे आणि केव्हा युध्दातून पळून जावे हे तो चांगलेच जाणत होता. तो चांगला वक्ता होता. न्यायी आणि धुरंधर राजकारणी असा त्याचा भारतभर लौकिक होता. योध्दा ह्या नात्याने त्याने व्दारकेच्या शत्रूंना अनेकदा धूळ चारली होती.
दूत म्हणून कौरव दरबारात जाण्यासाठी पांडवांनी श्रीकृष्णाला विनंती केली तेव्हा द्रौपदी आणि भीम हे दोघे उगाच चिंतेत पडले. दौपदीला भरदरबारात खेचून आणून तिचे वस्त्र फेडणा-या दुःशासनाला ठार मारून त्याच्या रक्ताने द्रौपदीची वेणी घालण्याच्या प्रतिज्ञेचे काय होणार ही भीमाची चिंता तर स्त्री म्हणून झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याखेरीज द्रौपदीला स्वस्थ राहूच शकत नव्हती.
पंडुच्या पश्र्च्यात धृतराष्ट्राच्या शिरावर राजमुकूट ठेवण्यात आला खरा, पण तो तात्पुरती व्यवस्था म्हणून. तत्कालीन मौखिक संकेतानुसार ( सध्याच्या भाषेत घटनात्मकतेनुसार ) राजसिंहासनावर बसण्याचा धृतराष्ट्राला अधिकार नव्हता. कारण, तो अंगहीन( जन्मांध ) होता! धृतराष्ट्र हा हंगामी सत्ताधीश होता. खरी सत्ता युवराज दुर्योधनाच्याच हातात होती. म्हणजेच हस्तिनापूरचे राज्य हे सुसंघटित अराजक होते! राजसिंहासन मिळणे त्या काळात जन्माधिष्ठित होते हे खरे. पण शेवटी राजसिंहासन मिळवण्यासाठी युध्द करावेच लागते असा जगाचा इतिहास आहे. ह्या दृष्टीने पाहिल्यास हस्तिनापुरच्या राजगादीवर बसण्यासाठी पांडवांना युध्द करणे क्रमप्राप्त होते. हस्तिनापूरच्या राजसिंहासनावरील त्याचा हक्क आधी डावलला गेला होताच. इतकेच नव्हे तर निव्वळ तडजोड म्हणून मिळालेले खांडवप्रस्थाचे ( जे पुढे इंद्रप्रस्थ म्हणून विख्यात झाले ) राज्यदेखील कपटद्युताच्या साह्याने दुर्योधनाने हिसकावून घेतले होते. म्हणून युध्दापूर्वी राज्या परत मिळणअयाची रीतसर मागणी कौरव दरबारात करण्याची अपरिहार्यता लक्षात घेतली पाहिजे. श्रीकृष्णाने ती कामगिरी कौरव दरबारात चोख पार पाडली. पांडवांनी द्युताच्या सा-या अटींचे पालनही केले होते. तरीही पांडवांना अज्ञातवासात गाठून पुन्हा वनवास आणि अज्ञातवास भोगायला लावण्याची शकुनीची आणि दुर्योधनाची योजना होती. पण ती मुळीच यशस्वी झाली नाही.
दुर्योधनाने आणखी एक चूक केली. कौरव दरबारात श्रीकृष्णाचे भाषण सुरू असताना दुर्योधनाने सभात्याग केला. इतकेच नव्हे तर, श्रीकृष्णाला पकडून बंदीवासात टाकण्याच्या तयारीला तो लागला. श्रीकृष्णाला हे जेव्हा समजले तेव्हा भर दरबारातच श्रीकृष्ण म्हणाला, असेल हिंमत तर मला पकडून दाखवा! तसे कशाला? मीच दुर्योधनाला पकडतो तुरूंगात टाकतो. परंतु धृतराष्ट्राच्या आज्ञेवाचून इथे मी युध्द करणे योग्य नाही. नंतर तो कौरव दरबारातून विदुराच्या घराकडे निघून गेला. मत्स्यदेशात परत जाण्यापूर्वी त्याने कर्णाची गाठ घेतली. कर्णाला त्याचे जन्मरहस्य श्रीकृष्णाने उघड केले. तू पांडवांच्या बाजूला आला तर पांडव तुझे स्वागत करतील. युधिष्ठिरासह सारे पांडव आणि द्रौपदी राजा मानतील असे त्याने कर्णास सांगितले. परंतु कर्ण ते मान्य करणार नाही हे श्रीकृष्णाला माहित होते. अर्जुनाखेरीज अन्य पांडवाशी युध्द न करण्याचे आश्वासन उदार कर्णाकडून त्याने मिळवले!
शिष्टाईनिमित्त रंगलेल्या राजकारणाखेरीज अनेक प्रसंग प्रसंग महाभारतात आहेत. परंतु तुलनेने ते किरकोळच मानावे लागतील. त्यांचा परामर्ष पुन्हा केव्हा तरी!
(हा लेख द. ल. शिवलकरलिखित श्रीमद्भग्वद्गितेचे लक्ष्य कोण?’ ह्या पुस्तकाच्या आधारे लिहला आहे.)
रमेश झवर
ज्येषठ पत्रकार

No comments: